संस्कृती/सीता

विकिस्रोत कडून

सहा


सीता


 सीता. एक स्वप्न, एक शल्य किती जुने ? आठवते तेव्हापासूनचे. समोर रामविजयाची पोथी मी अक्षरे लावून लावून मोठ्याने वाचते आहे. आई अर्थ सांगते आहे. पोथीतून कुठचा कथाभाग मनात रुजला, ते काही आठवत नाही. फक्त एक पचंड पुस्तक, त्यातील मोठी अक्षरे आणि दर अध्यायाच्या आरंभीचे पानभर चित्र एवढे आठवते. पहिल्याने सीता हे नाव वाचले आणि ह्या-ना-त्या निमित्ताने ते सारखे आजही माझा पाठपुरावा करीत आहे.
 माझ्या आजीचा आवाज गीड नव्हता, पण तिची गाणी फार गोड. ती सीता-सैंवर म्हणायची, "कोण तूझ्या मनात येतो सांगे गो सीते ।....बाई तो काय नव्हे ग....."
 मला ते गाणं पाठ म्हणता आलं नाही, व नंतर पुढे कुठे आढळलेही नाही. पुण्याला कोणीतरी 'राघव कोमलतनू गडे ग राघव कोमलतनू । कमलपृष्ठसम... हे शिवधनू' हे गाणे म्हणायचे.
 विठोबा - अण्णांचे असावे की काय, असे वाटते. पण तेही संबंध कुठे सापडले नाही.
 लहानपणीच्या गाण्याचाच आशय शाळेत वामन पंडितांनी ऐकविला. परत सीतास्वयंवर, परत रावणाची फजिती. 'हळुहळु अमलांगी गोरटी राजबाळी, जवळजवळ आली डोलते घोसबाळी' हे सीतेचे वर्णन. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
 हे होते आहे तो संस्कृत सुरू झालेले. वाल्मीकि रामायणातले श्लोक, नंतर कालिदास, नंतर भवभूतीचे उत्तररामचरित. शिकवायला एक असामान्य

।। संस्कृती ।।

४५

गुरुजी मिळाले. उत्तर रामचरित वाचताना आम्ही मान डोलविली किंवा प्रशंसा केली, की त्यांनी म्हणावे, "हे नाटक तुम्हाला आत्ता नाही कळणार. आणखी दोनदा वाचावे लागेल." आम्ही म्हटले, "वाचू की परत," म्हणजे त्यांनी म्हणावे, “तसे नाही. शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला आहे, पण एकाएका श्लोकाचा अर्थ किंवा नाटकाचा अर्थ कळायचा नाही. लग्न झाले, की एकदा हे नाटक वाचा: मग मुलं झाली, म्हणजे परत हे नाटक वाचा. मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल."

 माझी पिढी स्त्रियांच्या हक्कांबद्दल फार जागरूक. त्यामुळे सीता त्यागाबद्दल किती वादविवाद माजत! जणू काय ती आमच्यातलीच एक आहे, इतक्या आपुलकीने आम्ही रामावर जळत असू.
 पुढे प्राकृत अभ्यास करताना 'पऊमचरिय' वाचले. त्यात रामाचीच गोष्ट आहे. सीता शेवटी केशलोच करून प्रव्रज्या घेते, असे दाखविले आहे. कशी फजिती झाली रामाची, म्हणून एक क्षणभर वाटले. पण भर सभेत मुठीमुठींनी स्वतःचे केस उपटणाऱ्या सीतेचे चित्र मनाला पटले नाही. सीतेचे अंतःकरणातील चित्र असे आक्रस्ताळेपणाचे नव्हते; असे उद्वेगकारकही नव्हते.
 “बाई माझे लाडके सिताबाई | बाळपणीचे कौतुक वदू काई ।। "
 मी आपले कान टवकारले. अतिशय गोड गळ्याने, शुद्ध, स्पष्ट, रेखीय कोणीतरी म्हणत होते, - मामंजीच ते. गळ्याचे व वाणीचे इतके गुण दुसऱ्या कोणाचे मला माहित नाहीत. मी हातातले काम टाकून त्यांच्या खोलीशी गेले. धाकट्या नातीला पुढ्यात बसवून आजोबा तिला श्लोक शिकवीत होते. अभावितपणे माझ्या तोंडून आपल्याशीच शब्द निघाले - "प्रतनुविरलेः प्रान्तोन्मीलन्मनोहरकुन्तलैः "आजोबा शिकवीत असलेला मराठी श्लोक भवभूतीचे भाषांतर का? कोणी केले? परशुरामपंत गोडबोल्यांचा तर हा श्लोक नसेल? आजोबांनाही आठवेना व मला कळलेच नाही.
आज आयुष्याच्या उतरणीवर रामायणाची संशोधित आवृत्ती हाती आली. सबंध आवृत्ती पुरी व्हायला अजून वर्ष-दोन वर्ष तरी हवीत.युद्धकाण्डाचा

४६

।। संस्कृती ।।

शेवटचा भाग व सबंध उत्तरकांड संशोधित होत आहे अजून. पण झालेली काण्डे व त्याच्या प्रस्तावना वाचताना लहानपणापासून बाळगलेल्या कल्पना धडाधड कोसळत होत्या. युद्धानंतर लंकेत सीतेने अग्निदिव्य केले, हे प्रकरणच नव्या आवृत्तीत प्रक्षिप्त मागाहून घुसडलेले म्हणून नाही ! सबंध उत्तरकाण्डही प्रक्षिप्तच आहे, असे सर्व विद्वान संशोधक म्हणत आहेत. रामायण वाचले व माझीही उत्तरकाण्डाच्या प्रक्षिप्तपणाबद्दल मनोमन खात्री झाली. रामाने सीतेचा त्याग केला, ही गोष्टच झाली नाही. म्हणजे एक जुने शल्य अगदी कायम नाहीसे झाले. खरोखर मला आनंद व्हावयास पाहिजे होता. पण तसे झाले नाही. त्या शल्याबरोबर स्वप्नही नाहीसे व्हावयाला घातले. सीता हे स्वप्न आणि सीता हे शल्य एकमेकांशी इतकी निगडित आहेत की, एक गेले की दुसरे राहतच नाही. नवऱ्याबरोबर कष्ट व वनवास भोगणाऱ्या बाया आपल्या कथांतून इतक्या आहेत की, सीतेचे त्याबद्दल विशेष कौतुक होण्याचे कारण नाही. सीता आठवते ती रम्य, स्वप्नमय, धुंद वनवासामुळे. पण त्यापेक्षाही तीव्रपणे जाणवते, खुपत राहते, ती तिच्यावरील शेवटच्या प्रसंगाने. तो गेला की उरलेल्या सीतेला मनात टिकून राहायला कारणच राहत नाही. ज्या कवीने सीतेला दिव्य करावयास लाविले, त्याच्या मनात उद्देश होता रामाच्या स्वभावाच्या आणखी एका - त्याच्या मनाने अलौकिक - पैलूचे दर्शन घडवावे हा. पण झाले भलतेच. त्या एका प्रसंगाने रामचरित्रावर नसलेला डाग उत्पन्न झाला आणि विशेष व्यक्तिमत्व नसलेल्या सीतेच्या चरित्राला विलक्षण धार चढली. शेवटच्या प्रसंगाने तिचे चरित्र आद्यन्त लोकविलक्षण झाले.

 सीतेला कोणी जन्माला घातले नाही. तिचा गर्भभार कोणी वाहिला नाही. कोणाला तिच्यापायी डोहाळे झाले नाहीत. यज्ञाची तयारी चालली होती. लोक जमले होते. भुईतून नांगराचा फाळ आला, त्याबरोबर ती वर आली. तिच्या गोऱ्या बाळ अंगाला मातीचे कण चिकटले होते, असे रामायणात वर्णन आहे. तशीच ती गेली. सभा भरली होती; हजारो लोक जमले होते. धरणीने तिला पोटात घेतले. ती गेली, ती आपली झाली नि गेली. एखादे अघटित घडते ना त्याप्रमाणे ती जन्मली नाही नि मेलीही नाही.

।। संस्कृती ।।

४७

 सीतेच्या लग्नाची कितीतरी गाणी आहेत; काव्ये आहेत. राजे कसे जमले होते, रावणाला धनुष्य न पेलल्यामळे तो कसा पडला, व शेवटी धनुर्भंग करून माळ रामाच्या गळ्यात कशी पडली, ही वर्णने संस्कृत व मराठी कवींनी केली आहेत. पण आताच्या संशोधित आवृत्तीत त्याला काही आधार नाही. जो धनुष्य वाकवील, त्याला मुलगी देण्याचा पण ऐकून पुष्कळ राजे आले व निराश होऊन परत गेले. ह्या निराश झालेल्या सर्व राजांनी मिळून मिथिलेवर स्वारी केली. जनकाचा पराभव व्हावयाचा पण देवांच्या मदतीने तो वाचला अशी हकीकत आहे. विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन जनकाच्या यज्ञाला आले, तेव्हा ही हकिकत जनकाने त्यांना स्वतः सांगितली, हे विलक्षण धनुष्य आहे तरी काय ते रामाला दाखवावे, असे विश्वामित्रांनी सांगितल्यावरून धनुष्य असलेली लोखंडी पेटी गाड्यावर घालून खूपशा माणसांनी ओढीत आणली, रामाने पेटी उघडली; आतले धनुष्य उचलले; दोरी चढवली; बाण लावला आणि ओढला, एवढ्यात धनुष्य मोडले. पण जनकाचा पण पुरा झाला होता. त्याने सीता रामाला द्यायची ठरवून दशरथाला बोलावण्याचे ठरविले. पण पुरा झाला. एवढीच एक गोष्ट शिल्लक उरते. देशोदेशींचे राजे सभोवर बसले आहेत व मधे धनुष्य ठेवले आहे, असा स्वयंवर मंडपाचा देखावा राहत नाही.

 लग्न झाले, तेव्हा राम जेमतेम सोळा वर्षांचा होता. सीता चौदाची असावी, असे अनसूयेजळ तिनेच केलेल्या वर्णनावरून वाटते. लग्नानंतर दोन वर्षं ती रामाबरोबर स्वतंत्र राजवाड्यात अयोध्येला राहिली. दशरथाच्या जितक्या राण्या, तितके राजवाडे असावे, असे दिसते. कारण अयोध्याकांडात राज्याभिषेकाच्या आदल्या दिवसाचे व नंतरच्या दिवसांची जी वर्णने आहेत, त्यावरून रथात बसून ह्या राजवाड्यातून इकडून तिकडे माणसे गेल्याची वर्णने आहेत. म्हणजे राम आणि सीता ही काहीशा स्वतंत्रपणे आपल्या स्वतःच्या प्रासादात राहत होती, असे दिसते. वनवासात जातानाचे दोन प्रसंग आठवणीत येतात. दशरथाने कैकेयीला काय वचन दिले, हे कळल्यावर राम कैकेयीच्या वाड्यात दशरथाला भेटायला येतो. त्या वेळी सीताही

४८

।। संस्कृती ।।

त्याच्याबरोबर होती. कैकेयीने तेथे स्वतः वल्कले आणून दिली. रामलक्ष्मण आपली रेशमी वस्त्रे फेडून ती वल्कले ल्यांले. पण सीतेला वल्कल कसे नेसायचे ते कळेना. म्हणून ती शरमिंदी होऊन उभी असताना तिचे वल्कल घेऊन रामाने तिला रेशमी साडीवरून नेसविले, असे वर्णन आहे. दुसरा प्रसंग सीतेने नवऱ्याचे व सासूचे मन वळवून वनवासाला जायची परवानगी मिळविली तो. सीतेच्या तोंडचे श्लोक बायकांनी कसे वागावे ह्याबद्दलच्या कित्त्यात घालून फ्रेम करण्यासारखे आहेत.

 वनात आल्यावर तिचे ठिकठिकाणी कौतुकच झाले. एका स्थळावरून दुसऱ्या स्थळाकडे जायला तिला पायी चालावे लागत होते. ह्यापेक्षा जास्ती कष्ट तिला पडले, असे दिसत नाही. राक्षस वगैरे आले की, रामाने त्यांच्याशी लढून त्यांचा नाश करायचा व लक्ष्मणाने सीतेला सांभाळायची. ह्याउलट असे झोपडी बांधणे, पाणी भरून आणणे वगैरे कामेही लक्ष्मण करीत होता, दिसते. ह्या चाकरासारखे वागण्यामुळेच की काय, सीता लक्ष्मणाला दुरुत्तरे बोलू शकली. प्रसंग होता मारीच वधाचा. ह्या मायावी राक्षसाने मरताना 'हा लक्ष्मणा ! हा सीते !' असा घोष केल्यामुळे रामच घायाळ होऊन पडला, असे सीतेला वाटले. रामाचा आक्रोश ऐकून सीतेने लक्ष्मणाला रामाकडे जावयास सांगितले. "रामाच्या केसाला कोणी हात लावणे शक्य नाही; हा प्रकार राक्षसी मायेचाच असणार" असे लक्ष्मणाने सीतेला सांगितले. 'मी ह्या कानांनी रामाचा शब्द ऐकला, ते खोटे कसे असणार ? - म्हणून "तुझा माझ्यावर डोळा आहे, भरताचा हेर म्हणूनच तू आमच्याबरोबर आलेला दिसतोस.” अशा तऱ्हेचे त्याला लागेल असे शब्द सीता बोलली. सबंध जन्मात तेढे आणि दुष्टपणाचे ती बोलली ते एवढेच. आणि त्याचे प्रायश्चितही तिला कितीतरी पट भोगावे लागले. रावणाने तिला हिरावून नेले, अशोकवनात तिचा छळ केला, एवढेच दुःख ह्या उतावीळ बोलण्याने तिला भोगावे लागले असे नाही, तर रामाकडून तिचा त्याग हेसुद्धा ह्या बोलण्याचेच फळ म्हणावे लागेल.

।। संस्कृती ।।

४९

 नंतर सीता जी आपल्याला दिसते ती रावणाच्या अशोकवनात. एका शिंशपा (?) वृक्षाखाली बसलेली. तिचे वर्णन फार करूण आहे. विशेषतः, रावण तिला भेटायला आला असताना एका हाताने आपले ऊर झाकणारी, एका हाताने आपले उदर लपविणारी, सगळे अंग संकोचून घेणारी अशी सीता व तिच्याकडे पाहणारा रावण ह्यांचे चित्र मनात फार वेळ घोळते. शेवटी हनुमानाची भेट झाल्यावर तिने रामाला निर्वाणीचा निरोप पाठविला, 'सुटका करावयाची तर एका महिन्यात कर नाही तर मी मेले' असा.

 रावणाचा युद्धात पराभव झाला, आणि सीतेला अशोकवनातून आणण्यात आले. मी लहानपणी वाचलेल्या रामायणात पुढीलप्रमाणे वर्णन आहे. राम सीतेला म्हणतो,”तुला हरून नेण्यामध्ये रावणाने माझा अपमान केला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी मी रावणाला मारले. तुझ्या आशेने नव्हे." सीतेच्या खऱ्या विटंबनेला येथूनच सुरूवात झाली, शत्रूने पळवून नेणे ही गोष्ट क्षत्रिय-स्त्रियांना ऐकून तरी माहितीची होती. पण ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केले, ज्याच्याशी इमान राखून शत्रूला दोन हात दूर ठेविले, तो नवराच अशा प्रकारची शंका घेतो ह्याहून दुसरे दुःख काय? सीता चितेवर स्वतःला जाळून घेणार, तोच अग्निदेव शांत झाले. त्यांनी तिला हाती धरून ती शुद्ध आहे, असे सर्वांच्या देखत सांगून रामाच्या अधीन केले. हा अग्निशुद्धीचा प्रकार व ही सीतेची विटंबना संशोधित आवृत्तीत नाही म्हणतात. संशोधित आवृत्ती अजून तेथपर्यंत आली नाही. त्याप्रमाणे महाभारतात सांगितलेल्या रामकथेमध्येही हे प्रकरण नाही.
 सर्वजण अयोध्येला परत आले व राम राज्य करू लागला. ह्या वेळेला राम बत्तीस वर्षांचा असावा. सीता तीस वर्षांची असावी. सर्व सुरळीत चालले होते. सीतेला दिवस गेले होते. व तिने परत एकदा वनात जावे, अशी आपली इच्छा व्यक्त केली होती. त्याच दिवशी रामाला त्याच्या गुप्त हेरांकडून असे कळले की, कुणी क्षुद्र प्रजाजन सीता रावणाकडे राहिल्यावरही रामाने तिचा स्वीकार केला म्हणून हेटाळणीने बोलतात. एवढासुद्धा लोकप्रवाद नको, असे वाटणाऱ्या रामाने दुसऱ्या दिवशी सीतेला न कळविता वनात नेऊन सोडले. हे क्रूर कर्म दुर्दैवाने लक्ष्मणालाच करावे लागले.

५०

।। संस्कृती ।।

 वाल्मीकीच्या आश्रमात सीता बाळंत होऊन सीतेला जुळे झाले व ही दोन्ही मुले आश्रमात वाढली. ज्या कवीने सीता त्यागाचा बनाव रचला त्याला पुढचा भागही रचणे क्रमप्राप्त होते. सीता समजा वनात मेली असती तर 'ही तुझी मुले, संभाळ' म्हणून त्यांना रामाच्या स्वाधीन करणे शक्य नव्हते. बीजक्षेत्रन्यायाने हे शक्य होते, असे महाभारत कथेवरून दिसते. पण रामायणाच्या प्रकृतीलाच मुळी तो न्याय पटणारा नाही. म्हणून सीतेची मुले रामाच्या बीजाची आहेत, हे सिद्ध करणे अत्यावश्यक होते. आता सीतेचे दिव्य फक्त तिच्यापुरतेच नव्हते ते न करून रानात मरून जाणेही तिला शक्य नव्हते. कारण तिच्या शुद्धत्वाबरोबर मुलांचे औरसत्व सिद्ध होणार होते. रामाचे वारस म्हणून अयोध्येच्या सिंहासनावर त्यांचा हक्क प्रस्थापित होणार होता. किंबहुना, इमानी बायको म्हणून दिव्य करणे जेवढे आवश्यक होते, त्याहीपेक्षा आईचे एक शेवटचे कर्तव्य म्हणून ते आवश्यक झाले होते. ही गोष्टही जाहीरपणे मोठ्या जनसमुदायापुढे होणे आवश्यक होते.

 ह्यानंतरचा प्रसंग पुष्कळच कवींनी रंगविला आहे. पण त्याचे कधी न पुसणारे चित्र कालिदासाने जे काढले आहे, तसे कोणालाच जमले नाही. तीन श्लोकांच्या आखूड सहा ओळींत एखाद्या क्षणचित्राप्रमाणे कालिदास हे चित्र उभे करतो. राम काय म्हणाला, सीतेने कसले भयंकर दिव्य केले, हे कळायच्या आतच हे वर्णन संपते. त्याच्या शब्दांतच ते देणे योग्य होईल.
 वाक्मनः कर्मभिः पत्यौ व्यभिचारो यथा न मे ।
 तथा विश्वम्भरे देवि मामन्तार्धातुमर्हसि ।।
 तत्र नागफणेक्षिप्तसिंहासन निषेदुषी ।
 समुद्ररशना साक्षात् प्रादुरासीद् वसुंधरा ।।
 असा सीतामङ्कमारोप्य भर्तृ प्रणिहिते क्षणाम् ।
 मा मेति व्याहरत्येव तस्मिन् पातालमभ्यगात्
या ओळींचा स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे-
 मनोवाचाकृतीने ना पतिशी टळले जर ।
 ओटीमध्ये मला घ्यावे माये विश्वंभरे तर ।।

।। संस्कृती ।।

५१

 समुद्रांनी वेष्टिलेली नागासिंहासनी स्थित ।

 साक्षातच वसुंधरा देवी प्रकटली तिथे ||
 पतीशी दृष्टी जडल्या सीतेला अंकि घेऊनी ।
 'नको, नको,' म्हणे तों तों ती अंतर्धान पावली ||
 सीतेच्या सबंध आयुष्यात ती भूमिकन्या आहे, ह्या गोष्टीचे तिला कधी स्मरण झाले होते की नाही कोण जाणे ! इतर लोक ती गोष्ट पार विसरून गेले असतील. भूमी म्हणजे सगळ्यांच्या पायाखालची माती. पण ह्या वेळी, ह्या बिकट प्रसंगी तिला आपल्या आईची आठवण झाली ती विश्वंभरा म्हणून. पहिल्या श्लोकात कालिदासाने तिची प्रतिज्ञा व तिने आईला मारलेली हाक दिली आहे. लोकांच्या पायदळी असलेली भूमी किती ऐश्वर्ययुक्त आहे, म्हणजेच पर्यायाने सीतेचे माहेर किती श्रीमंत होते, ह्याचे वर्णन दुसऱ्या श्लोकात नागफणीने उचलून धरलेली, सिंहासनावर बसलेली पृथ्वी कालिदासाने ज्या शब्दात वर्णिली आहे, तो शब्द तिच्या श्रीमंतीचा निर्देशक 'वसुंधरा' आहे. शेवटच्या श्लोकात पृथ्वी, राम व सीता अशा तिघांच्या कृती आहेत. लग्न झाल्या दिवसापासून रामाबद्दलची सीतेची वृत्ती "रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन" अशी होती. ह्या वेळीही तिचे डोळे रामावर खिळलेले होते. तिला तशीच उचलून आईने मांडीवर घेतले. आणि राम 'नको नको' म्हणून ओरडतो आहे, तोच ती नाहीशी झाली. सीतेची प्रतिज्ञा कशा अंतिम स्वरूपाची होती हे रामाच्याही लक्षात आले नसणार, सीता शब्द उच्चारते काय व पाहता-पाहता धरणीच्या पोटात जाते काय, सर्वच अतर्क्य ! राम सिंहासनावरून उठलेला असणार, हात उभारून 'नको, नको, 'ओरडतो आहे व पुढे जाण्यासाठी त्याने एक पाऊल उचलले आहे. असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. सीता नाहीशी झाल्यावर राम काळाठिक्कर पडला असेल. पण त्याहीपेक्षा राहून राहून मनात येते की, ह्या क्षणीतरी रामाला समजले असेल का की, सहस्त्रशीर्ष सहस्त्रजिव्ह अशा लोक नावाच्या विराटपुरुषाला संतुष्ट करणे अशक्य आहे? जो मनुष्य काही ध्येये उराशी बाळगून आयुष्याचा मार्ग चालतो, त्याला लोकानुरंजन हे ध्येय ठेवता येणे

५२

।। संस्कृती ।।

शक्यच नाही. लोकानुरंजन- क्षणाक्षणाला मन बदलणाऱ्या लोकांचे रंजन हे राजकारणी पुरुषांच्या हातचे एक महाभयंकर साधन आहे. त्यामुळे मनुष्य अधिकार प्राप्त करून कुठच्याकुठे वर जाऊ शकतो, त्याचप्रमाणे हा प्रवाह विरुद्ध गेला तर सर्वस्वाला वंचित होऊन तो गर्तेत जाऊन पडण्याचीही शक्यता असते. लोकानुरंजन हे साध्य होऊच शकत नाही. ते सदैव एक साधनच राहते.

 सीता गेली. कुशलवांना राज्य मिळाले. सीतेचा हा शेवटचा क्षण पतिभक्तीचा कळस म्हणावयाचा का मातृत्वाचा शुद्ध अविष्कार म्हणायचा?

- १९७०

।। संस्कृती ।।

५३