संस्कृती/सासवा सुना

विकिस्रोत कडून

सात


सासवा सुना


 महाभारतकाळी बायकांचे सर्व आयुष्य पुरुषांच्या अधीन असे. लहानपणी बापाच्या घरी लाडकी मुलगी म्हणून कौतुकही होई. त्याचप्रमाणे कोणाची, विशेषतः ब्राह्मणाची मर्जी संपादन करावयाची असली तर मुलगी त्याच्या शुश्रुषेला ठेवीत किंवा तिचे ब्राह्मणाबरोबर लग्न करून देत. ती वयात आली, म्हणजे शस्त्रविद्येत श्रेष्ठ ठरलेल्या मनुष्याशी तिचे लग्न होई, किंवा पैसे घेऊन तिचे लग्न होई किंवा तिला कोणी पळवून घेऊन जाऊ शकत असे. नवऱ्याच्या घरी, समाजात तिला नवऱ्याच्या दर्जाप्रमाणे मानमान्यता मिळे किंवा अपमान होई. ती राणी होऊ शके, ती दासी होऊ शके. तिला नवऱ्याकडून मुले होत, त्याचप्रमाणे नवऱ्याने नेमलेल्या पुरुषाबरोबर प्रजोत्पत्तीसाठी तिला संग करावा लागे. नवरा मेल्यानंतर तिला बऱ्याचदा सती जावे लागे. ती पुत्रवती असेल तर पुत्र ठेवील त्याप्रमाणे तिला रहावे लागे.
  महाभारतातील कोणत्याही स्त्रीला हे जिणे चुकले नाही. बायका बायकांच्यात जो फरक पडला, तो नवऱ्याच्या गुणामुळे. तरीही महाभारतातील काही स्त्रिया मनावर ठसा उमटवून जातात. त्याचे कारण ह्या पराधीन जिण्यात त्यांनी आपल्या नवऱ्याचे व मुलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, वेळेस त्यांनी शिव्याशाप दिले. पण तीन बायका मात्र अशा आहेत की, दुःखाच्या त्यांना मूकनायिकाच म्हणावे लागेल. त्या म्हणजे काली सत्यवती व तिच्या दोन सुना अंबिका आणि अंबालिका - काशीराजाच्या मुली. महाभारत हा इतिहास घडविण्यात त्यांचा वाटा दैवाच्या हातचे खेळणे ह्यापलीकडे नाही. त्यातल्या त्यात सत्यवतीच सर्वस्वी पराधीन आणि परतंत्र अशी वागली. तिच्या सुनांनी आयुष्यात एकदा तरी चालले आहे त्याविरूद्ध आपली अनिच्छा नोंदविली.

५४

।। संस्कृती ।।

 सत्यवती एका कोळ्याची मुलगी. एका कथेत सांगितले आहे, की ही मुलगी राजाने कोळ्याला पाळायला दिली, ती अतिशय सुस्वरूप होती. कोळीराजाने (पुण्यसंचयार्थ ? ) गंगेवर एक नाव ठेवली होती. त्या नावेतून वाटसरूंना फुकट गंगापार केले जाई. नाव वल्हवायचे काम ह्या पाळलेल्या सुंदर सत्यवतीकडे होते. ह्या पुण्यकर्मात जे व्हायचे तेच झाले. एका ब्राह्मण तपस्व्याची नजर तिच्यावर खिळली. व तिला त्याच्या वासनेला बळी जावे लागले. ह्या प्रकरणी तिने प्रतिकार केला, किंवा त्या ब्राह्मणाने बलात्कार केला, असे वर्णन नाही. कोळ्याची मुलगी, म्हणजे कोळीराजाची मुलगी असली, तरी ती जातीने हीन होती. ब्राह्मण आणि त्यातून तपस्वी - वरच्या दर्जाचा समजला जाई. ब्राह्मणाने काही मागितले, तर त्याला नाही म्हणू नये, असा सर्वत्र समजही होता. कदाचित त्यामुळे कोळी राजाच्या पुण्यसंचयात भरच पडली असेल. ह्या संबंधापासून दोन गोष्टी झाल्या. एक, सत्यवतीला एक मुलगा झाला. तो पितृसावर्णी म्हणून ब्राह्मण झाला. एक अतिशय विद्वान ऋषी म्हणून गणला गेला, आणि हाच महाभारताचे चरित्र-नायक जे पांडव त्यांचा आजा झाला. ब्राह्मणाशी शरीरसंबंध झाल्यामुळे सत्यवतीच्या अंगाला माशाची घाण येत होती. ती नाहीशी होऊन एक प्रकारचा सुगंध प्रका येऊ लागला. ही झाली दुसरी गोष्ट.

 काही वर्षे लोटली. सत्यवती फारच सुरेख दिसायला लागली. तिच्या अंगच्या सुंगधाची किर्तीही पसरली. ह्या सुमाराला ती पुष्कळ वर्षे पत्नीवियोग झालेल्या म्हाताऱ्या शंतनूला दिसली व त्याचे मन तिच्यावर जडले. शंतनूला कुलशीलाची कधीच पर्वा नव्हती. त्याची पहिली बायको गंगा त्याला अशीच नदीकाठी भेटली होती. राजाने सत्यवतीला मागणी घातली, तेव्हा कोळ्याने सौद्याची भाषा केली. राजाला एकदम 'हो' म्हणवेना. तेव्हा युवराजाने स्वतः येऊन आपल्याला प्रतिज्ञेत बांधून घेऊन सौदा पुरा केला. सौद्याला अटी तीन होत्याः (१) सत्यवतीच्या पोटी येणारा मुलगा हस्तीनापुरच्या गादीवर बसावा, (२) युवराज देवव्रताने आपला राज्यावरील हक्क सोडावा व (३) युवराजाने आमरण अविवाहित राहावे. ह्या तिन्ही अटी पाळण्याची प्रतिज्ञा

।। संस्कृती ।।

५५

करून देवव्रताने सत्यवतीचे आपला बाप शंतनू त्याच्याशी लग्न लावून दिले. एवढ्या महत्त्वाच्या वाटाघाटीत सत्यवतीने काहीही भाग घेतला नव्हता. सौदा बोलणारा तिचा बाप होता आणि तो मान्य करणारा भीष्म व शंतनू हे होते. “तुला म्हाताऱ्या शंतनूशी लग्न करायचे आहे का ? तुझ्या मुलांना गादी मिळावी, असे वाटते का?" असे तिला कोणीही विचारले नव्हते. तीन पुरूषांनी तिचे काय करायचे ते ठरविले.

 लग्न झाल्यावर तिला दोन मुले झाली. आणि थोड्याच वर्षात तिचा म्हातारा नवराही मेला. दोन मुलांपैकी थोरला एका भांडणात मेला व दुसऱ्याला हस्तिनापूरचे राज्य मिळाले. हा मुलगा विचित्रवीर्य प्रकृतीने नाजूक होता. त्याचे लग्न झाल्यावर तो १-२ वर्षातच क्षयाने निपुत्रिक वारला. बापाने तिच्या लग्नात केलेल्या सर्व सौद्यावर पाणी पडले. "भीष्मा, तू राजा हो, व लग्न कर" असे तिने आपल्या सावत्र मुलाला सांगितले. पण त्याने ते मानले नाही. शेवटी भीष्माच्या संमतीने तिने आपला कुवारपणाचा मुलगा जो व्यास, त्याला बोलाविले व राण्यांच्या ठिकाणी पुत्रोत्पत्ती करविली. थोरल्याला गादी मिळायची, तो जन्मांध होता. म्हणून धाकट्याला गादी मिळाली व पुढील कलहाची बीजे पेरली गेली.
  थोरला नातू धृतराष्ट्र हस्तीनापुरात राहिला. त्याला खूप मुलगे झाले. धाकटा नातू पांडू राजा झाला. त्याला स्वतःला मुले होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने दुसऱ्याकडून आपल्या राण्यांच्या ठायी पुत्रोत्पत्ती करविली. मुले लहान असताना पांडू मेला. माद्री सती गेली. त्या दोघांची प्रेते, कुंता व मुले ह्यांना बरोबर घेऊन रानातले ऋषी व ब्राह्मण हस्तीनापुरास आले व त्यांनी पांडूची पोरकी मुले व पांडूची बायको कुंती यांना भीष्माच्या स्वाधीन केले. पांडूचे मर्तिक राजाला साजेशा इतमामाने झाले. ह्या दुखवट्या व्यास आपल्या आईकडे आला व त्याने सांगितले की, "बाई ग, पुढचे भविष्य बरे दिसत नाही. भाऊबंदकीत कुळ नष्ट होण्याचा संभव आहे. पुष्कळ पाहिलेस व पुष्कळ भोगलेस. आता राजवाड्यात राहू नकोस. सुनांना घेऊन वनवासात जा." जन्मभर घरचे पुरूष सांगतील, त्याप्रमाणे वागणाऱ्या सत्यवतीने ह्याही वेळेस मुलाचे ऐकले. ती अरण्यात गेली व तेथेच तिचा अंत झाला.

५६

।। संस्कृती ।।

 सत्यवती एका प्रकारे कुरुकुलाचा संहार घेऊनच जन्माला आली होती. जिच्यामुळे महाभारताचे युद्ध शक्य झाले, अशा ह्या असामान्य सौंदर्यवतीचे हे अगदी सामान्य, कर्तव्यशून्य व प्रवाहपतित आयुष्य. त्याचबरोबर हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, सत्यवतीला कोठच्याही तऱ्हेने जबाबदार धरता येत नाही. ती एक अपाप, अश्राप असे दैवगतीचे कारण होती. ह्यापलीकडे तिने आपणहून असे काहीच केले नव्हते. तिने आपण होऊन कोणाचा द्वेष केला नाही व कोणावर प्रेमही केले नाही. द्वेष आणि प्रेम ही स्वतंत्रांनाच शक्य असतात. तिच्यासारख्या सर्वस्वी परतंत्रांना नसतात. आपण परतंत्र आहो हे तरी बिचारीला जाणवले होते की नाही, कोण जाणे!

 सत्यवतीच्या मानाने सत्यवतीच्या सुनांचे आयुष्य जास्तच करूण वाटते. सत्यवतीच्या रूपाने काहींना भुरळ घातली. कोळ्याची मुलगी असून काही वर्षांपुरती का असेना राणी झाली. तिचे आयुष्य परतंत्र असूनसुद्धा पुढच्या पिढीतील लेखकांना तिच्याबद्दल काव्यमय भाषेत लिहावेसे वाटले. बिचाऱ्या अंबिका-अंबालिकांची आठवण मात्र कोणालाच झाली नाही. आपल्या थोरल्या बहिणी बरोबर विवाह-मंडपात त्या मिरवत होत्या. प्रत्येकजण जमलेल्या राजांपैकी कोणाला तरी माळ घालणार होती. पण भीष्माने तिघींनाही पळवून आणले. पळवून नेण्यामधे मानहानी नाही. कारण पळवून नेणारा हिकमती व शूर असावा लागे. पण भीष्माने त्यांना पळवले होते ते आपल्या दुर्बळ, आजारी भावासाठी, स्वतःसाठी नव्हे.
 आजारी विचित्रवीर्याचे लग्न इतक्या तातडीने करण्यात दोन उद्देश होते. एक, लग्न झाले तर मरायच्या आत मुले होण्याचा, निदान राण्यांना गर्भ राहण्याचा संभव होता. दुसरे, राजा मुलाशिवाय मेला, तरी लग्नाच्या बायका म्हणजे हक्काचे शेत. त्यांच्याकडून शेतमालकाच्या नावावर म्हणजे नवऱ्याच्या नावावर संतती उत्पन्न करून घेणे शक्य होई. हाच तो बीजक्षेत्रन्याय.
 लग्न झाल्यावर विचीत्रवीर्य काही वर्षे जिवंत होता. पण त्याला संतती झाली नाही; आणि शेवटी दिराशी संबंध ठेवूनच विधवा राण्यांना संतती उत्पन्न करावी लागली. आपल्या सासूला कुमारवयात मुलगा झालेला आहे.

।। संस्कृती ।।

५७

हे त्या बिचाऱ्यांना माहीतच नव्हते. एक दिवस सासू थोरल्या सुनेकडे येऊन म्हणाली, “बाई, संध्याकाळी तुझा दीर येईल त्याचे आतिथ्य कर." नटून- थटून ती पलंगावर पडली होती. मनात विचार चालले होते. "कदाचित भीष्म येईल. तो नाही, तर कुरूंच्या दरबारातील दुसरे कोण बरे येईल? " शेवटी उगवला तो एक भीषण दिसणारा, लाल डोळ्यांचा, पिंगट जटांचा ब्राह्मण. त्याला पाहून बिचाऱ्या अंबिकेने डोळेच मिटले. ह्या अवस्थेत तो तिला भोगून गेला व जो मुलगा झाला तो जन्मांध धृतराष्ट्र. सत्यवतीने व्यासाला नंतर दुसऱ्या सुनेकडे पाठविले. व्यासाचे रूप पाहून ती पांढरीफटक पडली आणि तिला झाला तो मुलगा पांडू.

 परत एकदा व्यासाला सुनांकडे पाठवायचे असा बेत सत्यवतीने केला. सत्यवतीपुढे सुनांना काही बोलता येईना. पण त्यांनी ह्या माणसाबरोबर न निजण्याचा निश्चय केला होता. त्यांनी एका दासीच्या अंगावर राणीची वस्त्रे व अलंकार चढविले व तिला व्यासाच्या दिमतीला ठेवले. दासी व्यासाला भ्याली नाही व शिसारलीही नाही. तिने व्यासाचे आदरातिथ्य केले. ह्या संबंधापासून झालेला मुलगा विदुर. पण कोण्या राणीपासून न झाल्यामुळे राज्याला अधिकारी नव्हता.
 ह्या एका कृत्याने त्या पकडून आणलेल्या परावलंबी बायांनी जे काय होत आहे, त्याबद्दलचा आपला विरोध प्रकट केला. महाभारताचे युद्ध त्यांना झालेल्या, व्यंग असलेल्या मुलांमुळे उद्भवले. महाभारतात सांगितले आहे की, राण्यांना व्यासाचे रूप सोसले असते, तर मुले निरोगी झाली असती. हे खरे घरले तर त्यांनी व्यासाला दर्शविलेल्या विरोधामुळे महाभारत युद्ध झाले, असेही म्हणता येईल. दुसऱ्या वेळी व्यासाचे आदरातिथ्य थोरल्या सुनेकडून झाले असते, तर कदाचित होणारे मूल अव्यंग निपजले असते. म्हणजे महाभारत कथेचा गाभा ज्याप्रमाणे ह्या राण्यांच्या विधवापणी अनिच्छेने केलेल्या पहिल्या संभोगात आहे त्याचप्रमाणे परत अशा तऱ्हेच्या मानहानीला तोंड द्यायचे नाही, ह्या निर्धारातही आहे. ह्याही सत्यवतीप्रमाणे मूकनायिकाच पण त्यांनी एकदा तरी आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडत असताना

५८

।। संस्कृती ।।

तिचा प्रतिकार केला. सबंध महाभारतात त्यांच्या तोंडी शब्द नाही. पांडू मेल्यावर सत्यवतीच्या सांगण्यावरून दोघी सासूबरोबर वनवासात गेल्या व तेथेच मेल्या.

 ज्या तीन बायकांच्यामुळे महाभारत कथेला जन्म मिळाला त्या ह्या तीन दुर्दैवी बायका. नशिबाने योजून ठेविलेले आपआपले कार्य त्यांनी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे उठविले. त्या निव्वळ यांत्रिक पराधीन आयुष्य जगल्या. हे आयुष्य अशा तऱ्हेचे होते की त्यांच्या कृत्याला चांगले-वाईट अशा तऱ्हेचे नैतिक मूल्यच देता येत नाही.

१९७१

।। संस्कृती ।।

५९