संस्कृती/धर्म

विकिस्रोत कडून

आठ


धर्म


 ‘ऊर्ध्वबाहुविरौम्येष न च कश्चिच्छृणोति माम् ।'
 'बाहू उभे हाकारितो । कोणी ऐकेनाचि मज ||'
 "व्यासांचे तुम्ही घेतलेले वचन उत्कृष्ट आहे; पण..."
 - तुमच्या मनात आलेली शंका मलापण आली होती. खरे म्हणजे मी लबाडी करायला पाहत होते. संस्कृतमध्ये अशा वचनांना तोटा नाही. ऐकिले म्हणजे पहिल्याप्रथम वाटते की, 'वावा, काय छान तत्त्व सांगितले आहे!' पण विचार करायला लागले की, लक्षात येते की, ज्या एका शब्दावर सर्व विचाराची इमारत, त्याच शब्दाचा अर्थ स्पष्ट व संशयातीत नसतो. 'धर्मात् अर्थः च कामः च केवढे मोठे तत्त्व गोविले आहे, असे वाटते. पण मग ध्यानात येते की, ज्या धर्मावर सर्व व्यवहार आधारावयाचा, तो 'धर्म' म्हणजे काय, हे सांगितलेलेच नाही. मला वाटले होते, मी व्यासांचा श्लोक देईन, तुम्ही खूष व्हाल ! अपेक्षेप्रमाणे झालातही खूष; पण तात्पुरत्याच तुमच्याही मनात आले की, धर्म म्हणजे काय हे जोवर स्पष्ट झाले नाही. तोपर्यंत ह्या ओळीचा वाटेल तो अर्थ करिता येईल. निदान लेखिकेला तरी 'धर्म' ह्या शब्दाने काय म्हणायचे आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे.
 'जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी ।।"
 'धर्म' म्हटला की, 'अधर्म' शब्द मनात येतोच. 'धर्म' ह्या शब्दाने काहीतरी चांगले, आचरणास योग्य असा बोध होतो, तर अधर्म म्हणजे काहीतरी वाईट, जे वर्ज्य करावे, टाळावे असे, असा बोध होतो. चांगले- वाईट, आचरणीय अनाचरणीय, उत्तम अधम ह्या जोड्या जी मूल्ये दाखवितात, त्यांच्या बाहेरचे, ज्याला ही विशेषणे लागू पडणार नाहीत, असे काही आहे काय?

६०

।। संस्कृती ।।

 "धर्म म्हणजे काय, ह्याचा विचार करिताना धर्मातीताशी आपल्याला काय कर्तव्य ?"

 - थोड्या वेळात कळेल. जरा दम धरा !
 आपल्या वेदान्त तत्त्वज्ञानात ज्याला काहीही विशेषण लागत नाही, जे सर्वमूल्यातीत आहे, असे एक सर्वव्यापी तत्त्व कल्पिलेले आहे. ह्या तत्त्वाला 'ब्रह्म' असे नाव दिलेले आहे. ह्या तत्त्वालाच शंकराचार्य 'पारमार्थिक सत्य' असे नाव देतात. ह्याशिवाय इतर जे काही आहे, त्याला ‘व्यावहारिक सत्य' असे नाव त्यांनी दिलेले आहे. पारमार्थिक सत्य हे अविनाशी आहे. त्रिकालाबाधित आहे, क्रियापदांनी व विशेषणांनी वर्णन न करता येण्यासारखे आहे. सर्व विश्व त्यात सामावलेले आहे; पण ते विश्वात सामावलेले नाही. सर्वात मौज म्हणजे ते 'ब्रह्म' म्हणून जे काय म्हणतात ते मी आहे, ते तुम्ही आहा, जे सर्व काही दिसते आहे, ते सर्व ब्रह्मच आहे.
 धर्म म्हणजे काय, ह्याचा ऊहापोह करण्याचा माझा काय अधिकार, हे आता तुमच्या ध्यानात आले असेलच. काही लोकांना वाटते की, 'रामकृष्णांसारख्या दैवतांच्या लौकिक आयुष्याबद्दल बोलणे क्षुद्र मानवांचे काम नाही; पूर्वकालीन मोठे राजे, योद्धे, ऋषी, द्रष्टे ह्यांच्या चरित्रावर साधकबाधक लिहीणे म्हणजे अविनयाची पराकोटी आहे. 'माझ्या ह्या क्षुद्र खटाटोपाला प्रत्यक्ष शंकर जरी मजल्यामजल्यांनी हसला व त्याने जरी आपल्या हास्यांचे प्रचंड हिमालय रचिले, तरी त्या उमामहेश्वरांच्या पायांवर डोके ठेवीन व म्हणेन की, 'मायबापांनो, मीपण ब्रह्म आहे. '
 दुसरे म्हणजे फक्त ब्रह्म जर त्रिकालातीत असेल, व तेच फक्त अविनाशी व नित्य असेल, तर 'धर्म', 'धर्म' म्हणून जे म्हणतात, ते पारमार्थिक, अविनाशी व नित्य अशा स्वरूपाचे सत्य नसून एक व्यावहारिक, सदा अपूर्ण व दिक्कालसापेक्ष असे काहीतरी आहे. ह्या धर्माचे स्वरूप समजावून घेण्यासाठी सध्या तात्पुरती एक व्याख्या करणे जरूर आहे. धर्म म्हणजे काय, ह्याचा विचार जसा पक्का होईल, तशी ती व्याख्या बदलून घेता येईल.

।। संस्कृती ।।

६१

 धर्म म्हणजे माणसाने समाजात वागावयाचे नियम. हे नियम लिखित असतील, किंवा अलिखित असतील. त्या नियमांचे कर्तृत्व संत, ऋषी, द्रष्टे किंवा प्रत्यक्ष देव यांकडे सोपविलेले असेल, किंवा परंपरागत वाडवडिलांपासूनची चाल आहे इतपतच असेल; त्या नियमांनुसार न वागणाऱ्याला उपहासापासून राजदंडापर्यंत काहीही शिक्षा असू शकेल. धर्माची अशी व्याख्या केली, म्हणजे जे इतर अनेक अर्थ आहेत. ते निदान ह्या विवेचनापुरते तरी संमत नाहीत, हे स्पष्टच आहे. येथे 'धर्म' हा शब्द इतक्या व्यापक अर्थाने योजिला आहे की, कोणत्याही मानवसमाजात रूढ असलेल्या आचारयंत्रणेला तो लागू पडावा. धर्म हा शब्द हल्ली आपण मराठीत निरनिराळ्या देवदैवतसंप्रदायांसाठी उपयोजितो. उदा. हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, इसाई धर्म वगैरे. संस्कृतात 'धर्म' शब्द ह्या अर्थाने वापरल्याचे लेखिकेला स्मरत नाही. दैवते, मरणोत्तर स्थिती, स्वर्गनरक ह्यांबद्दलच्या कल्पनांना 'धर्म' शब्द लावतात. पण तो ह्या विवेचनात संमत नाही. (अशा कल्पनांना 'संप्रदाय' किंवा 'दर्शन' शब्द योजिला आहे.) ह्या व इतर दर्शनांतून वागण्याचे विधीनिषेधपूर्वक नियमही सांगितलेले आहेत. त्या नियमांना पहिल्या व्याख्येप्रमाणे 'धर्म' हाच शब्द वापरणे बरे. धर्म हा शब्द बऱ्याचदा 'नैसर्गिक प्रवृत्ती' ह्या अर्थानेही वापरतात. उदा. "भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे', प्रयोगात 'प्रकृती' (शैत्यं हि यत् सा प्रकृतिर्जलस्य) किंवा 'स्वभाव' असे शब्द योजिलेले बरे. म्हणजे 'धर्म' हा शब्द फक्त वर दिलेल्या व्याख्येच्या अर्थानेच येथे योजलेला आहे. त्याच अर्थाने 'मानवधर्मशास्त्र' ह्या शब्दप्रयोगातही तो योजिलेला आहे. मनूने शास्त्रीय दृष्ट्या त्या वेळच्या समाजात रूढ असलेल्या सर्व आचारांचे विभाग पाडून निरनिराळ्या समूहांनी व व्यक्तींनी निरनिराळ्या प्रसंगी कसे वागावे ह्याचे जे विवेचन केले आहे, ते 'मानवधर्मशास्त्र'.

 मनूप्रमाणे इतर विचारवंतांनीही धर्मशास्त्रे लिहिली; व त्यांनाच आपण स्मृती म्हणतो. बौद्ध व जैन ग्रंथांतही आचार कसा असावा, ह्याबद्दल विवेचन आहे. मुख्यतः भिक्षू व जैन या दीक्षा घेतलेल्यांचे आचार कसे असावे, ह्यावर जरी मुख्य भर असला, तरी त्याच्या अनुषंगाने समाजातील इतर व्यक्तींचे

६२

।। संस्कृती ।।

व्यवहार कसे असावे, ह्याचेही विवेचन वरील ग्रंथांत आढळते. बौद्धांचे विनयपिटक व जैनांचे ‘आचारांगसूत्र' ('आयरंगसुत्त) ही मुख्य पुस्तके असली, तरी इतरही पुष्कळ पुस्तके ह्याबद्दल लिहिलेली आहेत. आचार कसा असावा ह्याबद्दल फुटकळ कविता संस्कृत, पाली व जैन प्राकृत ह्या भाषांतून इतकी आहे की, तिला गणतीच नाही. अर्वाचीन हिंदी भाषांमधूनही असे वाङ्मय अमाप आहे. गाणी, म्हणी, श्लोक, लोककथा वगैरेंमधून वागावे कसे, चांगली वागणूक कोणती व वाईट कोणती, ह्याबद्दलचे पिढ्यानुपिढ्यांचे साठवून ठेवलेले मत पहावयास व अभ्यासावयास मिळते. जी गोष्ट भारताची तीच इतर देशांची. सर्वच देशांतून अशा तऱ्हेचे लिखित नियम रूढ आहेत; श्रुती आहेत, स्मृतीही आहेत.

 वेद व ब्राह्मण यांतील काही भागाला श्रुती म्हणण्याचा प्रघात आहे. श्रुती म्हणजे दैवताकडून ऐकिलेले किंवा पाहिलेले काहीतरी. मंत्र रचणाऱ्या ऋषीला 'द्रष्टा' म्हणतात. त्याचप्रमाणे यज्ञक्रिया व तीबरोबर म्हणावयाचे मंत्र हेही काही व्यक्तींना दृष्टीगोचर झाले, अशा कथा आहेत. उदा. महिदास ऐतरेयाला अग्निष्टोमयज्ञाची सर्व क्रिया (मंत्रांसकट) दिसली, असे ऐतरेयब्राह्मणात लिहिलेले आढळते. अशा तऱ्हेचे अनुभव बायबल, कुराण वगैरे सांप्रदायिक ग्रंथांत तर आढळतातच; पण ज्यांच्या भाषेत लिपीचा संस्कारही झाला नाही, अशा वन्य समाजांतही आढळतात. लोवीने एका ग्रंथात अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या वायव्य प्रदेशात राहणाऱ्या काही वन्य जाती, दैवतविषयक चालीरिती व अनुभव दिले आहेत. तेथील एका माणसाला एक विशिष्ट विधी (तंबाखूची सांप्रदायिक पेरणी) व तो करीत असतानाची सर्व कृत्ये व गाणी (मंत्र) ह्यांचा दृष्टांत कसा झाला, ह्याची माहिती दिली आहे. ती वाचीत असता महिदास ऐतरेयाच्या कथेची आठवण होते. श्रौत वाङ्मयात निरनिराळे विधी, ते करावयाचा क्रम व त्यावेळी म्हणावयाचे मंत्र ह्यांचाच समावेश विशेष करून असतो. अशा तऱ्हेचे वाङ्मय वन्य व सुसंस्कृत अशा दोन्ही समाजांत फार प्राचीन काळापासून

।। संस्कृती ।।

६३

आढळते. अशा वाङ्मयात रोजच्या लौकिक व्यवहारात कसे वागावे, ह्याचे नियम फारसे नसतात; पण काही विधी कसे करावे, ह्याबद्दल अगदी बारीकसारीक तपशील असतो; लहानशी पण चूक होऊ नये म्हणून दक्षता घेतलेली असते. अगदी लहानशी चूक, मग ती मंत्राच्या उच्चारात असो, विधीच्या क्रमात असो, वा कोणी कोणते कृत्य कसे करावे ह्याबद्दल असो तिचे परिणाम फार विपरीत होतात, असाही समज सार्वत्रिक दिसून येतो, जगातील निरनिराळ्या श्रौत वाङ्मयांतून आचरणविषयक जे विधिनियम सांगितलेले आहेत, तेही 'धर्म' या नावाखाली येतात.

 मानवधर्मशास्त्र व त्यासारखी इतर धर्मशास्त्रे ह्यांना 'स्मृती' असे नाव दिलेले आहे. 'स्मृती' म्हणजे स्मरलेले. मागच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना सांगून जे परंपरागत नियम समाजात रूढ झाले, त्या 'स्मृती'. मनू, याज्ञवल्क्य वगैरेंना आपण स्मृतिकार असे म्हणतो. स्मृतिकारांनी आपापल्या पिढीत जे काही नियम रुढ होते त्यांचे संकलन केले, ते नियम एकत्र केले. क्वचित दोन-तीन निरनिराळ्या रूढी दिसून आल्या, तर काही निषिद्ध मानून काहींचा पुरस्कार केला. तर काही वेळा अमक्या प्रदेशात अमकी रूढी आहे. तर अमक्या प्रदेशात अशी आहे.' अशीही नोंद केलेली आढळते. जशा श्रुती सर्व समाजांत आढळतात, तशा 'स्मृती' ही सर्व मानवसमाजांत आढळतात.
 हजारो वर्षांपूर्वी बावेरू (बाबिलॉन) देशात हामुराबी म्हणून एक प्रख्यात राजा होऊन गेला. तो त्या देशाचा पहिला स्मृतिकार अशी बरीच वर्षे अर्वाचीन इतिहासकारांची समजूत होती. प्रत्यक्ष सूर्यदेव कायद्याचे पुस्तक हामुराबीला देत आहे, असे एक चित्र दगडावर कोरलेले आहे. त्यावरून हामुराबीने देवाच्या प्रेरणेने वागणुकीचे नियम केले. अशी कल्पना झाली. आता नवीन नवीन पुरावा हाती मिळाला आहे; व त्यावरून असे सिद्ध झाले आहे की, हामुराबीच्या आधी कित्येक शतके असे नियम अस्तित्वात होते; ते सर्व एकत्र करून हामुराबीने त्यांचे संकलन केले. मनू आपल्याकडील सर्वात पूज्य स्मृतिकार. हासुद्धा आपला पहिला राजा होता, अशी कल्पना आहे. अशाच तऱ्हेचे नियम जुन्या काळच्या ग्रीक लोकांना सोलोन नावाच्या

६४

।। संस्कृती ।।

विचारी शहाण्या पुरुषाने घालून दिले, अशी दंतकथा आहे. वन्य जमातींतूनही अशा तऱ्हेचे सर्वांना माहीत असलेले व सर्वमान्य नियम असतात; ते वाडवडिलांपासून परंपरागत आलेले असतात. ते नियम कोणी केले, ह्याबद्दल कधीकधी दंतकथा प्रचलित असतात. ते जरी अलिखित असले, तरी त्यांनाही स्मृती म्हणणेच योग्य होईल.

 श्रुती आणि स्मृती ह्यांच्या द्वारे संकलित केलेल्या नियमांखेरीज इतर हजारो बारीकसारीक नियम असतात. ते लिहिलेले नसतात. त्यांचा कर्ता कोण असतो, ते कोणाला माहीत नसते. पण माणसांनी त्याप्रमाणे वागावे, अशी माणसांची अपेक्षा असते.
 असे वागावे, असे वागू नये, असे नियम बनण्याच्या क्रियेत दोन गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. पहिली म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचे सामाजिक मूल्यमापन व दुसरी म्हणजे जे चांगले ते करायला लावण्याचे सामाजिक सामर्थ्य. ही असल्याशिवाय धर्माचा उगम व विकास होणार नाही व धर्म टिकून राहणार नाही.
 चांगल्या वाईटाचा विवेक किंवा मूल्यांची कल्पना ही एक सामाजिक पसंती किंवा नाराजी व्यक्त करितात. त्या पसंतीचा किंवा नाराजीचा ठसा व्यक्तीच्या मनावर उमटतो व त्यातूनच मूल्यांची कल्पना व्यक्तींच्या मनात पहिल्याने उगवते. 'जे करू नये ते केले,' ही भावना माणसालाच असते असे नव्हे, तर जनावरालासुद्धा असते. कुत्र्यासारख्या हुशार प्राण्याच्या बाबतीत तर ही प्रकिया उत्तम दिसते. अमक्या खुर्चीवर बसलेले धन्याला आवडत नाही, हे कुत्र्याला पक्के माहीत असते. धनी आलाच तर ते झटकन उठते व पळून जाते किंवा अपराधी चेहरा करून, शेपूट हलवून आपला अपराध लपवू पाहते. मुलांच्यावर केलेल्या काही प्रयोगात ही गोष्ट फार उत्तम तऱ्हेने सिद्ध झाली आहे. तीनचार मुली ह्या प्रयोगासाठी निवडल्या होत्या. प्रत्येकीला खेळणी दिली होती. खेळण्यांचे जोड होते. पैकी 'एक जोड आपल्या मैत्रिणीसाठी बाजूला काढून ठेव व दुसऱ्याने खेळ,' असे प्रत्येकीला सांगितले होते; व मुली काय करतात, ते गुप्तपणे पाहण्याची व्यवस्था केली

।। संस्कृती ।।

६५

होती. खेळण्यांच्या जोडांपैकी एक जोड फार सुबक होता, व दुसरा वाईट होता. एका मुलीने वाईट जोड मैत्रिणीसाठी म्हणून बाजूला ठेविला; व चांगली खेळणी घेऊन ती खेळण्यात गर्क झाली. दुसरी दोन्ही जोडांकडे पाहत बसली. तोंडाने म्हणत होती, 'बाबी चांगली मुलगी आहे. चांगला खेळ ती मैत्रिणीला देते. आई बाबीला शाबासकी देईल!' तिने चांगला जोड मैत्रिणीसाठी ठेविला; व वाईट घेऊन खेळत बसली. पण अधूनमधून त्या चांगल्या जोडाकडे निराशेने पाहत पाहत पुटपुटत होती. तिसरीने दोन्ही जोड पुढे ठेविले. वाईट जोड हातात घेतला; व ती म्हणाली, 'हा जोड वाईट दिसला, तरी खरोखर जास्त चांगला आहे. त्या दुसऱ्या जोडीतील बाहुल्या किती जड! ह्या कशा हलक्या आहेत!' वगैरे. नंतर तिने वाईट जोड मैत्रिणीसाठी ठेवून ती चांगला जोड घेऊन खेळू लागली. ह्या तीन मुलींपैकी पहिलीच्या अंतःकरणात सामाजिक मूल्यांचा प्रवेश झालाच नव्हता. अगदी नैसर्गिकरीत्या तिला जे जास्त चांगले दिसले, ते तिने घेतले. दुसऱ्या दोघींना सामाजिक मूल्यांची पूर्ण जाणीव होती. पैकी एकीने 'समाजाची पसंती' मिळेल असे वर्तन केले; व शेवटलीने सामाजिक मूल्यांच्या विरुद्ध वर्तन करून जणू काय आपण त्या मूल्यांबरहुकूम बागलो, अशी ती स्वतःची व इतरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होती. पहिलीच्या वागण्याला समाजाने नागडा स्वार्थ म्हटले असते. शेवटलीचे वागणे दांभिकपणाचे

होते; ती सामाजिक मूल्यांना तोंडदेखले चांगले म्हणत होती.
 हा प्रयोग विस्ताराने देण्याचे कारण सामाजिक मूल्ये व्यक्तिगत कशी होतात, ते ह्यावरून कळावे हे. आपल्या भोवतालच्या व्यक्तींच्या मतांचा व वर्तनाचा ठसा लहान मुलांच्या मनावर जन्मल्या क्षणापासून उमटत असतो. शब्दांचे अर्थ कळायच्या आतच त्या शब्दांमागील भावना लहान मूल समजू भावना विधीनिषेध दर्शवितात; व त्यांचे पडसाद मुलांच्या अंतःकरणात शकते; व त्याचे कोवळे संस्कारक्षम मन त्या भावनांना साद देत असते. ह्या उमटत असतात. व्याकरणाचे कसलेही नियम माहीत नसून मूल बोलायला शिकते. विशिष्ट ध्वनिसमूह व त्याला चिकटलेला अर्थ हे दोन्ही सर्वस्वी सामाजिक संकेत आहेत. त्यांमागे वर्षसहस्त्रकांची सामाजिक परंपरा असते.

६६

।। संस्कृती ।।

अगदी तोच प्रकार आचार व त्याचे मूल्यमापन ह्यांच्या मुळाशी असतो. अमका चांगला का, ह्याचे ज्ञान होण्याच्या आधीच समाजधर्माचे आकलन त्याला झालेले असते. आईबाप, भावंडे, कुटुंबातील इतर माणसे, शेजारी- पाजारी, सवंगडी ह्या सर्वांनी मिळून सामाजिक मूल्ये व्यक्तीच्या गळी उतरविलेली असतात. व्यक्तीचा देह परंपरागत रितीने तयार केलेल्या अन्नावर पोसतो, तर व्यक्तीचे मन परंपरागत आचार विचार आत्मसात करून विकसित होत असते. लहानपणचे संस्कार म्हणजे मनाची प्रकृतीच होऊन जाते. ज्या अंतःकरणाच्या प्रवृत्ती प्रमाण म्हणून कालिदास सांगतो. त्या ह्या अशा विचार करण्याची शक्ती येण्याच्या आतच तयार झालेल्या असतात. काही व्यक्तींच्या जीवनात सामाजिक मूल्यांबद्दल विचार करण्याचा प्रसंगच येत नाही. पण बऱ्याच व्यक्तींना कधी-ना-कधी तरी समाजाची अपेक्षा व व्यक्तीगत आकांक्षा ह्यांमध्ये विसंगती जाणवते; व मग सामाजिक मूल्यांच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार सुरू होतो.

 समाजाच्या मूल्यांचे ज्ञान व स्वीकार व्यक्तीकडून कसा होतो, हे आपण थोडक्यात पाहिले. सामाजिक मूल्यांची उत्पत्ती होते कशी, ह्याचे उत्तर संपूर्णतया देण्याचे हे स्थान नव्हे; पण त्याचा विचार करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 'सामाजिक मूल्ये ही एकदा बनली: कशी कोण - जाणे!' असे म्हणण्याचे कारण नाही. ती सदैव नवनवी बनत असतात. जुनी नष्ट होतात, किंवा बदलत जात असतात. आजच्या समाजात ज्या क्रिया चाललेल्या आहेत, तशाच पूर्वीही चालत असल्या पाहिजेत, हे तर सर्व शास्त्रीय ज्ञानाचे व संशोधनाचे सूत्र आहे. आज जशी मूल्ये बनताना आपण पाहतो, तशीच क्रिया अव्याहत चालत असली पाहिजे. मूल्ये फक्त समाजजीवनातच उत्पन्न होऊ शकतात. मनुष्याचे लहान मूल एकाकी वाढणे शक्य नाही. पण कोणी जनावराने एखादे मूल वाढविले, किंवा एखाद्या मुलाला जनसंपर्कापासून दूर एखाद्या खोलीत कोंडून घालून वाढविले, अशा गोष्टी झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने वाढलेला मानव मनुष्याचे म्हणून म्हटले जाणारे कोणतेच व्यवहार करू शकत नाही. त्याला दोन पायांवर चालता येत नाही, की शब्दोच्चार करता येत नाही. व्यक्ती व तिचे व्यक्तित्व ही फक्त समाजजीवनात उत्पन्न होऊ शकतात. 'मी'चा उगम 'आम्ही'तून होतो.

।। संस्कृती ।।

६७

 'आम्ही' म्हणजे व्यक्तींचा लहान-मोठा समूह. ह्या समूहाची मूल्ये, वागणुकीचे नियम निरनिराळ्या तऱ्हेचे असतात. काही अगदी सर्वस्वी वस्तुनिष्ठ व अनुभवजन्य असतात. एखादा वन्य समाज असेल, तर काय खावे, ह्याबद्दलचे नियम बहुतकरून वनात मिळणाऱ्या आहाराबद्दलच्या अनुभवातून जन्माला आलेले असतात; काय ल्यावे, हे काय मिळते त्यावर अवलंबून असते. भोवतालच्या सृष्टीबद्दलचे ज्ञान ह्या नियमांतून वापरलेले दिसते. पण ह्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारलेल्या निमयांखेरीज इतर असंख्य नियम असे असतात की, त्याला बुद्धी व वास्तवता ह्यांच्या कसोट्याच लागू पडत नाहीत. आधिदैविक व्यवहाराबद्दलचे सर्व नियम व आधिभौतिक व्यवहाराचेही बरेचसे नियम ह्या कोटीतील असतात. जगात फक्त मनुष्य, इतर प्राणी व वनस्पती एवढेच असतात, असे नाही. त्याखेरीज सर्वस्वी अदृश्य, कधी काही प्रसंगीच दृश्य, मनुष्यासारखे किंवा इतर प्राण्यांसारखे उपकारक किंवा दुष्ट अशा निरनिराळ्या योनींतील व्यक्ती माणसांबरोबर राहतात. मंत्रतंत्रांनी त्यांना वश करता येते, त्यांच्यावर हुकमत गाजविता येते, किंवा अशी सृष्टी सर्वस्वी मानवी शक्तीच्या कह्याबाहेर असते, अशा तऱ्हेच्या सृष्टीची कल्पना सर्व मागासलेल्या व प्रगत मानवसमाजात असते. अशा सृष्टीला उद्देशून करावयाच्या व्यवहारात एका दृष्टीने विलक्षण विविधता व एका दृष्टीन आश्चर्यकारक साम्य आढळते. काय खावे, काय ल्यावे हे परिस्थिती ठरविते; पण कसे खावे, कसे ल्यावे, कसे रहावे, वगैरे व्यवहार ह्या आधिदैविक कल्पनांवर आधारलेले असतात. पुष्कळदा काय खावे हे देखील असल्या कल्पनांवर आधारलेले असते. उत्तरध्रुवाभोवतालच्या सदैव बर्फाच्छन्न गोठलेल्या पट्ट्यात राहणारे एस्किमो म्हणून लोक आहेत; पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ते फक्त मांसाहार करीत. कोणत्याही तऱ्हेची शाक त्यांच्या खाण्यात नव्हती; मांसही सर्पणाच्या अभावी कच्चेच खावे लागे. खाण्याचे जिन्नस प्रकार सर्वस्वी परिस्थितिजन्य होते. इतर लोकांच्या बाबतीत मात्र खाणे इतके परिस्थितिजन्य नसते. भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी चालते; व तेथील बहुतेक लोक मासे खातात. पण आंध्र, तमीळ,
६८

।। संस्कृती ।।

नंबुद्री, सारस्वतांखेरीज मराठी ब्राह्मण व गुजराती ब्राह्मण मासे खात नाहीत. मुसलमान व ज्यू लोकांना डुकराच्या शरीरात सैतानाने प्रवेश केला, म्हणून डुकराचे मांस वर्ज्य आहे. तर गाईच्या शरीरात सर्व देव असतात म्हणून हिंदू गाईचे मांस खात नाहीत. तसेच कपड्यांचे आहे. वर सांगितलेले एस्किमो लोक पायाच्या तळव्यांपासून केसांपर्यंत सर्व अंग झाकेल, असे शरीराच्या मापाप्रमाणे बेतून, कापून चामड्याचे कपडे शिवतात; झोपताना सर्व कपडे काढून झोपतात. ही पद्धत परिस्थितिजन्यच नव्हे, तर बुद्धीला पटेल, अशी वाटते. पण बाकी इतर रानटी व पुढारलेल्या लोकांत पोषाख एकाच हवामानात निरनिराळा असतो; व तो निरनिराळ्या असण्याची कारणे बहुधा काही बुद्धीला पटतील अशी, तर काही सर्वस्वी बुद्धीपलीकडची असतात. डोक्याला आवरण असावे का नसावे, कोणत्या प्रसंगी असावे, बायकांनी उघड्या डोक्याने जावे, का केस सूर्याला दिसू नयेत म्हणून त्यावर फडके बांधावे, की पदर घ्यावा, स्तन झाकावे की नाही, कमरेभोवतालचे वस्त्र पायघोळ असावे की गुडघ्यापर्यंतच असावे, वस्त्र कोणत्या वस्तूचे व तंतूंचे असावे, - वगैरे गोष्टी काही बाबतींत परिस्थितीवर अवलंबून असल्या, तरी बहुतांशी बुद्धीला न पटणा-या व परंपरागत कल्पनांवर आधारलेल्या आहेत.

 निरनिराळ्या लोकांचे रीतिरिवाज निरनिराळे असण्याची कारणे काय असावीत, ह्याबद्दल आपण थोडक्यात वर विवेचन केले. प्रत्येक समाज निरनिराळ्या भौतिक परिस्थितीत वाढलेला असतो. प्रत्येकापुढे जीवनाच्या झगड्यात निरनिराळे प्रसंग आलेले असतात. त्या प्रसंगांना तोंड देता देता काही रिवाज निर्माण होतात. त्यांच्याच जोडीला काही विशिष्ट आधिदैविक कल्पनांमुळेही व्यवहाराला वळण लागते. सौंदर्यकल्पना, नव्याची आवड, जेत्यांचे वा पुढाऱ्यांचे अनुकरण वगैरेंमुळे काही नियम आलेले असतात. समाजात रूढ असलेले आचार जो आचरतो तो चांगला, आचरीत नाही तो वाईट, हे ओघानेच आले; त्याचबरोबर आचारांनाही चांगले-वाईटपणा आला. लहान मूल सारखे भोवतालच्या माणसांचे अनुकरण करीत असते; त्याचप्रमाणे

।। संस्कृती ।।

६९

वडीलधारी माणसे त्याच्याकडून निरनिराळी कृत्ये करून घेत असतात, व त्याला शाबासकी अगर शिक्षा देत असतात. संस्कृतीचे एका पिढीकडून दुसरीकडे संक्रमण होते ते ह्याच मार्गाने. लहानपणी सामाजिक आचार आत्मसात होतात. त्या वेळी त्या आचारांमागे कारणपरंपरा काय आहे हे माहीत नसते, व जाणण्याची शक्ती नसते. भोवतालच्या आचाराविचारांशी समरस होण्याने जीवन सुकर होते; व ते तसे करण्याची वृत्ती लहान मुलांत दिसून येते. लहानपणी आत्मसात केलेल्या आचारविचारांभोवती तीव्र भावनांचे वलय असते. अमके चांगले, तमके वाईट, अमके मंगल, तमके अमंगल, अमके आदरणीय, तमके गर्ह्य, अमके शास्त्रीय, तमके अशास्त्रीय अशी मते ठाम बनलेली असतात. आपले आचारविचार योग्य, इतरांचे तसे नव्हेत; एवढेच वाटून थांबत नाही; तर आपले ते नैसर्गिक इतरांचे ते विकृत, अशीही दृढ भावना होते. रोज स्नान करणे हा आचार स्वच्छतेचाच नव्हे, तर मांगल्याचा निदर्शक आहे, असे आपल्याला वाटते. जगातील कित्येक प्रदेशात पाण्याच्या अभावी किंवा थंडीच्या प्रभावामुळे हा आचार पाळणे शक्यही नसते व इष्टही नसते. तिबेटातील पवित्र व आदरणीय समजले. जाणारे, मांगल्याची मूर्ती असे धर्मगुरु लामा कधी आंघोळ करितात की नाही, परमेश्वरालाच ठाऊक! आपले वेदकालीन पूर्वजही आंघोळीला फार महत्त्व देत असत, असे नाही. लामणदिवा, निरांजन, उदबत्ती ही आपण मांगल्याची प्रतिके समजतो. रॉकेलचा दिवा किंवा विजेचा दिवा आपण मंगलकारक समजत नाही. थोडा विचार केला, तर लक्षात येईल की, रॉकेल किंवा वीज माहिती होण्याआधी पिढ्यानुपिढ्या निरांजन व लामणदिवा देवघरात व मुंजीच्या लग्नाच्या व इतर प्रसंगी आपण लाविलेला पाहिला आहे; येथे बुद्धीपेक्षा भावनेचाच भाग जास्त आहे. देवापुढे तुपाचा दिवा लावायचा, हविर्द्रव्य तूपच असावे, हे आचार वेदकालीन पूर्वजांकडून आलेले आहेत. आजही उत्तरेकडे थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना वनस्पतिजन्य तेले माहीत नाहीत. सर्व लौकिक व दैनिक व्यवहार प्राण्यांपासून मिळणाऱ्या आज्य (शेळीच्या दुधाचे तूप), धृत व इतर चरबी ह्यांवरच
७०

।। संस्कृती ।।

चालतो. देवनागरी लिपी फार शास्त्रशुद्ध आहे, जगातील सर्व भाषांतील उच्चार त्या लिपीत लिहिता येतात, असा पुष्कळांचा दावा आहे परंतु जगातील इतर भाषा तर राहोत, पण भारतात बोलण्यात येणाऱ्या कित्येक भाषांतील उच्चार देवनागरीत लिहिता येत नाहीत. बंगालीतील 'ऑ' हा तमीळमधील दोन 'र' ही दोनच उदाहरणे पुरेत. मायेमुळे माणूस वेडे होते म्हणतात, ते आचारविचारांच्या बाबतीत फार तीव्रतेने दिसून येते. आपल्या समजल्या जाणाऱ्या माणसांचे आचारविचार श्रेष्ठ वाटतात. नैसर्गिक वाटतात, शास्त्रशुद्ध वाटतात; इतरांचे अधम, भयावह वाटतात.

 एखाद्या समाजाच्या आचाराचे नियम म्हणजे धर्म, अशी व्याख्या केली. धर्म बहुतांशी आचारप्रधान असतो. पण स्वतःच्या आचारासंबंधी विचार करणे ही मनुष्याची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. 'अमके निषिद्ध, तमके वैध, असे का?' असा प्रश्न मानवजातीतील सर्व विचारवंत हजारो वर्षे विचारीत आले आहेत. जे करणीय ते 'सत्', जे निषिद्ध ते 'असत्' हे समीकरण नेहमीच पटत नाही. त्याचप्रमाणे आचरणामागे मन असते. 'सत्' व 'असत् हे गुण आचरणाचे की विचाराचे, हाही प्रश्न सर्व विचारवंतांनी चर्चिलेला आहे. जर क्रिया. मग ती सक्रिया का असेना, यंत्राप्रमाणे होत राहिली, तर तिला काही मूल्य आहे का? ज्यांनी उच्चतम धर्माचे विवेचन केले आहे. त्यांना धर्म मनोमय वाटतो.
 'मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।
 मनसा चे पदुद्वेन भासते वा करोति वा ।
 ततो नं दुक्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ।।
 कृती व विचार ह्यांपैकी प्रथम काय, असा विचार केला तर पहिल्याने कृती, मग विचार, असेच म्हणावे लागेल. काही मानसशास्त्रज्ञ तर असे म्हणतात की, जोपर्यंत कृती काही अंतराय न येता फलापर्यंत जाऊन पोहोचते, तोपर्यंत विचार उद्भवतच नाही. कृतीत अडथळे आले की, प्राणी थांबून विचार करतो. पण ही झाली सर्वसामान्य कृतीची गोष्ट. ज्याला आपण धार्मिक आचार म्हणतो, तो विचारपूर्वक, बुद्धिपुरःसर (मनः पूर्वंगम)

।। संस्कृती ।।

७१

असावा, असा कित्येक विचारवंतांचा आग्रह आहे. 'धर्म म्हणजे आधिदैविक कल्पनांवर आधारलेला आचार एवढ्यापुरताच धर्म शब्दाचा अर्थ मर्यादित केला, तर असे दिसून येईल की, जगातील बहुतेक संप्रदाय 'धर्म मनोमय असावा,' असे तोंडाने म्हणत असले, तरी परंपरागत आचारधर्मावर त्यांचा मोठा भर असतो. कित्येक वेळा हा आचारधर्म इतका मांत्रिक यांत्रिक बनतो की, नीती-अनीतीच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातील सर्व मूल्ये नाहीतशी झाल्यासारखी वाटतात. निसर्गाचे नियम जसे सर्वांना लागू असतात, त्या बाबतीत सर्वसाधारणपणे जसा विचाराचा भाग नसतो, तसे सांप्रदायिक आचाराचे होते. झाडावरून फळ सुटले की ते खाली पडणारच, किंवा स्वेच्छेने वा नकळत आगीशी संबंध आला की अवयव भाजणारच, सांप्रदायिक आचाराचे होऊन जाते. 'अजित नाम वदो भलत्या मिषें। सकळ पातक भस्म करीतसे।' ह्या व्यवहारात केवळ यांत्रिकपणाच राहतो. नामस्मरणाला मोल आहे असे ठरले, म्हणजे जितके अधिक वेळा नाव घ्यावे. तितका मूल्याचा (पुण्याचा) ठेवा अधिक; मग स्मरणीचे मणी ओढले की एक-एक मोजीत बसण्याची यातायात नको. जर पुण्यकारक मंत्र वा नाव एखाद्या चाकावर पुनःपुन्हा लिहिले (१००वेळा, २०० वेळा वगैरे) व ते चाक फिरविले, तर एका फेऱ्यात १०० किंवा २०० नामस्मरणे होतात, व जितक्या वेळा चाक फिरवावे, तितके पट पुण्य पदरी पडते, ही तिबेटी बौद्धांची युक्ती. म्हणजे वर सांगितलेल्या तांत्रिकपणाची परिसीमा झाली.

 सांप्रदायिक व्यवहारात शब्द व कृती ह्यांना विशेष महत्त्व चढते; त्यामागचा 'अर्थ म्हणजेच विचार नाहीसा होऊ लागतो. मंत्रातील एक शब्द जरी चुकला, तरी सर्व क्रिया फुकट जाते; व क्रिया करिताना एक जरी गोष्ट सांगितल्यापेक्षा निराळी झाली, तरी क्रियेचे मोल जाते. असा हा आचारधर्म कालमानाप्रमाणे बदलणे कठीण होते; व कधीकाळी अर्थ असलेल्या सर्व क्रिया अर्थहीन किंवा त्यापेक्षाही भयंकर म्हणजे अनर्थकारक होऊन बसतात. सांप्रदायिकांचे कर्मकांड म्हणजे एके काळी आत्मा असलेली जिवंत संस्कृती; पण आता ती मरून केवळ खटपटींचा व क्रियांचा सांगाडा तेवढा उरलेल्या

७२

।। संस्कृती ।।

भुतांचा वर्तमानकाळात चाललेला हैदोस होय. संप्रदायांच्या जागतिक इतिहासाकडे नजर टाकिली, तर असे दिसून येईल की, कर्मकांड व तत्वचिंतन ह्यांचा झगडा अखंड चालू असतो. काही वेळा तत्त्वचिंतनाला महत्त्व दिले जाते, पण सांप्रदायिकत्व हे बव्हंशी चिंतनाला मारक व कृतीला पोषक असते.

 पण ह्या प्रश्नाला असलेली दुसरी बाजू महत्त्वाची आहे. धर्माच्याद्वारे सामाजिक व्यवहाराचे नियंत्रण होते. व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, पण विचारांवर नियंत्रण ठेवणे मोठे कठीण आहे. समाजजीवन हे बव्हंशी कृतीमय असते. व्यक्तीचे परस्परसंबंध, व्यक्तींचे समूहांशी संबंध व समूहांचे परस्परसंबंध ह्यांचे स्वरूप कृतीतच दिसून येते; आणि ते कसे असावे. ह्याबद्दल काही नियम बांधिलेले असतात. नवरा-बायको, आई-बाप व मुले, शिष्य आणि गुरु, मालक आणि नोकर वगैरे असंख्य व्यक्तीव्यक्तींचे संबंध असतात. निरनिराळ्या नात्यांनी जोडलेली कुटुंबे, घरमालक व नगरपालिका, कर देणारे व कर घेणारे यांतील संबंध सामूहिक स्वरूपाचे असतात व त्या बाबतीत परस्पर वर्तणूक कशी असावी, ह्याबद्दल काही ढोबळ नियम असतात. मनुष्य आपल्या आयुष्यात एक प्रकारे निरनिराळ्या भूमिका करीत असतो. ह्या भूमिका कशा पार पाडावयाच्या, ह्याचे जे परंपरागत आदेश, ते सर्व मिळून समाजातील परस्पर-व्यवहाराची एक चौकट बनते. हे नियम सर्वांना माहीत असतात; व त्यांचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सारखे होत असते. त्यामुळे कोणतीही विशिष्ट भूमिका वठवावयाला दर वेळेला विचार करावा लागत नाही. ह्या नियमाप्रमाणे भूमिका वठविणे हे मनुष्य जवळजवळ नकळत करीत असतो. प्रत्येक व्यवहार करताना 'आता काय बरे करावे?' असा प्रथम विचार करून मग तो करायचा असे म्हटले, तर सामाजिक जीवन अशक्यच होऊन जाईल. शारीरिक व्यवहारांच्या बाबतीत सवयीने व अति अभ्यासाने आत्मसात केलेल्या हालचालींना जे स्थान, तेच स्थान ह्या सामाजिक व्यवहाराबद्दलच्या नियमांना आहे. उदा. मनुष्याचे मूल जर मनुष्यापासून दूर काढले, तर

।। संस्कृती ।।

७३

त्याला चालता येत नाही. चालणे ही एक लहानपणी शिकण्याची कला आहे. तीच गोष्ट भाषेबद्दलची. मोठेपणी मनुष्य चालतो व बोलतो ते विचार न करता अगदी नैसर्गिक होऊन जाण्याइतके अंगवळणी पडतात. डोक्यावरचा पदर न ढळणे हे मराठमोळ्या स्त्रियांना अगदी नैसर्गिक वाटते. नवऱ्याच्या किंवा बायकोच्या नावाचा उच्चार न करताही त्यांच्याबद्दल जुन्या स्त्रीपुरूषांना सफाईने बोलता येत असे. अशी उदाहरणे असंख्य देता येतील. हे नियम जितके सर्वमान्य, तितके वडील पिढीकडून त्यांचे नव्या पिढीकडे संक्रमण व तिच्याकडून आत्मसात होण्याची क्रिया ही बरीचशी बिनबोभाट होते. समाजातील व्यवहार सुरळीत चालण्यासाठी हे नियम व त्यांना अनुसरून केलेल्या क्रिया ह्या अत्यावश्यक आहेत. नुसता विचार किंवा हेतू कितीही चांगला असला, तरी क्रियेशिवाय त्यांनी समाजाचे कल्याण होणार नाही; आणि कोणती क्रिया कशी करावयाची, ह्याबद्दलचे काही नियम नसले, तर मनुष्याला काहीच क्रिया करिता यायची नाही. प्रत्येक समाज, मग तो. जुन्या परंपरांना चिकटून असो; वा क्रांतीवर आधारलेला नवसमाज असो, त्याला विधीनिषेधपूर्वक नियमांची चौकट ही असावीच लागते. विचाराशिवाय करीत गेलेल्या कृतींना वरती 'जीव नसलेले सांगाडे' म्हटले आहे, तर विधिनियम नसलेल्या समाजाला 'कोठल्याही तऱ्हेचे शरीर नसलेला कृतिशून्य जीव' म्हणावे लागेल. अर्थात आचार नियमांशिवाय किंवा आचार नियमांविषयीच्या विचाराशिवाय मनुष्यसमाजच असत नाही.

 निरनिराळ्या मानवसमाजांचा इतिहास पाहिला, तर आपल्याला प्रचंड उलाढालींचे काही काळ आढळून येतात. वागणुकीच्या सर्व जुन्या नियमांविषयी लोक साशंक होतात; व ते झुगारून देऊ पाहतात; नवे नियम अस्तित्वात आलेले नसतात किंवा सर्वमान्य झालेले नसतात. अशा तऱ्हेच्या अवस्थेला प्रमाणशून्यता (Anomie) म्हणतात. नॉर्म म्हणजे प्रमाण सर्व तऱ्हेच्या व्यवहाराचे नियम हे त्या-त्या वागणुकीचे प्रमाण ही प्रमाणे नाहीतशी झाली, म्हणजे प्रमाणशून्यता उद्भवते. ही प्रमाणशून्यता सर्वसाधारण मनुष्य समाजात काही व्यक्तींच्या बाबतीत काही वागणूकींच्या बाबतीत आढळते;

७४

।। संस्कृती ।।

पण तिचा विशेष फैलाव निरनिराळ्या संस्कृतीचे समाज एकत्र आले व संस्कृतिसंक्रमण होऊ लागले, म्हणजे विशेष आढळतो. हल्ली वर्तमानपत्रे, रेडियो व प्रवासाची साधने ह्यांमुळे जगातील सर्वच समाजांचे एकमेकांवर पूर्वी कधी नव्हे इतके आघात व प्रत्याघात होत आहेत. त्यामुळे उद्भवणारी प्रमाणशून्यता आशियाई राष्ट्रांमध्ये विशेष ठळकपणे दिसून येते; पण इतरही राष्ट्रांत थोड्याबहुत अंशाने ती दिसते. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात बहुतेक सर्व जमातींतील स्त्रिया नऊवारी लुगडे नेसत असत. सध्या लुगडे कोणत्या पद्धतीने नेसावे, लुगडे नेसावे की फ्रॉक घालावा की विजारी घालाव्या, ह्याबद्दल सर्वमान्य नियम नाही. पुरुषांच्या बाबतीतही असेच दिसून येते. नवीन पिढीत धोतरे नेसणारे, गंध लावणारे पुरूष हल्ली क्वचितच दिसतात; पण धोतर किंवा पायजमा किंवा सुरवार किंवा इंग्रजी पद्धतीची लांब वा आखूड विजार, व तीवर साधा अंगरखा, शर्ट असे पोषाखाचे प्रकार दिसतात. फक्त वस्त्रासारख्या क्षुल्लक बाबतीतच असे आहे असे नसून खाणेपिणे, बोलणे-चालणे, सांप्रदायिक आचार व सर्व तऱ्हेचे विचार यांत एकाच समाजात एकाच काळी प्रचंड विविधता दिसते आहे. हीही एक प्रकारची प्रमाणशून्यताच आहे. समाजरचना झपाट्याने बदलत आहे; त्या बदलाचेच एक चिन्ह आहे.

 सर्वमान्य वागणुकीला काही मोल आहे; व ते मोल निरनिराळ्या तऱ्हांनी प्रत्ययास येते. सर्वमान्यत्व ही गोष्ट इतकी मोलाची आहे की, तीसाठी माणूस वाटेल ते करावयास तयार होतो. 'सासवेचे बोल ऐकल्याने काय जाते । माहेराचे नाव होते ।' ह्या अगदी घरगुती भावनेपासून तो 'कीर्तिरूपे उरण्या' च्या इच्छेपर्यंत सर्व काही त्यात येते. नुसते नावच होते असे नव्हे, तर अशा वर्तणुकीसाठी समाज काही काल्पनिक अदृश्य, तर काही लौकिक दृश्य अशी बक्षिसेही देऊ शकतो. स्वर्ग, मोक्ष, व्यवहारात प्रतिष्ठा व त्याबरोबरच संपत्ती अशी ती असतात. ह्या उलट भोवतालच्या समाजाला नावडणारी कृत्ये केली, तर नाक मुरडणे, छी-थू होणे, त्यांखेरीज काही काल्पनिक व काही इंद्रियगोचर दृश्य अशा शिक्षाही समाज करू शकतो. सर्व समाजात

।। संस्कृती ।।

७५

समाजाची नियंत्रक शक्ती शिक्षेच्या रूपाने सर्वांच्या प्रत्ययास येते. समाजाला आवडणारी कृत्ये व समाजाला नावडणारी कृत्ये व त्यांना मिळणारी बक्षिसे व शिक्षा ह्यांचे मुख्यतः तीन प्रकार असतात. विशेष दैवतवादावर आधारलेल्या मताला हल्ली वाङ्मयात 'धर्म' म्हणतात; व ह्या स्थळी त्याला आपण 'संप्रदाय' म्हटले आहे. सांप्रदायिक दृष्ट्या जे समाजाला पर्यायाने संप्रदायाला- आवडते त्याला 'पुण्य', व जे नावडते त्याला 'पाप', अशा संज्ञा आहेत. इतर लौकिक व्यवहारात, विशेषतः जेथे समाजाची दंडयंत्रणा कामी येते, अशा वेळी न आवडणाऱ्या कृत्यांना 'गुन्हा' किंवा 'अपराध' म्हणतात. समाजात दुष्कृत्यांना दंडण्यासाठी पुष्कळ संस्था असतात. सत्कृत्यांना उत्तेजन देणाऱ्या संस्था त्या मानाने कमी असतात. तिसरी जोडी चांगले-वाईट, 'सत्-असत् ह्या शब्दांनी सूचित केली आहे. ह्या प्रकारात कृत्य व त्यामागची बुद्धी ह्यांचा विचार केलेला असतो; व बहुतेक वेळी फक्त एका समूहापुरतीच दृष्टी मर्यादित न ठेविता ती बरीच व्यापक असते. ह्यालाच नीतिविचार म्हणतात. पाप व पुण्य हे प्रत्येक समाजाच्या सांप्रदायिक मतावर अवलंबून असते; गुन्हा किंवा निरपराधित्व त्या-त्या वेळच्या कायद्यावर अवलंबून असते; पण 'सत्' व 'असत्' हे शब्द जे मूल्य दर्शवितात, त्यात मनुष्यसमाजाचा खोलवर विचार केलेला असतो, व ते बऱ्याच अंशी विशिष्ट समाज व विशिष्ट काळ ह्यांपुरतेच मर्यादित नसते. सांप्रदायिक पापपुण्यविचार, दंडनीतीतील अपराधविचार वरील प्रकारच्या सद्सद्विवेकाच्या जितके जवळ येतील, तितके जास्त जास्त व्यापक होऊ लागतात व आचारांचे स्तोम कमी-कमी होऊ लागते. सदसद्विचारसुद्धा दिक्काल निरपेक्ष नसतो - का पुढे पाहू. पण त्याआधी समाजात जी मूल्ये तयार होतात, ती कोणासाठी व त्यांचे कार्य काय, हे थोडक्यात समजावून घेणे अवश्य आहे.

 मनुष्य नेहमी समूहात राहिलेला आहे. एकाच वेळी निरनिराळ्या समूहांत त्याला निरनिराळे स्थान असते. ते स्थान असणाऱ्याकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात. वयःपरत्वे व्यक्तीला जास्त जास्त समूहांतून स्थान मिळत जाते, आणि निरनिराळ्या भूमिका वठवाव्या लागतात. ह्या भूमिका वठवितानाच

७६

।। संस्कृती ।।

व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. समाजाची मूल्ये ती व्यक्ती आत्मसात करून टाकते; इतकी की, त्या स्वतःच्या अंतःकरणप्रवृत्ती आहेत, असे तिला वाटू लागते. त्या मूल्यांविरूद्ध स्वतःचे आचरण होऊ नये, इतरांचे झाले तर त्यांना दंड करावा, वेळ पडल्यास त्या मूल्यांसाठी प्राण द्यावा, अशी व्यक्तीची भावना होते. ज्या समूहात व्यक्ती वाढते, त्या संघाला उद्देशून ती 'आम्ही' हा शब्द लाविते. त्या 'आम्ही' ची व्याप्ती निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी असते, - आम्ही म्हणजे मी व आई, मी व बायको, सर्व कुटुंब व शेजारी, आम्ही पुणेकर, आम्ही हिंदू, आम्ही ब्राह्मण, आम्ही शिक्षक, अशी निरनिराळी असते. प्रत्येक संघ निरनिराळा, पण परस्परांशी बांधलेला असतो. एका संघातले 'मी' निरनिराळ्या संघांचे घटक असतात. हे निरनिराळे 'आम्ही' व त्यांत मिसळून जाऊन निरनिराळ्या भूमिका वठविणारा 'मी' ह्याच्या संबंधांत जोवर संघर्ष उत्पन्न होत नाही, तोवर साधारणपणे 'मी' ची अस्मिता पुरतेपणी जागृत होत नाही. एखाद्या प्रचंड यंत्राची गती चालू असते. त्यातील लहानातील लहान चाकेही फिरत असतात. त्याच निर्जीव यांत्रिकपणे काही माणसांचे आयुष्य जाते. ती जन्मतात, त्यांना काही विशिष्ट वळण लागते, ती वाढत असतात. आयुष्यात निरनिराळ्या वयात समाजाने अपेक्षिलेली कृत्ये त्यांच्याकडून घडत असतात, जणू निसर्गाचा क्रमच. शेवटी ती मरतात. अशा माणसांच्या जीवनाचे उत्कृष्ट चित्र गडकऱ्यांनी लिहिलेल्या 'मूकनायक' ह्या विडंबनात्मक नाटिकेत दिसते. काही असामान्य व्यक्तित्व असलेली माणसे समाजाने घालून दिलेले नियम संपूर्ण आत्मसात करितात; एवढेच नव्हे, तर इतरांनी त्या नियमांचे पालन करावे म्हणून कोशिस करतात. इतिहासाने वाखाणलेले राजे, स्मृतिकार, स्वतःच्या युगाशी व समाजाशी संपूर्णपणे समरस झालेला कवी हे या प्रकारात येतात. काही गुप्त सम्राट, हर्षवर्धन वगैरे राजे, मन्वादी स्मृतिकार व रघुवंशातील आदर्श राजांच्या रूपाने समाजाची मूल्ये साकार करणारा कालिदास ही अशा व्यक्तींची उदाहरणे होत. ह्या सर्व उदाहरणांतील व्यक्तींचे असामान्य व्यक्तित्व समाजाशी असामान्य एकरूपता पावल्याने
।। संस्कृती ।।

७७

निर्माण झालेले आहे. काही व्यक्तींचे व्यक्तित्व समाजाशी येणाऱ्या संघर्षांमुळे परिणत होते. सामाजिक नियम बंधनकारक वाटून ते झुगारून देण्याच्या प्रयत्नात अशा व्यक्ती असतात. काही वेळा दैवयोगाने (ज्ञानदेवादी भावंडांच्या बाबतीत) सामाजिक रूढींशी त्यांचा संघर्ष होतो. काही वेळा ते आपण होऊन जुने नियम झुगारून नवे आणू पाहतात. अशा व्यक्ती समाजाच्या रोषाला बळी पडतात किंवा नवयुगाच्या प्रवर्तक होतात. नित्याच्या व्यवहारात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी समाजाच्या नियमांना धाब्यावर बसविणारे लोक असतातच. काहींना गुन्हेगार म्हणून शिक्षा मिळते; काही गुन्हेगार असूनही राजरोसपणे राहू शकतात. समाजात ही जी घडामोड सारखी चाललेली असते, त्यामुळेच समाजाच्या घटनेत व समाजाच्या नियमांत हळूहळू फरक पडत असतो. संघाची जी घडण बनत जाते, ती घडण टिकविण्याचे कार्य आचारविचारांनी होत असते. किंबहुना, एखाद्या समाजाचे सर्व प्रकारचे विधीनिषेध म्हणजेच त्या गुंतागुंतीच्या घडणीचा नकाशा,असे म्हणता येईल.

 प्रत्येक लहान-लहान संघातसुद्धा व्यक्तीव्यक्तीचा व व्यक्ती आणि संघ ह्यांचा संघर्ष चाललेला असतो. या संघर्षामुळे घडण हळूहळू बदलत असते. पण हा संघर्ष उघड नसतो. संघर्ष चालू असताही संघाबद्दलची आत्मीयता बऱ्याच वेळा कायम असते. त्या आत्मीयतेला जेव्हा बाधा येईल असे वर्तन घडते, तेव्हा व्यक्तीला कडक शिक्षा होते. ह्या संघाबाहेर पण संघाशेजारी दुसरे संघ व सनाज असतात. आपल्या संघाबद्दल 'आम्ही'. 'आमचे' असे शब्दप्रयोग होतात, तर दुसऱ्या संघाबद्दल 'तुम्ही', 'तुमचे' 'ते', 'त्यांचे' असे शब्दप्रयोग होतात. 'तू', 'तुम्ही' जास्त जवळचे तर 'ते', 'त्यांचे' जरा दूरचे. ह्या बाहेरच्या. संघांशी वागताना स्वकीय संघातील नियम बरेचसे सैल होतात, तर काही प्रसंगी अजिबात नष्ट होतात. स्वतःच्या संघातला माणूस मारला, तर त्याबद्दल देहान्त शिक्षा होते. परकीय मारला, तर 'उलट सूड तर नाही ना घेणार?' ह्या चिंतेखेरीज 'हातून अकृत्य घडले', असेही स्वजन म्हणत नाहीत. आपल्या संघातल्या दुसऱ्या कोणाच्या बायकोवर डोळा

७८

।। संस्कृती ।।

ठेवला तर समाजात छी: थू: होते, आणि वर शिक्षाही होते. परसंघातील स्त्रियांचे बलात्काराने हरण करणे हे पौरूषाचे लक्षण समजले जाई. ऋग्वेदात व अथर्ववेदात निरनिराळ्या तऱ्हेचे रोग नाहीसे व्हावे, म्हणून मंत्र आहेत. तापाला उद्देशून असलेल्या ऋचेत म्हटले आहे की 'ह्या माणसाच्या अंगातून नाहीसा हो; शत्रूच्या देशात जा.' शेजारच्या संघाशी भांडण नाही, तोपर्यंत बहुधा एकमेकांच्या वाटेला जाणे नको, अशी वृत्ती असते. पण तेच भांडण निघाले, म्हणजे परकीय संघांची जास्तीत-जास्त हानी करणे हे एक सामाजिक कर्तव्य व सत्कृत्य बनते, व त्याबद्दल समाजाकडून गौरव होतो, पारितोषिकेही मिळतात. प्रत्येक संघाचा धर्म त्या संघापुरता मर्यादित असतो. ज्या गोष्टी स्वसंघात अधार्मिक वा त्याज्य असतात, त्या परसंघातील माणसांना उद्देशून केल्या, तर त्याज्य ठरत नाहीत.

 सुमारे पन्नास-साठ हजार वर्षांपूर्वी मानवाचे संघ लहान-लहान होते. प्रत्येक संघ दुसऱ्यापासून बराच लांब असे. अशावेळी संघधर्म संघापुरताच असावा. हल्ली केवळ शिकारीवर उपजीविका करणाऱ्या किंवा लहान-लहान दऱ्याखोऱ्यांतून थोडी शेती करणाऱ्या वन्य जमाती लहान-लहान संघ कित्येकदा व्यापारानिमित्त किंवा काही उत्सवासाठी बरेच संघ एकत्र येतात. अशा वेळी संघासंघातील शत्रुत्व तात्पुरते सुप्त असते. कोणी कोणाची कागाळी करावयाची नाही, असा दंडक असतो. तात्पुरता का होईना, पण काही बाबतीत थोडा व्यापक संघधर्म उत्पन्न होतो. शिकाऱ्याचे जीवन संपून जेव्हा शेतीचे जीवन सुरू झाले, व हळूहळू पशुपालन करणाऱ्या जमाती त्यांत मिसळल्या, तेव्हा लहानशा भूप्रदेशावर पुष्कळ लोक राहून त्यांची उपजीविका होण्याची शक्यता उत्पन्न झाली. संघातल्या संघात एकजिनसी जीवन नाहीसे होऊन भेद वाढत गेले. शिकारीवर जगणाऱ्या वन्य जमातीत समानता असते. वन्य जमातींना दुसऱ्यांना जिंकून गुलाम करण्याची व राबविण्याची शक्यता नसते. संघाच्या म्होरक्यापासून ते सामान्य जनांपर्यंत सर्वांना सारखेच काम करावे लागते. शेतीच्या व्यवसायात नोकर ठेवायची शक्यता उत्पन्न होते, व संघामध्ये वर्गभेद उत्पन्न होतो. पहिल्याने लहानलहान खेडी व नंतर राज्ये निर्माण झाली. मोठमोठे मानवसंघ एकत्र

।। संस्कृती ।।

७९

आले, त्यांचा संघर्ष झाला. हळूहळू त्यांच्यातूनच नवे मोठमोठे संघ निर्माण झाले. हे नवीन समाज घडणीच्या दृष्टीने गुंतागुंतीचे झाले. अनेक दैवते, अनेक वर्ग, अनेक मानववंश एकत्र होऊन हे समाज बनलेले होते; व त्यांच्याचपासून आजच्या निरनिराळ्या समाजांची उत्पत्ती झाली.

 संस्कृतीच्या प्रथमावस्थेतील मानवी संघ व सध्याच्या बऱ्याचशा वन्यजमाती ह्यांच्या समाजाची घडण काही बाबतीत बरीच साधी असते. समाजातल्या उच्चनीचपणाचा जवळजवळ अभाव असल्यामुळे व समाज लहान व एकसंध असल्यामुळे बरेचसे नियम सर्वांना लागू पडतील असे होते. बहुधा स्त्रियांसाठी निराळे नियम बऱ्याच वन्य समाजांतही आढळतात. पण निरनिराळे संघ एकत्र येऊन जे मोठमोठे समाज बनले, त्यांची घडण मात्र फारच गुंतागुंतींची झाली. त्यातही निरनिराळे वर्ग, जाती, मानववंश एकत्र आल्यावर जे नियम झाले, त्यांतील फारच थोडे सर्व समाजाला लागू पडतील असे झाले. मनुस्मृती वाचीत असताना हे ध्यानात येते की, त्यातील बहुतेक नियम त्रैवर्णिकांचे आहेत. चौथ्या वर्णात ज्या असंख्य जाती-जमाती होत्या, त्यांच्याबद्दल जे नियम आहेत, ते फक्त त्या सर्वांनी त्रैवर्णिकांशी कसे नमून वागावे, ह्याबद्दलचे आहेत, त्यामुळे प्रत्येक जातीच्या अंतर्गत व्यवहाराबद्दल काही वाद झालाच, तर त्या जातीच्या वृद्धांना बोलावून परंपरागत आचार काय आहेत, हे समजावून घेऊन नंतर तो वाद राजदरबारी निकालात निघे. भारतात एक समज होता असे गृहीत केले, तर निरनिराळ्या प्रदेशांत व निरनिराळ्या जमातींच्या रीतिरिवाजांत जी विविधता आढळते, ती इतर कोठेही सापडणे अशक्य आहे. सामाजिक मूल्ये चिरंतन तर नाहीतच, पण सांप्रत काळीसुद्धा प्रत्येक जमातीत ती निरनिराळी आहेत, असे दिसून येईल. ह्याची उदाहरणे देण्याचीसुद्धा आवश्यकता नाही, इतकी ती सर्वांच्या माहितीची आहेत. उत्तरेकडे नात्यातल्या नात्यात लग्न करणे गैर समजतात. तर दक्षिणेकडे आतेमामेभावंडाचे व मामा भाचीचे लग्न होणे ही नित्याचीच गोष्ट आहे. ओरिसात व बंगालात ब्राह्मण मासे खातात, तर दक्षिणेत ब्राह्मणशाकाहारी असतात. केरळातील स्त्रिया पूर्वी उरोभाग झाकीत नसतः तरी त्या भारतातील इतर स्त्रियांइतक्याच विनयवती होत्या.

८०

।। संस्कृती ।।

 "अहो, तुम्ही दर वेळा आचारधर्मांवर भर देऊन त्यांची सापेक्षता सांगता. त्यांच्या पलीकडे सर्व मोठमोठ्या संप्रदायांत सांगितलेली तत्त्वे खरे बोलावे, सर्व भूतांवर दया करावी, परस्त्री, परद्रव्य ह्यांचा अभिलाष धरू नये. सारांश 'संबंध पृथ्वी हेच आपले कुटुंब' असे मानावे, वगैरे महान व चिरंतन तत्त्वे डोळ्याआड करिता. ह्याला काय म्हणावे?"

 माझ्या मनात आता हाच मुद्दा घ्यावयाचा होता. पण आचारधर्मावर मी जो एवढा भर दिला, त्याचे कारण म्हणजे निरनिराळ्या आचारधर्मांमुळे परस्परांविषयी घृणा व द्वेष वाढतो हे, व परकीयांबद्दल शत्रुत्व वाटू लागते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील वाद वाचले, तर ते तुम्ही वर सांगितलेल्या महान तत्त्वांबद्दल नसून बदलत्या आचारधर्माबद्दलच असतात. संस्कृतिसंगमाच्या काळात दृश्य धर्म झपाट्याने बदलत असतात, धर्मावरचा विश्वास उडालेला असतो, जेत्यांचे अनुकरण होत असते, नवनवे प्रयोग करू पाहण्याची धडपड चालू असते. अशा काळातील प्रमाणशून्यता डोळ्यांना दिसेल इतकी मोठी असते. नव्या जुन्यांचा तीव्र झगडा चालू असतो. आरोप प्रत्यारोप होत स्कर्ट किंवा विजार घालणाऱ्या, पाचवारी लुगडे नेसून पदर अर्ध्या पाठीवर सोडणाऱ्या, कुंकू लावले-न-लावलेले पण पावडर मात्र भरपूर फासणाऱ्या मुली निरागस असणे शक्यच नाही, असे कित्येकांचे ठाम मत असते. तर दुसऱ्या बाजूने जुन्या पिढीचे सर्वच विचार आंबलेले, विटलेले व विकृत मनोवृत्तीचे निदर्शक आहेत अशी खात्री असते. मर्यादा म्हणून काही शब्द असतो; रुचिवैचित्र्य व उच्छृंखलपणा, सौंदर्याची मर्यादशील जोपासना व सौंदर्याचे उघडे प्रदर्शन ह्यांत फरक असतो, हे बऱ्याच वेळा नवी पिढी विचारात घेत नाही. विशेषतः संक्रमणकाळात जेव्हा आचारधर्माच्या बाबतीत कमालीची प्रमाणशून्यता उत्पन्न होते अशा वेळी टिकाऊ सामाजिक मूल्यांबद्दल विचार होणे अत्यावश्यक आहे. तो विचार नव्याजुन्यांनी बसून करावा लागेल, एकमेकांवर चिखलफेक न करता तत्त्व शोधण्याच्या दृष्टीने करावा लागेल.
 "तुम्ही तर म्हणाला होता की, धर्म हा दिक्कालनिरपेक्ष असणे शक्य नाही. मग शाश्वत मूल्ये येणार कुठून?"

।। संस्कृती ।।

८१

 तेच शक्य तर तुम्हांला व मला स्वतःलासुद्धा स्पष्ट करण्याचा माझा विचार आहे. बघू या जमते का.

 त्याही आधी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे खरे बोलणे, परस्त्रीव परद्रव्य हरण न करणे वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्या 'आपल्या' म्हणून समजल्या जाणाऱ्या संघापुरत्या मर्यादित असतात. येथे 'पर' म्हणजे स्वतःचे नाही ते, पण संघांतर्गत असलेला, असा अर्थ आहे. जोपर्यंत संघ लहान व आपुलिकीची भावना मर्यादित, तोपर्यंत नीतिकल्पनाही पराकाष्ठेच्या संकुचित राहतात. संघ मोठमोठे होऊ लागतात, तसतसा 'आपण'चा विस्तार होत जातो. उदा. एका देशातील मुसलमानांना इतर देशांतील जवळचे मुसलमान वाटतात. तीच गोष्ट ख्रिस्तीधर्मियांची. पण संघाचा विस्तार झाला, तरी पर', 'दुसरे', इतर असे काहीतरी राहते, व त्या उर्वरित दुसऱ्याबद्दल इतकी तुच्छता व द्वेष वाटतो की, तीही माणसेच आहेत, हाही विवेक राहत नाही. त्यांनी आमच्या समाजाची मूल्ये तरी स्वीकारावी किंवा नष्ट तरी व्हावे, अशी असल्या संघांची विचारसरणी असते. ह्या प्राचीन विचारसरणीतूनच उत्पन्न झालेली राजकीय मतप्रणाली कित्येक मानवसंघांत आजही दिसते. आजच्या काळात एका दृष्टीने शाश्वत मूल्यांविषयी बोलणे सोपे आहे. ख्रिस्त, महंमद व मार्क्स ह्यांच्या अनुयायांना ती ठाम माहीत आहेत.. पहिल्या दोन सांप्रदायिकांना वाटते की, परमेश्वराने खास दूत पाठवून मानवतेची अंतिम मूल्ये आपल्या प्रेषिताकडून लोकांना ऐकविली. तिसऱ्या सांप्रदायिकांच्या मते मार्क्स हा आधुनिक युगातील एक द्रष्टा पुरूष होऊन गेला; त्याने इतिहासाचे अवलोकन करून, मानवसमाजांच्या घडणीची नीट चिकित्सा करून श्रेष्ठतम घटना कोणती, हे ठरविले आहे. अशा तऱ्हेने श्रेष्ठतम मूल्ये हाती आली, म्हणजे ती ज्या समाजांना माहीत नाहीत त्यांना त्यांची माहिती करून द्यावयाची, व त्याचे ग्रहण करावयाचे एवढेच इतिकर्तव्य शिल्लक राहते. एका दृष्टीने मुसलमानधर्म व मार्क्सधर्म हे खिस्ती धर्माचाच परिपाक होते. प्राचीन काळी मध्यआशियात इतर प्रदेशांप्रमाणेच अनेक दैवते असत. ख्रिस्तपूर्व १४००-१५०० च्या दरम्यान इख्न आटोन नावाचा

८२

।। संस्कृती ।।

राजा इजिप्तमध्ये होऊन गेला. त्याने त्या वेळच्या सर्व दैवतांतून आटोन नावाचा देव निवडला; व तोच एकमेव देव आहे, दुसऱ्या दैवतांची पूजा करू नये, असे ठरविले. ह्या राजाच्या कारकीर्दीत आटोन देवाचे प्रस्थ वाढले. पण त्याच्या मरणानंतर हा वेडगळ एकेश्वरी पंथ टिकू शकला नाही. त्यानंतर जवळ जवळ १३०० - १४०० वर्षांनी इजिप्तपासून जवळच असलेल्या इस्त्राइलमध्ये नव्या एकेश्वरी पंथाची स्थापना झाली. ज्यू लोक एका एकेश्वरी पंथाचेच अनुयायी होते; पण त्यांचा धर्म व त्यांचे दैवत फक्त त्यांच्यापुरतेच होते. इतरांना ते दीक्षा देत नसत. पण मध्य-आशियात प्रचलित असलेल्या दैवतांची भरपूर निंदा व हेटाळणी ज्यू लोकांच्या धर्मोपदेशकांनी पिढ्यानुपिढ्या व शतकानुशतके केली. तीच प्रथा पुढे येशूने स्थापिलेल्या ख्रिस्ती पंथाने स्वीकारली. आम्हांलाच काय ते सत्य धर्माचे दर्शन झालेले आहे, व अंधारात चाचपडणाऱ्या इतर मानवसमाजांना सत्याची ही दिव्य ज्योत दाखविली पाहिजे, असे ह्या पंथाच्या अनुयायांचे मत आहे. बरोबर असेच मत महंमद व मार्क्स ह्यांच्या अनुयायांचेही आहे. ह्या लोकांनी सामाजिक मूल्यांबद्दलचा एक नवीन विचार प्रसृत केला आहे. तो असा की, सारख्या मूल्यांच्या पण निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक रचना असणे मुळी शक्यच नाही. एकच तऱ्हेची सर्वश्रेष्ठ रचना व तिचे विशिष्ट नियम असू शकतात; आणि एकदा ती माहीत झाली की, बाकी सर्व रचनांचा नाश करणे एक कर्तव्य होऊन बसते. अंतिम मूल्ये टाकाऊ समजावी का? काही यमनियमांत मूल्यांची समता असू शकते व त्यांपैकी हे अथवा ते उचलले तरी चालते, अशा प्रकारची सांस्कृतिक लवचिकता असू शकते की नाही ? - वगैरे अतिमहत्त्वाचे प्रश्न वरील सांप्रदायिकांनी उत्पन्न केले आहेत. ते पुढे पाहू.

 निरनिराळ्या मनुष्यसमाजांत निरनिराळ्या काळी भिन्नभिन्न धर्म असतात. हे धर्म म्हणजे एक प्रकारे समाजाच्या बांधणीचे नियम असतात; व ह्या नियमांप्रमाणे समाजातील व्यक्तींनी वागावे, ही समाजाची अपेक्षा असते. तसे व्यक्तींनी का वागावे? त्यामुळे काय साधते? - व्यास म्हणतात. 'अर्थ व काम साधतात. इतर लोक म्हणतात, व्यक्तीचे व समाजाचे 'हित'

।। संस्कृती ।।

८३

साधते, 'कल्याण' साधते. पैकी 'अर्थ' व 'काम' हे शब्द एका दृष्टीने समजण्यास सोपे आहेत. अर्थ म्हणजे पैसा, द्रव्य-हातांत धरिता येईल, दृष्टीने पाहता येईल, असे काही द्रव्य. ह्यात पैसा अडका, धन-धान्य, पशू, घर, वाहने, नोकर-चाकर, सर्व काही येते. काम म्हणजे इच्छा-सर्व तऱ्हेच्या इच्छा. काम हा शब्द केवळ वैषयिक सुखालाही लावतात. एका दृष्टीने अर्थ हे कामपूर्तीचे साधन आहे; एका दृष्टीने अर्थ व काम ही जीवनाची दोन मुख्य साध्ये आहेत. शरिराचे पोषण, संरक्षण (वस्त्र व निवास), कामपूर्ती, प्रजेचे भरण व पोषण इतक्या कमीत कमी गोष्टीं तरी अर्थ व काम ह्या शब्दांत येतात. ह्या गोष्टी मनुष्य व इतर प्राणी ह्यांना सामान्य आहेत. इतर प्राणी व मनुष्य ह्यांमध्ये फरक दोन: एक म्हणजे इतर प्राण्यांप्रमाणे वरील गरजा पुरविण्याचे मनुष्याचे मार्ग निसर्गाने बांधून दिलेले नसतात. आपापल्या नैसर्गिक अवस्थेत सर्व जगभर पसरलेली अशी प्राण्यांची जात नाही. ( उंदीर मनुष्याच्या मागे जवळजवळ सर्व जगभर गेलेले आहेत.) प्रत्येक जातीचे खाणे-पिणे, नरमादींचा संयोग, अपत्यप्राप्ती वगैरे स्थलकालाप्रमाणे ठरलेले असतात. एका विशेष तऱ्हेच्या हवामानात, विशेष तऱ्हेच्या खाद्यावर राहणारे प्राणी हवामान व वनस्पती किंवा प्राणिसृष्टी बदलली की, कित्येकदा निःशेष मरून जातात. (उदा. हिमयुगातील मॅमॉथ नावाचा केसाळ हत्ती).पण मनुष्य आपली परिस्थिती आपण बनवितो व हळू हळू बऱ्याच प्रमाणात निसर्गावर मात करून निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडतो. वाघ, सिंह, हत्ती, हरणे वगैरेंचे खाद्य ठरलेले असते. पण माणूस सर्वभक्षक आहे. मनुष्याची मैथुनाची वासना सार्वकालिक आहे, मनुष्य स्वतःचे संरक्षण निरनिराळ्या तऱ्हांनी करू शकतो. अमकी- एक सर्व प्राण्यांना साधारण मूलभूत अशी गरज मनुष्य अमुक तऱ्हेनेच पुरवू शकेल, असे सांगता येत नाही. ती पुरविण्याचे त्याचे मार्ग तो ज्या समाजात ज्या काळी राहतो, त्याने ठरविलेले असतात. मनुष्य निरनिराळ्या मार्गांनी आपल्या गरजा पुरवू शकतो; पण एका वेळी एका समाजात सर्वच मार्ग प्रचलित नसतात. मनुष्य सदैव 'निवड' करीत असतो. ही 'निवड' सारासार विचार करून झालेली
८४

।। संस्कृती ।।

असते. असे मुळीच नाही. पण तरीही ती एका तऱ्हेने 'निवड' असते; कारण त्या एका मार्गाशिवाय इतर मार्गांनी जाण्याची शक्यता असते. मार्गांची अनेकता व त्यांतील एकाची ( यदृच्छया का होईना) निवड ही माणसाची वैशिष्ट्ये होत. ह्याखेरीज मानवाने काही सांस्कृतिक गरजा निर्माण केल्या आहेत. वर काही मूलभूत गरजा सांगितल्या, त्या काही दृष्टींनी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. चार लोकांनी चांगले म्हणावे, चार लोकांसारखे वागावे, मोठ्यांचे अनुकरण, हुकमत गाजवून काहींचे का होईना पुढारीपण असावे अशी इच्छा, वगैरे आणखी कितीतरी अशा गरजा आहेत की, त्या समाजात राहण्यामुळे, सांघिक जीवनामुळे निर्माण झालेल्या आहेत. ह्याही गरजा मूलभूत व इतर प्राणी व मनुष्य ह्यांना साधारणच आहेत. पशुपक्ष्यांमध्येही वरील सर्व तऱ्हांच्या गरजांपासून उत्पन्न होणाऱ्या क्रिया, प्रतिक्रिया दिसून येतात. ज्यांना सांस्कृतिक गरजा म्हटले, त्या ह्यांखेरीज निराळ्याच व मनुष्याला विशिष्ट, इतर प्राण्यांना नाहीत, अशा असतात. संस्कृती म्हणजे संचय. संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाला श्रीमंत करणारी भूतकाळाची कर्तबगारी. जे-जे म्हणून मागील पिढीकडून मिळालेले असेल, - घरे दारे, रस्ते, शहरे, द्रव्यसंचय, इमारती, समाजसंस्था, दैवते, श्रद्धास्थाने, हे सर्वच संस्कृत मोडते. त्याचप्रमाणे संस्कृती म्हणजे वर्तमानकाळाभोवती भूतकाळाचा पडलेला पाश, स्वैर वागण्याला पडलेल्या मर्यादा, नवीन कल्पना, नवीन प्रयोग ह्यांची गळचेपी करणारे पिशाच्च. सांस्कृतिक गरजा किंवा इच्छासुद्धा तीव्र असतात. त्यांची पकड इतकी घट्ट असते की, प्राणी म्हणून असलेल्या मनुष्याच्या मूलभूत गरजांचाही विसर पडतो. जीवशास्त्र सांगते की, जगणे, मैथुन, प्रजोत्पादन ह्या जीवसृष्टीच्या तीन गरजा आहेत. पण माणूस धर्मासाठी, प्रेमासाठी, देशासाठी, अपमान झाला म्हणून, पावित्र्याचा भंग झाला म्हणून प्राण चुटकीसारखे देतो व घेतोही. इंद्रियनिग्रह करून कडकडीत ब्रह्मचर्य पाळतो व प्रजोत्पादन करावयाचे नाकारतो. फार काय, जैन धर्मातील कित्येक लोक उपास करून भुकेने तडफडून प्राणही सोडतात. मोक्ष हा पुरुषार्थ तर सर्वस्वी सांस्कृतिक गरज आहे. आपल्याकडे जे चार पुरुषार्थ
।। संस्कृती ।।

८५

सांगितले आहेत, त्यांपैकी अर्थ व काम ह्यांत सर्व प्राण्यांना साधारण पण रूढ मार्गांनी मिळवावयाच्या गोष्टी असतात. मोक्ष हे साध्य बहुतांश सांस्कृतिक स्वरूपाचे आहे. धर्म खरोखर सर्व पुरुषार्थांचे साधन आहे; पण ते इतके महत्त्वाचे आहे की, ते एक साध्यच बनले आहे. बहुतेक समाजांत हीच परिस्थिती दिसते. धर्माचे 'साधन' हे स्वरूप पुष्कळदा विसरावयास होते; व मग धर्माच्या नावाखाली आचारकांडाचेच, ज्याच्या मागे मनाचा मागमूसही नाही अशा आचारकांडाचेच, साध्य म्हणून स्तोम माजते. म्हणजे धर्माप्रमाणे वागून धर्म साधतो, अर्थ व काम साधतात व मोक्ष साधतो, अशी समाजातील नियंत्यांची भूमिका आहे. ह्या सर्व गोष्टी एकत्र घेऊनच 'हित' व 'कल्याण' शब्द योजिलेले आहेत. मनुष्याला काय हवे असते, ते मिळाले म्हणजे 'कल्याण' होते, अशी कल्पना आहे. धर्ममार्गाने जर ते मिळविले नाही, तर अंती अहित होते. ज्यांमुळे 'अहित' होते त्या शक्ती दोनः एक समाजाची शासनसंस्था व दुसरी मानवी बुद्धीला आकलन न होणारी आधिदैविक शक्ती. कल्याणकारी शक्तीही समाज व दैवते अशा दुहेरी समजल्या जातात. सर्व मानवसमाजाचे नियंत्रण करणारी दैवी शक्ती आहे की नाही, हा प्रश्न जरी बाजूला ठेवला, तरी त्या दैवी शक्तीचे प्रत्येक समाजाने जे रूप केले आहे, ते संपूर्णतया त्या-त्या समाजाच्या संस्कृतीला धरून केलेले आहे, हे समजावयाला कठीण नाही.

 यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
 तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विद्ध्याम्यहम् ।।
 मानवाच्या इच्छा ज्या संस्कृतिधर्माने बांधिल्या जातात, त्याच धर्माने त्या मानवाच्या देवतामूर्ती व पूजेचे प्रकार ठरविले जातात. मनुष्य जे खातो, तेच त्याचा देवही खातो. पण संस्कृतीचे पाश इतके बळकट असतात की, एखादे विशिष्ट प्रकारचे खाणे समाजाने त्याज्य ठरविले, तरीही त्या समाजाची दैवते मात्र पुष्कळदा जुनेच खाद्य मागताना दिसतात. सर्व जुनी-नवी दैवते माणसांच्या कृत्याबद्दल बक्षीस देण्यास वा शिक्षा करण्यास तयार असतात. समाज बदलत असतो; पण बक्षिसास वा शिक्षेस काय पात्र आहे. हे मात्र

८६

।। संस्कृती ।।

परंपरेने ठरलेले असते. सबंध समाज कित्येक आचारविचार सोडून देतो; पण जुनी दैवते - म्हणजेच त्यांचे मानवी प्रतिनिधी- मात्र जुन्या आहाराप्रमाणेच जुन्या मूल्यांना अथवा पापपुण्याच्या जुन्या कल्पनांना चिकटून बसलेली असतात. खरे म्हणजे दैवी शिक्षा वा बक्षीस ही कल्पना मानवनिर्मित व समाजसापेक्ष आणि संस्कृतिसापेक्षच आहे. पण सामाजिक शासनसंस्थांपेक्षा दैवी शासनसंस्थेची मानवी घडण जरा निराळी व स्वतंत्र असते. पुष्कळदा दैवी शासनसंस्थेवरची मनुष्याची श्रद्धा इतकी बळकट असते की, त्या श्रद्धेमुळे आचाराचे नियंत्रण होऊ शकते.

 ज्यावेळी अमकी कृत्ये वाईट व त्याज्य व अमकी चांगली व करणीय असे समाज ठरवितो व चांगली कृत्ये केली की 'हित' वा 'कल्याण' होते व वाईट केल्यास ‘अकल्याण' होते, असे आपण म्हणतो, त्या वेळी त्या संदर्भात 'अकल्याण' वा 'कल्याण' कोणाचे होते, हे पाहणे आवश्यक आहे. 'समाजाचे हित' व 'व्यक्तीचे हित' असे दोन शब्दप्रयोग नेहमी ऐकण्यात येतात. पुष्कळदा व्यक्ती व समाज ह्यांचे हितसंबंध परस्परपूरक नसून परस्परमारक असतात. बऱ्याच जणांचे श्रम घेऊन, त्यांना अर्धपोटी ठेवून एखादा मनुष्य श्रीमंत होऊन सर्व उपभोग्य वस्तू मिळवितो, त्या वेळी एका मनुष्याचे 'हित’ अनेकांना मारक ठरते. ह्याउलट पुष्कळ लोकांचे कल्याण होण्यासाठी काही व्यक्ती नाहक अपराध नसताना बळी पडल्या, तर बहुजनांचे हित काहींना मारक ठरते. तेव्हा कोणाच्या हिताकडे दृष्टी ठेवावी, असा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मनापुढे उभा राहतो. व्यक्ती म्हणजे काय हे समजणे सोपे आहे. पण 'समाज' हा शब्द ( कर्तरि प्रयोगात) कर्त्याच्या ठिकाणी योजून जी वाक्यरचना सापडते, ती ब-याच वेळा फसवी व अनर्थकारक असते. 'समाज' शिक्षण करितो, 'समाजा'ची हानी, 'समाज' सुखी किंवा दुःखी असणे किंवा होणे ह्या व असल्या शब्दप्रयोगांमुळे समाज अशी काही विराट व्यक्ती असून तिला मन-बुद्धी वगैरे इंत, अशी कल्पना उत्पन्न होते. त्यांतूनही पाश्चात्य भाषांच्या धर्तीवर रचिलेले 'हिंदू मन, मराठी मन अशांसारखे शब्दप्रयोग नेहमी वाचले, म्हणजे समाज म्हणून विशिष्ट मनोमय, व्यक्तीमत्त्वमय

।। संस्कृती ।।

८७

असे काही तरी खरोखरीचे अस्तित्वात असते, असे वाटू लागते. पाश्चात्य पंडितांत ह्यावर पुष्कळ ऊहापोह झालेला आहे. आपल्याकडील तत्त्वविषयक लिखाणात अशी समजूत उत्पन्न व्हावी, असे काही नाही. पण 'समाज' हा शब्द आपण इतक्या वेळा वापरात आणतो व समाजहिताविषयी इतक्या गोष्टी करितो की, समाज म्हणजे त्यातील व्यक्तींपेक्षा काही निराळाच इंद्रियगम्य सजीव पदार्थ आहे, असे वाटू लागते. काही दृष्टींनी आणि तेसुद्धा केवळ कल्पनेत समाजाला अस्तित्व असते. हिंदू व्यक्ती प्रत्यही मरत असतात, नव्या जन्मतात; पण 'हिंदू समाज' म्हणून काहीतरी शतकानुशतके अस्तित्वात आहे. तीच गोष्ट मानव समाजाची. प्राणिजातीच्या बाबतीत असेच असते. विशिष्ट काळी व स्थळी जिवंत असलेली वाघ सिंह, हरणे, ससे मरत असतात; पण वाघ, सिंह, हरीण, ससा ही प्राण्यांची 'जात' जिवंत असते. ज्या वेळी सर्व व्यक्ती मरतात, तेव्हा जातही मरते. येथेही एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, केवळ प्राणिशास्त्रदृष्टया प्राणिजात व त्यातील प्रत्येक प्राणी ह्यांचे नाते केवळ नैसर्गिक, शारीरिक स्वरूपाचे आहे. तर समाज व त्यातील व्यक्ती ह्यांचे नाते सांस्कृतिक व सामाजिक आहे. एका प्रकारचे सर्व प्राणी मेले की त्या तऱ्हेची प्राणिजातही मरते. पण व्यक्ती न मरताही एखादा विशिष्ट समाज मरुन जातो. उदा. न्यूझीलंडमध्ये पूर्वीच्या मावरी संस्कृतीच्या लोकांचे वंशज आजही भरभराटीत आहेत; पण पूर्वीचा धर्म, संस्कृती, इतिहास सर्व नाहीसा झाला आहे. म्हणजे मावरी समाज व संस्कृती मेली; पण मावरी माणसे जिवंत आहेत. समाज व व्यक्ती ह्यांचे नाते अतिशय गुंतागुतींचे आहे. समाजाशिवाय व्यक्ती घडत नाही, जिवंत राहू शकत नाही, हे जरी खरे असले, तरी समाजाचे हित म्हणजे समाजातील व्यक्तींच्या हितापेक्षा काही निराळेच असू शकते, ही कल्पना बरोबर नाही. समाजहिताच्या नावाखाली व्यक्तींना अर्धपोटी ठेवावयाचे, शेकडो व्यक्तींना ठार मारावयाचे, कित्येकांना वेठीला जुंपावयाचे, कित्येकांना हद्दपार करावयाचे असले प्रकार आज चाललेले दिसतात. समाजाच्या अंतिम हितासाठी व्यक्तींना बळी देणे अपरिहार्य आहे, अशी भूमिका कित्येक
८८

।। संस्कृती ।।

पुढारी घेतात, त्या वेळी समाजाचे हित साधत नसून काही व्यक्ती इतरांना मारून आपले हित तेवढे साधीत असतात. हाच मुद्दा परत विचारात येईलच. पण समाज, समाज म्हणून जे काही आहे, ते व्यक्तींचे मिळून झालेले आहे, व्यक्तीमय आहे, व्यक्तींमध्ये समाजाची मूल्ये केंद्रित झालेली असतात, व्यक्ती समाज बदलीत असते, व व्यक्तीला विसरून संघाचा विचार करणे अशास्त्रीय होईल, हे सत्य समाजशास्त्रज्ञांनी व विशेषतः समाजातील विचारवंत लोकांनी दृष्टीआड करता कामा नये.

 धर्म म्हणजे समाजाची जी रचना झालेली असते, ती टिकण्यासाठी आलले परंपरागत नियम. हे नियम समाजरचनेशी इतके निगडित असतात की, त्यांचे आकलन झाले की. समाजाच्या घडणीचेही आकलन होतेच. ह्या नियमांना काही मोल असते. त्याप्रमाणे वागणे योग्य ठरते, त्याप्रमाणे न वागणे अयोग्य ठरते. हे नियम बऱ्याच अंशी परंपरागत असतात व ते संस्कृतिसंक्रमणाच्या नियमांनी माणूस इतके आत्मसात करतो की, ते नैसर्गिक आहेत व अतिमूल्यवान आहेत, अशी भावना होते; व सर्व धर्माभोवती भावनांचे घट्ट वलय बसते. आपले म्हणजे स्वसंघाचे आचारविचार तेवढे योग्य व इतरांचे वाईट, अशी समजूत होते. सामाजिक मूल्यांचे मापन तीन तऱ्हांनी होतेः (१) सांप्रदायिक, (२) केवळ सामाजिक - कायदेविषयक, व (३) नीतितत्त्वाच्या दृष्टीने सांप्रदायिक व सामाजिक नियम आचारमय असतात, तर नीतितत्त्वे आचाराच्या बुडाशी असलेल्या विचाराला - मनःप्रवृत्तीला जास्त मानितात. पण नीतितत्त्वेही विशिष्ट समाजात उदयाला आलेली अशीच असतात; व केवळ विचारावर भर देऊन आचारशून्यतेत परिणत होणारी नीतितत्त्वेही निरूपयोगीच ठरतात. संस्कृतिसंगमाच्या व संस्कृतिसंक्रमणाच्या कालात जुन्या आचारविचारांचा पगडा कमी होतो. नवे आचारविचार निर्माण होऊन रुजण्यास वेळ लागतो व एक प्रकारची प्रमाणशिथिलता वा प्रमाणशून्यता समाजात शिरते. ह्याच कालात धर्म कोणता व अधर्म कोणता, ह्याचाही समग्र ऊहापोह करणे शक्य होते. समाजात निरनिराळ्या नियंत्रक शक्ती असतात. त्या चांगल्या आचरणाला

।। संस्कृती ।।

८९

बक्षीस देतात; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य म्हणजे वाईट समजल्या जाणाऱ्या आचरणाबद्दल शिक्षा करितात. काही समाज एकसंध असतात; व सामाजिक नियम सोपे व सर्वांना लागू पडणारे असतात. पण आपण ज्या समाजात राहतो, त्यांची घडण अति गुंतागुंतीची आहे; व त्याच्या पोटात लहानलहान समूह असतात, त्यांचे संघर्ष चाललेले असतात, व सामाजिक नियमही सर्व समाजाला लागू पडणारे नसतात. हल्लीच्या काळात कित्येक सांप्रदायिक संघ वा राजकीय संघ फार मोठे झाले आहेत. पण त्यामुळे सामाजिक मूल्यांमध्ये एकवाक्यता येण्याऐवजी संघर्ष वाढतच चाललेला आहे.

 सामाजिक नियमानुसार वागण्याने काय मिळते ? मनुष्याच्या शारीरिक गरजा विशिष्ट नियमांप्रमाणे वागून भागतात, व दुसऱ्या सांस्कृतिक स्वरूपाच्या गरजा उत्पन्न झालेल्या असतात, त्याही भागतात, ही धर्माप्रमाणे वागण्याची फलनिष्पत्ती. अशा तऱ्हेने वागून कोणाचे हित होते? समाजाचे? व्यक्तीचे ? व्यक्तीचे हित डावलून समाजाचे हित करिता येणे शक्य नाही. समाज म्हणजे कोणी सजीव, व्यक्तीच्या पलीकडे असलेली, विराट व्यक्ती नव्हे; तर सर्व लहानलहान व्यक्ती मिळून बनलेली एक ऐतिहासिक घटना आहे. समाजाच्या नावाने व्यक्तींना पिढ्यानपिढ्या दुःखात व दारिद्र्यात ठेवणे हे शास्त्रशुद्ध नाही, येथपर्यंत आपण येऊन ठेपलो. धर्माचे स्वरूप काय? तो अंतिम श्रेष्ठतम असे एकच मूल्य असू शकते का? सारख्या मोलाची अनेक शाश्वत म्हणजे सार्वजनिक व सार्वकालिक व सार्वदेशिक असू शकतो का ? मूल्ये एकत्र नांदू शकतात का? हे प्रश्न अजून आपल्या पुढे आहेतच. धर्म म्हणजे आचारविचाराचे समाजाने ठरवून दिलेले नियम. ह्या नियमांवरच सामाजिक मूल्ये आधारलेली असतात. प्रत्येक समाज हा एक लहान किंवा मोठा संघ असतो; व सामाजिक नियम संघांतर्गत व्यक्तीसाठी जे असतात, ते संघाबाहेरच्या व्यक्तींना लागू पडत नाहीत.
 "हे तुम्ही रानटी अवस्थेतील लोकांबद्दल सांगत आहा ना?"
 नाही. हा प्रकार अगदी प्राचीन काळापासून आजतागायत चालू आहे.

९०

।। संस्कृती ।।

ख्रिस्ती व मुस्लिम समाजाचे आपल्या बांधवांशी वागावयाचे नियम व अखिस्ती व अमहंमदी मानवतेशी वागावयाचे नियम अगदी भिन्न आहेत. ख्रिस्ती लोक व महमंदी लोक इतर मानवांना कमी दर्जाचे समजतात; व त्यांच्याशी वागताना सत्य, समता इत्यादी गोष्टींना मुळीच महत्त्व देत नाहीत. जी गोष्ट ह्या दोन सांप्रदायिकांची, अगदी बरोबर तीच कम्युनिस्ट मतप्रणालीच्या लोकांची आहे. ह्या तिघांचाही दावा असा आहे की, मानवसमाजाच्या अंतिम हिताची गुरूकिल्ली त्यांना सापडलेली आहे; उच्चतम धर्माचे दर्शन त्यांना झालेले आहे; ज्या आंधळ्यांना ते झाले नाही, त्यांना हात धरून तिकडे नेले पाहिजे; ते आले नाहीत, तर बलात्काराने नेले पाहिजे; बलात्कारानेही नेता आले नाही, तर ती माणसे मेलेली बरी. आज मानवसमाजात संघांतर्गत धर्म व संघाबाहेरील व्यक्तींशी वागावयाचा धर्म ह्यात जितकी फारकत झाली आहे, तितकी दुसऱ्या कोणत्य कोणत्याही ऐतिहासिक कालात दिसून येत नाही.

 संघांतर्गत विधीनिषेधही सर्वसामान्य नसतात. निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळे नियम लागू असतात. आपल्या हिंदुसमाजात उत्तरेकडे फार पूर्वीपासून पुरुषाला पितृ-(माता + पिता) - भक्ती हा परम धर्म सांगितला आहे; पण स्त्रीचा मात्र पतिभक्ती हा अंतिम धर्म मानिला आहे. लग्न होईपर्यंत पितृभक्ती व नंतर पतिभक्ती असा नियम जर स्त्रीच्या बाबतीत, तर लग्न होईपर्यंत पितृभक्ती व नंतर पत्नीभक्ती हा नियम पुरुषांना का नसावा? पितृप्रधान एकत्र कुटुंबपद्धती हा हिंदूंच्या समाजरचनेचा गाभा होता. अशा कुटुंबातील पुरूष एकमेकांबरोबर जन्मभर राहिलेले असतात. कुटुंबात जन्मलेल्या स्त्रिया परघरी जाणाऱ्या असतात. कुटुंबात वधू म्हणून येणाऱ्या, पुढे माता होणाऱ्या स्त्रिया परघरून आलेल्या असतात. अशा स्त्रियांनी जर आपापल्या पितृकुलाशी इमान राखले, तर घरात जितक्या स्त्रिया तितकी निरनिराळी राजकारणे उत्पन्न व्हावयाची व कुटुंबाला विस्कळीतपणा यायचा. ह्यासाठी बालविवाह करणे म्हणजे परघरातील स्त्रियांना शक्य तितक्या लहानपणी आपल्या घरी आणून रुळविणे व पतिभक्ती हे

।। संस्कृती ।।

९१

उच्चतम ध्येय त्यांच्या पुढे ठेवणे अशी कुटुंबपद्धती टिकविण्याचे मार्ग होते. कौरवांच्या घरी गांधारीच्या भावाचे व पांडवांच्या घरी कुंतीच्या भाच्याचे वर्चस्व नसते, तर कुरूवंशाचा निष्पात कदाचित होता ना. वरील उदाहरणाने दिसून येईल की, धर्म म्हणून जे आहे, ते विशिष्ट समाजरचना टिकवून धरण्याचे नियम आहेत. काही प्रदेशातील मातृप्रधान कुटुंबात लग्नाचे नातेवाईक मुळी राहतच नाहीत. एका घरात राहणारी माणसे नवराबायको, सासु-सासरा, जावा-जावा वगैरे नसून फक्त आई, मुलगे, मुली, भावंडे अशी असतात. लग्न करुन बाहेरून आणिलेल्या निरनिराळ्या पिढ्यांतील स्त्रिया (सासवा, जावा, सुना) व त्यांची स्पर्धा ह्यांचा प्रश्नच उरत नाही. घरातील सर्व माणसे घरातील स्त्रियांची मुले वा भावंडे असतात. पुरूषांची मुले आपापल्या आयांच्या घरी असतात. नवरे संध्याकाळचे क्वचित एखाद्या दिवसाचे पाहुणे असतात. बाप मुलांना दिसतात; पण घरी राहणारे नसतात; व मुलांवर त्यांची सत्ताच नसते. अशा कुटुंबात 'मातृभक्ती' हेच एक परमोच्च ध्येय सर्व स्त्रीपुरुषांना समान असते. पतिभक्ती किंवा पत्नीप्रेम ह्यांना जागाच नसते. रचनाभिन्नत्वामुळे पितृप्रधान समाजात बहुपत्नीत्व चालू शकते, भूषणावह ठरते. तर मातृप्रधान समाजात बहुपतित्व चालू शकते व भूषणावहही ठरते. जी गोष्ट पितृभक्ती, पतिभक्ती वगैरेंची ती इतरही सामाजिक मूल्यांची. सर्व परिस्थितीत चालू शकेल, असे मूल्य सापडणे कठीण. आणखी एक उदाहरण देते. आईची मुलाविषयी माया र असते, व ती तशी असावी, अशी बहुतेक मानवसमाजांत अपेक्षा असते. मूल जन्मल्याक्षणापासून स्वतःच्या जिवाकडे लक्ष न देता त्याची शुश्रूषा आईने करावी, अशी अपेक्षा बहुतेक समाजांतून असते. पण काही समाज ह्याला अपवाद आहेत. कालाहारी वाळवंटाच्या कडेला राहणारे 'बुशमन' म्हणून लोक आहेत. त्यांचे जीवन भटके असते. एकीकडच्या पाण्याचा व अन्नाचा साठा संपला की टोळी दुसरीकडे जाते. कित्येक महिने त्यांना रोज २०-२५ मैल जावे लागते. अशा वेळी एखादी बाई बाळंत झाली, तर नाळ तोडून ती मुलाला पाठीवरच्या पिशवीत घालते. मुक्कामाला गेले की मुलाला बाहेर
९२

।। संस्कृती ।।

काढिते. ते तोपर्यंत जिवंत असले, तर त्याला प्यायला घेते; नाही तर खड्डा करुन पुरुन टाकते. अशा परिस्थितीत अपत्यप्रेमाची कसोटी आईला लावणे शक्य आहे का? हे स्त्रीपुरुष क्रूर मुळीच नाहीत. कष्टमय जीवनात जी मुले तग धरितात, त्यांचे संगोपन होते. आई बाप त्याला क्वचितच रागावतात किंवा मारतात. एकत्र - कुटुंबपद्धतीत आपल्याच मुलाचे लाड करणे योग्य ठरत नाही. पण काही परिस्थितीत मुलाकडे लक्ष पुरविणे शक्यच होत नाही. अपत्यप्रेम सगळ्याच आयांना असते; पण पूर्ण अविष्कार काही समाजपद्धतीतच शक्य होतो.

 स्त्रीच्या अपत्यप्रेमापायी सबंध समाज मरण्याची शक्यता असेल, तर स्त्रीने अपत्याची उपेक्षा करावी, अशी समाजाची अपेक्षा असते; व स्त्रीही त्या अपेक्षेप्रमाणे वर्तन करते.
 परदारा व परद्रव्य यांचा अपहार करू नये, हेही नियम बहुतेक समाजांत सांगितलेले असतात; पण त्याही बाबतीत काही समाजांचे धर्म अपवादात्मक दिसतात. काही समाजांत पाहुण्याला एकदोन रात्रींसाठी स्वस्त्री देण्याची रीत आहे. परद्रव्याच्या अपहाराची पद्धत तर फारच मजेदार असते. सर्व मानवसमाजांची कमीत कमी देऊन जास्तीत जास्त मिळविण्याची धडपड चाललेली असते. चारही दिशांना सैन्य पाठवून, सर्व राजांचा पराभव करून, त्यांच्याकडून लुटून आणलेल्या द्रव्याने राजसूय यज्ञ करुन, सर्व द्रव्य दान - देऊन मोठेपणा मिळवायचा प्रघात सर्वांना ठाऊकच आहे. तोच प्रकार थोड्याबहुत प्रमाणात सर्व मानवसमाजांत चाललेला दिसून येतो. जबर व्याजाने पैसे लावून व्याज न मिळाल्यास घरजमिनींवर जप्ती आणून द्रव्यसंचय करावयाचा, मग सहस्त्रभोजन घालावयाचे, कुरुक्षेत्रावर घाट बांधावयाचा, किंवा एखाद्या अनाथालयाला पैसे देऊन स्वतःचे नाव करावयाचे, हा प्रकार सर्वत्र चालतोच. परद्रव्याचे हरण करावयाचे काही मार्ग समाजसंमत असतात, काही नसतात, एवढेच. परदारेबद्दलही हाच प्रकार दिसतो. स्त्रियांबद्दलही जे-जे नियम आहेत, त्यांत एक गोष्ट लक्षात ठेवावयास पाहिजे: स्त्री ही एक मालकीची वस्तू आहे; तिला मिळवणे हा एक पुरुषार्थ

।। संस्कृती ।।

९३

आहे; तिच्यावर सत्ता गाजविणे म्हणजे तिला बाळगणे, टाकणे किंवा मारणे हे सर्व तिच्या स्वामीला करता येते. ज्या कारणासाठी परद्रव्यहरण करावयाचे नाही, त्याच कारणासाठी परदाराहरण करावयाचे नाही. दुस-याच्या मालकी हक्कावर गदा आणावयाची नाही; कारण अशा तऱ्हेच्या अतिक्रमणामुळे वैर व वैरांतून अंतर्गत यादवी माजून संघाचा नाश होईल. परदाराहरण करू नये; पण कुमारिकेच्या किंवा विधवेच्या हरणाबद्दल काही विशेष निषेध नाही. ह्याची दोन उत्तम उदाहरणे आहेत. एक बौद्धवाङ्मयात व एक आपल्या इतिहासात. बौद्धवाङ्मयाची कथा 'दीघा जागरतो रत्ति, दीघं संतस्स योजनं । दीघो बालानं संसारो...।।' ह्या श्लोकाच्या अनुषंगाने लिहिलेली आहे. काशीच्या राजाला नगरप्रदक्षिणेच्या वेळी एक रूपवती स्त्री दिसली; व तिच्यावर त्याचे मन बसले. राजवाड्यात आल्यावर त्याने आपल्या प्रधानाकरवी त्या स्त्रीबद्दल चौकशी केली- ती स्त्री' अस्सामिका वा सस्सामिका' आहे ह्याची, म्हणजे त्या स्त्रीला स्वामी (नवरा) आहे का नाही त्याची. ती जर अस्सामिका असती, तर राजाने तिला ताबडतोब अंतःपुरात आणिले असते. पण दुर्दैवाने ती लग्नाची बायको निघाली व मग तिचे हरण करण्याआधी राजाला तिच्या गरीब कामकरी नवऱ्याला मारण्याविषयी क्लृप्त्या योजाव्या लागल्या पण त्या सिद्धीस गेल्या नाहीत, व राजाला बुद्धाच्या उपदेशाने उपरती झाली. अशी कथा आहे. दुसरे उदाहरण मोगल राजा जहांगीरचे आहे. जहांगीर युवराज असताना त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. पण अकबराने तिचे लग्न एका सरदाराशी लाविले. जहांगीर बादशहा झाल्यावर त्याने मलेरियापीडित बंगाल प्रांतात त्या सरदाराची नेमणूक केली. तो सरदार मारला गेला किंवा मेला; व मग जहांगिराने या विधवेशी लग्न करुन तिला पट्टराणी केले. तीच पुढे नूरजहान या नावाने प्रसिद्ध पावली. दोन्ही गोष्टींत सुंदर स्त्रीचा अभिलाष प्रत्यक्ष राजा असूनही नवऱ्याच्या जिवंतपणी त्याला तिचा अपहार राजरोसपणे करिता येईना. दारा ही मालमत्ता असल्यामुळे मालमत्तेचे सर्व नियम तिला लागू पडत. आफ्रिकेमध्ये बहुपत्नीत्वाची चाल आहे. एखादा राजा मेला, तर त्याचे


९४

।। संस्कृती ।।

राज्य, व मालमत्ता व सर्व बायका मुलाला मिळतात. ज्यांना बायका हव्या असतील, त्यांना द्रव्याच्या मोबदल्यात ह्या बायका मिळू शकतात. म्हणजे . परद्रव्य व परदाराहरण यांविषयीचे नियमही समाजघटनासापेक्ष आहेत. विशेष मौल्यवान नीतिनियम असे त्यांना म्हणता येणार नाही.

 "म्हणजे, सर्वत्र लागू पडतील, असे नीतिनियम किंवा असा धर्म नाहीच का?"
 - बघू या आहेत का. पण आपण त्याचा विचार करण्याआधी, ते सापडले आहेत, असा ज्यांचा दावा आहे, त्यांचे काय म्हणणे आहे, ते पाहू.
 ह्यांपैकी दोन सांप्रदायिक आहेत: एक ख्रिस्तानुयायी व दुसरे महंमदानुयायी. ह्यांचे म्हणणे असे की, खुद्द देवाचा प्रतिनिधी येऊन त्याने आम्हाला सद्धर्म सांगितला, व त्याचा प्रसार करावयाची आज्ञा दिली. प्रत्यक्ष देवाने धर्म दिला, असा दावा जगातील पुष्कळच समाजांचा आहे. हामुराबीला सूर्यदेवाने कायदे दिले, अशी कथा आहे. अर्जुनाला प्रत्यक्ष देवाने गीता सांगितली, असा हिंदूंचा समज आहे. ह्यांतले खरे कोण ? अंतिम उच्चतम धर्म कोणता? 'माझ्याकडे या, मी तुम्हांला तारून नेईन,' अशा अर्थाची वाक्ये बायबलमध्ये. कुराणात व गीतेत आहेत, त्यांचा अर्थ लाविताना ख्रिस्ती व महंमदी लोकांनी 'सांगणारा मी' जो एक विशिष्ट देव त्याच्याकडे या, दुसऱ्या देवांकडे जाऊ नका, असा अर्थ केला; तर गीतेमध्ये जेथे जेथे 'माझ्यावर विश्वास ठेव ( श्रद्धावान्), माझे स्मरण कर (मय्यर्पितमनोबुद्धिः), माझ्या मागून ये ( मम वर्त्मानुर्तन्ते)', अशी वाक्ये आहेत, तेथील 'मी' विशिष्ट देवतेबद्दल नसून सर्वसामान्यपणे दैवी शक्तीला लाविलेले आहेत, असा अर्थ सर्व टीकाकारांनी व जनतेने केला. कृष्ण सांगताना 'कृष्णाचीच पूजा कर, इतरांचा तिरस्कार कर', असे कोठेही सांगत नाही; इतकेच नाही, तर देवाचे रूप भक्ताच्या आर्तीवर अवलंबून आहे, असेही सांगतो. तेव्हा देवाने फक्त जगातील एका जमातीलाच अंतिम धर्म दाखविला, हा दावा टिकून राहत नाही. प्रत्येक जमातीने आपली दैवते निर्माण केली. काहींनी आपले तेच दैवत, इतर नव्हेतच, असा हट्ट धरिला; तर बहुतेकांनी इतरांच्या दैवतांचे

।। संस्कृती ।।

९५

अस्तित्व कबूल केले. ज्याला सांप्रदायिक देवकथित धर्म म्हणतात, तो त्या त्या समाजातील धर्म होता; व त्याला देवाचे अधिष्ठान देऊन तो बळकट करावयाचा प्रयत्न झाला, इतकेच. एकमेकांशी भांडणाऱ्या, माझाच माल चांगला आहे अशी स्पर्धा करणाऱ्या सांप्रदायिकांना उच्चतम धर्म सापडला असेल, असे म्हणवत नाही. विशेषेकरून त्यांनी सांगितलेली व आचरिलेली जी तत्त्वे आहेत, त्यांपेक्षा चांगले जगात इतर समाजात दिसून येते; म्हणून हा दावा मान्य होणे शक्य नाही.

 बुद्धानेही आचाराचे अंतिम नियम सांगितले, पण ते जन्मोजन्मी पारखून, विचार करून, असा बौद्धधर्मीयांचा समज आहे. जगातले दुःख कमी करण्यासाठी बुद्धाने धर्म सांगितला. ह्या धर्माचा मुख्य पाया अतीव कारुण्य हा आहे. व्याधी, जरा व मृत्यू ही मानवदेहाबरोबरच जन्माला आली आहेत. ती नाहीतशी होणे शक्य नाही. पण त्यांमुळे उत्पन्न होणारे दुःख कमी करणे किंवा अजिबात नाहीसे करणे शक्य आहे. तो मार्ग म्हणजे जगावरील आसक्ती सोडून जगात वावरणे व अंती संसारचक्रापासून पूर्ण मोक्ष मिळविणे. सर्व भूतमात्रांबद्दल कारूण्य व दया ही ह्या संप्रदायाचा गाभा आहेत. पण आसक्ती असणारे प्रेम वा भक्ती मग ती कितीही निःसीम असो, - ह्या संप्रदायाला मान्य नाही. ह्याबद्दल एक सुंदर गोष्ट बौद्धवाङ्मयात सांगितली आहे. पुष्कळ शिष्य होते; त्यांपैकी पुष्कळ (मोग्ग्लायनासारखे) बुद्धादेखतच कैवल्यपदापर्यंत पोहोचले. बुद्धाला न विसरणारा साधाभोळा असा आनंद नावाचा त्याचा शिष्य होता. तो नेहमी म्हणे, "भगवन, आपण कित्येकांना कैवल्यपदापर्यंत पोहोचविले मी मात्र रात्रंदिवस आपल्याजवळ राहून आहे तिथेच. असे का?" बुद्ध म्हणाले, "वेळ आली म्हणजे सांगेन." पुढे भगवान मृत्युशय्येवर पडले, तेव्हा आनंद शेजारीच ओक्साबोक्शी रडत होता. भगवानांनी त्याला जवळ बोलाविले व विचारले, "आनंदा, का मी रडतोस?" तो म्हणाला, "हे काय विचारणे? आपणांशिवाय ह्या जगात राहणार कसा?" भगवान म्हणाले, "ह्यामुळेच बरे आनंदा, तु कैवल्यपदाचा अधिकारी झाला नाहीस." बुद्धाचे तत्त्वज्ञान व हिंदूंचे तत्त्वज्ञान ह्यात फरक

९६

।। संस्कृती ।।

थोडा आहे. दोन्ही धर्म एका बाजूने उच्चतम, सर्वसाधारण अशी मोक्षाची तत्त्वे सांगतात, व दुसऱ्या बाजूने नसत्या आचारधर्माचे स्तोम माजवितात. बुद्धाच्या शिकवणीत काही तत्त्वे अशी दिसतात की, ती सार्वजनिक व सार्वकालिक वाटतात. आपण त्यांचा पुढे विचार करू.

 हल्लीच्या काळात युरोपात कम्युनिस्ट मतप्रणालीचा उगम झाला. हा उगमही कारूण्यात व दयेत झाला; पण त्याच्याच जोडीला अन्यायाची चीड व त्याचा प्रतिकार करण्याची तीव्र इच्छा होती. बुद्ध ज्यांना दुःख म्हणे. ती मानवाच्या मानवपणामुळे उत्पन्न झालेली व त्यावर इलाज नसलेली अशी होती. पण मार्क्स व एंगेल्स ह्यांना जी दुःखे दिसली, ती समाजातील विषमतेमुळे उत्पन्न झालेली होती. समाजाची रचना पालटली, म्हणजे ती दुःखे संपून सुखाची पहाट होईल, अशी ह्या द्रष्ट्यांची कल्पना होती. अशाच तऱ्हेची कल्पना फ्रेंच क्रांतिकारकांचीही होती. मनुष्याच्या दुःखाचे मूळ नैसर्गिक किंवा दैवी नसून मानवी आहे. समाजाची रचना अशी झाली आहे की, काहींच्या हातात अर्थ व सत्ता केंद्रित झाली आहे, त्यामुळे ते इतरांना राबवितात, श्रमाचा मोबदला पुरा देत नाहीत, व जीवन दुःसह अथवा सर्वस्वी असह्य करून टाकितात. श्रमजीवी लोकांच्या हातांत सत्ता गेली, म्हणजे अर्थकामांची विषमता जाईल व मानवाचे कल्याण होईल, हा ह्या लोकांचा दावा. बुद्ध आणि कम्युनिस्ट ह्यांच्या ध्येयांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. बुद्धाचे डोळे अस्मानात लागलेले होते. तो ह्या जीवनाची असारता शिकवीत होता; तर कम्युनिस्ट फक्त ह्या पृथ्वीवरील जीवनाचाच विचार करतात. दोन्ही शिकवणींचा उगम दयेच्या पोटी असला, तरी साधने मात्र सर्वस्वी भिन्न आहेत. कम्युनिस्ट द्रष्ट्यांच्या विचाराला चालना दयेने प्रेरित होऊन मिळाली असली, तरी ते दयेशीच थांबले नाहीत. दुःखाची सामाजिक बीजे काय, ह्याचे संशोधन करून गरिबांच्या हाती सत्ता आली, तर दुःखे नाहीतशी होतील, असा सिद्धांत बांधून, त्या तत्त्वांवर समाजरचना करण्याच्या मार्गाला ते लागले. ही रचना करताना त्यांनी अति क्रूर व निष्ठुर मार्गांचा अवलंब केला. नुसत्या श्रीमंतांनाच नाही, तर

।। संस्कृती ।।

९७

गरिबांनाही हजारोंनी ठार मारिले, हद्दपार केले, कुटुंबियांची ताटातूट करून अपार दुःख दिले. त्यांच्या मते त्यांनी अंतिम धर्म शोधून काढला आहे. धर्म म्हटला की, त्या धर्माचे रक्षण करणारे, त्या धर्माचे स्मृतिकार, टीकाकार, उपदेशक निर्माण होणारच. हे सर्व मिळून मूळच्या लवचिक कल्पनांना एका पोलादी चौकटीत बसदितात; व मग त्या धर्माच्या क्षुद्रतम यमनियमांविरुद्ध बोलणे पाप ठरते. पृथ्वीच्या ज्या विभागावर ख्रिस्ती धर्मासारख्या एकेश्वरी पंथाचा पगडा होता, त्या युरोपातच कम्युनिस्ट मतप्रणाली उगम पावली, ही ऐतिहासिक घटना लक्षात ठेविली पाहिजे. ख्रिस्ती पंथाची विचारसरणी कम्युनिस्टांनी तंतोतंत उचलिली आहे. कम्युनिस्ट हा एक घट्ट बांधलेला, परस्परांशी बंधुभाव असलेला पृथ्वीव्यापी सघ बनला आहे. ह्या संघाच्या आतील व्यक्तींची आचारधर्माची बंधने वैदिकांनाही लाजवितील इतकी कडक आहेत; तर संघाबाहेरच्या व्यक्तींच्या विषयीचे वर्तन रानटी लोकांचे परसंघाविषयी असते, त्यापेक्षाही द्वेषाचे आहे. साम, दाम, भेद व दंड ह्यांपैकी काहीही वापरून कम्युनिस्ट नसलेल्यांना कम्युनिस्ट करावयाचे, हा संघाबाहेरच्या लोकांविषयीचा त्यांचा एकमेव दृष्टिकोण आहे. कम्युनिस्टांच्या मते त्यांना अत्युच्च मूल्य, परमधर्म सापडलेला आहे. जगाचा इतिहास व सध्याचे मानवी समाज ह्यांच्या परिशीलनाने मार्क्स, एंगेल्स वगैरे द्रष्ट्यांना ह्या मूल्याचे दर्शन झाले. त्यांच्या मते हा धर्म सार्वजनिक म्हणजे सर्व मानवजातीला लावण्यासारखा आहे. तो सार्वदेशिक म्हणजे सर्व परिस्थितीत उपयुक्त आहे; व सार्वकालिक म्हणजे सर्व काळी उचित असा आहे. एकदा साध्य ठरले, म्हणजे साधनांच्या नैतिक मूल्यांची चिकित्सा करणेही कम्युनिस्टांना पसंत नाही येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. समताधिष्ठीत मानवसमाजाची निर्मिती होण्यास कष्टजीवी लोकांच्या हाती सत्ता गेली पाहिजे; पण एकदा असा मानवसमाज निर्माण झाला, म्हणजे कोणीच सत्ताधारी राहण्याचे कारण नाही, अशी मार्क्सची कल्पना होती. पण आता तिचा उच्चार होताना ऐकू येत नाही.
९८

।। संस्कृती ।।

 हे नवीन मत मानवजातीचे अंतिम मूल्य होऊ शकेल का, ह्याचा विचार करण्याआधी एका गोष्टीकडे लक्ष वेधले पाहिजे. एका विशिष्ट दैवताच्या भक्तीवर आधारलेल्या दोन मतप्रणाली आपण पाहिल्या. त्यांचा धर्म इतर समाजांच्यापेक्षा वेगळा नव्हता. काय करावे, केव्हा करावे, कोणास भजावे, कसे भजावे, अशी अगदी रोजच्या व्यवहारातील तत्त्वे त्यांत सांगितली होती. पण बुद्धमत व शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व कम्युनिस्ट आणि इतर मतप्रणाली ह्यांच्या तत्त्वविषयक लिखाणात विशिष्ट आचारधर्माला मुळीच महत्त्व नाही. बुद्ध व शंकर व्यक्तीने निर्वाण व मुक्ती व त्यांद्वारे अंतिम सुख कसे मिळवावे, ह्याचा विचार करतात. बुद्धाची शिकवण व्यक्तीला होती; पण त्याच्या अनुयायांनी स्थापिलेला धर्म सांघिक होता, व व्यक्तीचे अंतिम ध्येय प्राप्त होण्यासही 'संघं सरणं गच्छामि' अशी संघानुसरणात्मक प्रतिज्ञा उत्पन्न झाली. शंकराचे तत्त्वज्ञान व्यक्तीगत राहिले; पण मोक्षाप्रत पोहोंचले. तरी सामाजिक कर्तव्य पार पाडली पाहिजेत, असे सांगून गीताटीकेच्यां मिषाने आचार्यांनाही थोडेसे समाजाभिमुख व्हावे लागले. पण शांकर तत्त्वज्ञान हे खरोखर व्यक्तीसाठी आहे, समाजासाठी नव्हे. ह्याउलट हल्लीच्या मतप्रणाली केवळ मनुष्यसमाजाचा विचार करतात. मानवी जगाच्यावर काही अज्ञात आधिदैविक शक्ती आहे, हा विचार त्यांना मान्य नाही. आपल्या विचाराला पुष्टी देण्यासाठी कोणत्याही दैवताचे आवाहन ते करीत नाहीत. ह्या जगात मानवसमाजाचे रूप कोणते असले म्हणजे मनुष्याचे हित होईल, एवढे फक्त ते पाहतात. कम्युनिस्ट समाजाच्या किंवा त्यातही एका विशिष्ट वर्गाच्या हिताकडेच जास्त लक्ष देतात. व्यक्तीच्या सुखाच्या व हिताच्या विचाराचा जवळजवळ लोप झालेला दिसतो. ह्याउलट इतर मतप्रणालीतून व्यक्ती व समाज ह्यांचे हक्क व कर्तव्ये कोणती, ह्याबद्दलचे सर्व विचार असतात. विशिष्ट आचारधर्माचा विचार आढळत नाही, तर समाजरचनेच्या तत्त्वांचा विचार आढळतो. निव्वळ आचारधर्म हा सापेक्ष आहे, असे आधुनिक समाजशास्त्रज्ञ व शासनशास्त्रज्ञ धरूनच चालतात. त्यामुळे ह्या विवेचनात परदाराहरण, परधनहरण, पतिभक्ती, पितृभक्ती वगैरेंना स्थानच नसते. पहिल्याने समाजरचनेच्या तत्त्वांचा ऊहापोह होतो, मग त्या अनुषंगाने क्वचित व्यक्तीगत आचारधर्माचे दिग्दर्शन होते.
।। संस्कृती ।।

९९

 कम्युनिस्टांचे ध्येय समाजहितवर्धक आहे किंवा नाही, हे पाहण्याआधी ज्या दोन गोष्टी बुद्धीला पटत नाहीत, त्यांचा उल्लेख करणे जरूर आहे. त्यांतील पहिली म्हणजे जे काही हित असेल, ते 'समाजाचे' किंवा 'एका वर्गाचे', समाजांतर्गत एका विशिष्ट संघाचे असेल, असे कम्युनिस्टांचे म्हणणे आहे. त्यांच्या दृष्टीने हिताहितांच्या विचारात व्यक्तीला काडीमात्र स्थान नाही. व्यक्तीचे सुख, व्यक्तीचे स्वास्थ्य ह्याही गोष्टींची जेथे दखल घेतली जात नाही, तेथे व्यक्तीविकासाची गोष्टच बोलावयास नको. पहिल्याने त्यांचे लिखाण एका वर्गाबद्दल होते; आता ते सर्वस्वी एका राष्ट्राबद्दल आहे. ते राष्ट्र म्हणजे कम्युनिस्ट रशिया. कम्युनिस्ट रशियाचे वर्चस्व राखण्याच्या प्रयत्नांत व्यक्तींचा व इतर राष्ट्रांचा त्याग नेहमी अपुराच पडतो. अंती संघाचे हित तेच व्यक्तीचे हित, तेव्हा संघाच्या हिताची फक्त दक्षता बाळगली पाहिजे; एवढ्यावरच ते थांबत नाहीत. हित फक्त संघाचेच असते, व्यक्तीच्या हिताचा विचार समाजहिताला विघातक आहे, अशीच त्यांची विचारसरणी आहे. संघ आणि व्यक्ती ह्यांबद्दलचा हा सिद्धांत मी मागे सांगितलेल्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. समाजहिताचे नाव पुढे करून काही विशिष्ट सत्ताधारी व्यक्ती आपला मोठेपणा साधीत असतात. हा प्रकार इतिहासात सर्वत्र दिसून येतो. इजिप्तच्या राजांनी जगातील एक महान आश्चर्य असे पिरामिड बांधून इजिप्तचे नाव केले. हे पिरामिड बांधताना मजुरांच्या किती पिढ्या गारद झाल्या, त्याचा अंदाज हल्लीचे इतिहासकार करत असतात. राष्ट्रकूट राजांनी वेरुळची लेणी बांधून आपले नाव अजरामर केले. चीनच्या मजुरांचे व कैद्यांचे किती बळी चिनी भिंतीने घेतले, हे एक परमेश्वरच जाणे. पुंजीपती सम्राटांच्या अमानुषत्वाची उदाहरणे म्हणून वरील घटनांचे वर्णन करण्यात येते. रशियाला आजचे वर्चस्व प्राप्त करून देण्यासाठी बहुजनसमाज व इतर राष्ट्रांचे कैदी ह्यांकडून करून घेतलेले काम व त्याप्रीत्यर्थ मरण पावलेले लोक ह्यांची गणती कोणी करावी? श्रमिक वर्गाचे हित बाळगणारे तत्त्वज्ञान म्हणावे तर प्राणिमात्रांच्या साध्या गरजांना आंचवलेले हे लोक श्रमिक नव्हते का? ज्यांच्यासाठी राष्ट्राने मोठे व्हावे,


१००

।। संस्कृती ।।

समाजाने श्रीमंत व्हावे, त्यांनाच दुःखात लोटण्याचे तत्त्वज्ञान मनाला पटत नाही. कोणी म्हणेल की, 'शत्रुचा घाला आला, तर नाही का पुष्कळसे प्राण खर्ची घालून ते परतवून लावीत? तसेच हेही आहे. युरोपातील एका अवाढव्य पण मागास राष्ट्राची उन्नती करावयाची होती, व त्यासाठी महान त्यागाची आवश्यकता होती. पण त्याग कोणाचा? हा विचार रशियाबद्दल आहे म्हणून आपल्याला त्याच्याशी काय करावयाचे आहे, अशी शंका येऊ १. आपल्यापुढेही तेच प्रश्न आहेत. आपलाही देश १००-१५०वर्षांच्या

त्र्यानंतर नुकताच स्वतंत्र झाला आहे. तो सर्व दृष्टीने मागास आहे. eKा वस्तू लागली की, परदेशातून आणावी लागते. कापड गिरण्यांखेरीज "नक उत्पादनाची साधने आपल्याकडे नव्हती. सर्व यंत्रसामग्री परदेशातूनच "वा लागते. अशा वेळी जे धंदे आहेत त्यांची घडी नीट बसवून हळ हळ " सामर्थ्य वाढवीत जाणे हा एक मार्ग होता. पण तो गौण म्हणून "३" सर्व धंद्यांचा पाया म्हणजे यंत्रे तयार करणे व त्यांसाठी भरपूर लोखंड व तयार करणे हा मार्ग आपण अंगिकारिला आहे. हा मार्ग इतक्या " आहे की, त्यामुळे पुढील २५ वर्षे भारताला फार कष्टाची जाणार ": ह्या कष्टांच्या वर्षात श्रमिक व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याचा | प्रयत्न करणार की समाजहितासाठी त्याच्याकडे डोळेझाक करणार, " आहे. सत्ताधीशांचे श्रीमंती जीवन व त्यांच्या तोंडचा त्यागाचा उपदेश ऐकिला म्हणजे आपणही रशियाचे पूर्ण अनुकरण करात " त. स्वराष्ट्रासाठी किंवा स्वसमाजासाठी मोठी ध्येये डोळ्यांपुढे १ ती तडीस नेण्यास जो त्याग लागतो, तो 'त्याग' असावयास लला असला पाहिजे; पुढा-यांनी इतरांना करावयाला भाग पाडले , असा तो अस नये. त्याप्रमाणे 'समाज' किंवा राष्ट्र हे त्यातील तापक्षा काही निराळे आहे, ही समजूत चुकीची आहे. | कम्युनिस्ट विचारसरणीतील आणखी एक मोठा दोष म्हणजे नियमबाह्य 1 करणा-यांविषयीचा त्यांचा दृष्टिकोण, समाजाने प्रमाण म्हणून मानिलेले खर्चाचा 3 हे पाहणे आहे. सत्त वाटू ल ठेवण्यास स्वेच आहे, असा तो असू नये. त्य वर्तन करणा-या १०१ । संस्कृती ।। विचार व आचार ह्यांच्या विरूद्ध नकळत वा कळत ज्याचे वर्तन होईल, त्याला अत्यंत कडक शिक्षा देण्यात येते. प्रमाण म्हणजे काय, प्रमाणशून्यता म्हणजे काय, ह्यांबद्दल थोडेसे विवेचन मागे आलेच आहे. प्रमाण हे केव्हाही सर्वतया सुस्पष्ट असत नाही. समाजात प्रत्येक क्षणी बदल होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा आचार व विचार हा दुस-या व्यक्तीच्यापेक्षा थोडा निराळ असतो, आणि हे सर्व थोडे-थोडे अंशमात्र बदलणारे जे आचारविचार असतात, त्यांची गोळाबेरीज म्हणजे प्रमाण होते. ज्या शास्त्रांना बिनचूक मोजमापा (Exact) शास्त्रे म्हणतात अशा भौतिकी (Physics),रसायन, इ. शास्त्रात प्रमाणाचे स्वरूप असेच असते. कोठच्याही वस्तूची लांबी, रुंदी, वेग मूलभूत प्रमाणेही तंतोतंत ठरविणे शक्य नाही, अशी विचारसरणी प्रस्थापित झाली आहे. हायड्रोजन अणूचे वजन अमुक-एक अस म्हणतात, तेव्हा अनेक हायड्रोजन अणूंच्या वजनांची सरासरी का असते. हीच गोष्ट जीवशास्त्रातही प्रत्ययास येते. मनुष्याच्या शो घडणीचे एक तत्त्व म्हणजे डावी व उजवी बाजू सारख्या असतात, ह्या नियमाला अपवाद म्हणून काही एकांगी असलेले अवयव (हृदय, सोडले तरी कोणत्याही शरिरात डावी बाजू सर्वस्वी उजव्यासारखा म्हणजे दोन्ही अंगाचा तंतोतंत सारखेपणा मुळी अस्तित्वातच नसून " 'कामचलाऊ' सारखेपणा असतो, असे म्हणावे लागते. दोन्ही 'सारखेपणा' हे सत्य नसून शास्त्रीय विचार व संशोधन सोपे जाव' उभी केलेली एक तात्त्विक पायरी आहे. जहाज समुद्र ओला बंदरातून दुस-या बंदरात जावे, म्हणून होकायंत्राच्या साहाय्याने मार्ग आखतात, व सुकाणू त्याप्रमाणे धरितात. लाटा, वारा गोष्टींनी जहाज आखलेल्या रेषेच्या उजवीकडे वा डावीकडे जा मार्गावर आणण्यासाठी नियंत्रक यंत्रे असतात. उजवीकडे चाललेल परत सरळ रेषेत न येता थोडे डावीकडे जाते. मग ते परत थोडे उ आणावे लागते. म्हणजे जहाजाच्या समुद्र प्रवासाचा आलेख काढ अ१२:३६, २४ मे २०१८ (IST)ब असा नागमोडी येईल. अ- ब ही सरळ रेषा हा प्रन १०२ मनुष्याच्या शरिराच्या ख्या असतात, हे होय. अवयव (हृदय, आतडी) व्यासारखी नसते. त्वातच नसून गोळाबेरीज, जागते. दोन्ही अंगांचा थन सोपे जावे, म्हणून 3 ओलांडून एका हाय्याने एक सरळ 7, वारा वगैरे नाना किडे जाते. ते परत डे चाललेले जहाज रत थोडे उजवीकडे ख काढला तर तो 7 हा प्रमाण मार्ग ।। संस्कृती ।। काही गाड्या जरा जास्त वा धारला, तर जहाज प्रमाणमार्गावर फार थोडा वेळ होतेसे दिसेल. कोठच्याही सामाजिक मूल्यांचा विचार केला, तर अगदी हीच परिस्थिती दिसून येईल. Sदा ही गोष्ट ध्यानात आली, म्हणजे असे लक्षात येईल की, प्रमाणबाह्य चार व विचार हे काहीतरी अघटीत आश्चर्यकारक नसून एक नैसर्गिक व अटळ प्रक्रिया आहे. प्रमाणाची लक्ष्मणरेषा ही अंश-अंश एकदा इकडे, एकदा तिकडे अशा हलणा-या रेषेतूनच उत्पन्न झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती " | हलणारा बिंदू असते; व त्या हलण्यातच सामाजिक बदलाची बीजे असतात. सामाजिक स्थैर्य हे निश्चल नसून सारख्या बदलणा-या गतिमान पून उत्पन्न होणारे स्थैर्य आहे. गाड्या जाऊन जाऊन रस्त्याला या पडतात. त्या आपण मळलेल्या, आखलेल्या मार्गाचे निदर्शक . पण अशा चाको-या कधीच गाडीच्या धावेच्या रुंदीच्या नसून नदान तिपटी-चौपटीने तरी रूंद असतात. ही रुंदी साधारणपणे प्रत्येक थोडे इकडे - तिकडे होण्याची स्वतंत्रता ठेवितेच, व त्याशिवाय ज्या जरा जास्त बाजूला जाऊन पुन्हा नव्या चाको-या पाडतात. "जातील प्रमाण-आचारविचारांचे व्यक्तिगत प्रमाणापासून अंशतः "प आचारविचारांशी हे नित्य स्वरुपाचे मूलभूत व अटळ नाते °ज आखून दिलेल्या मार्गाबाहेर वर्तन करणा-या लोकांना समाजाने सन करावे, कसे शासन करावे, हा एक मोठा विचार करण्यासारखा पन्न होतो. याखेरीज व्यक्ती जेव्हा नियमबाह्य वर्तन करते, तेव्हा पास व्यक्तीची घडण व जीवनातील परिस्थिती कारण होते. प्यक्तीचे काही शारीरिक व मानसिक गुण वंशपरंपरा आ परिस्थितीवर अवलंबन नसलेले असे असले, तरी तला, तर माणसे खितपत पडतात किंवा गुन्हेगारी करतात. 'उहगार म्हणजे जण काय समाजातील व्यक्तीच नव्हे, समाजाचा 7 समजून त्याला कडक शिक्षा करून, सुटकेचा एक निःश्वास अग झटकणे योग्य नाही. नियमबाह्य वर्तन करणा-यांना हद्दपार तःची जबाबदारी टाळणे *ण, वाळीत टाकणे व मारून टाकणे म्हणजे स्वतःची जबा १०३ पाहिले, म्हणजे आखून दिलेल्य कोणते शा मुद्दा उत्पन्न होतो. याखेरीज व्यक्त तसे करण्यास व्यक्तीची रिक व मानसिक गुण वंशपरंपरा आलेले व सामाजिक लिंबून नसलेले असे असले, तरी त्या गुणांचे चीज होण्याची परिस्थिती नसली, तर अशा वेळी गुन्हेगार म्हण नागच नव्हे, असे समजून त्यात टाकून अंग झटकणे योग्य ।। संस्कृती ।। च सत्य, व्यक्ती सर्वथा क्तिीच्या hळे व्हावयाचे, ट ज्या त-हेने चालली आहे. आणि सत्तासंक्रमणाच्या व समाजक्रांतीच्या काळांत असे करणे म्हणजे अधिकारलालसेने दुस-याचे हक्क व जीवित पायदळी तुडविणे आहे. अगदी हेच कृत्य गेली चाळीस वर्षे कम्युनिस्ट रशिया करीत आहे, कोणी नव विचार मांडला किंवा कोणाचा जुना विचार पटेनासा झाला की, त्या ‘पुंजीपतींचा हस्तक', 'साम्राज्यवाद्यांचा हेर' 'स्वधर्मद्रोहक' अशी शरा विशेषणे देऊन त्याचा जीव घेणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. हा मा आपली आहेत, ह्यांचा पिंड आम्ही बनविला आहे, अशी थोडीशी भावना असती, तरी रशियात ज्या प्रमाणात कम्युनिस्ट विचारवंताया। झाली, तशी होती ना. एका बाजूने समाज हेच सत्य, व्यक्ती समाजाने बनविलेली असे मानावयाचे, व दुस-या बाजूने व्य आचारविचारांची सर्वच जबाबदारी तिच्यावर टाकून आपण मोकळे 6 हे सर्वस्वी विसंगत आहे. आजतरी कम्युनिस्ट राजवट ज्या त-हन आहे, त्यातून काही चिरंतन मूल्यांची प्रतीती येते, असे म्हणवत " | समाजाचे जीवन थोड्याबहुत प्रमाणात नेहमीच प्रवाही असत व असते. हे एकदा समजले, म्हणजे विशिष्ट आचारधर्म हे कधीही वि किंवा सार्वलौकिक असणे शक्य नाही, हे आपोआपच प्रतीत हा प्रत्यक्ष व्यवहार किंवा आचारधर्म चिरकालिक नसले, तरी समाज अशी काही तत्त्वे असतील की, ती दीर्घ काळ टिकू शकतील. ह्या तत्व गोम अशी आहे की, प्रत्येक तत्त्वाचा अर्थ समाज निरनिराळ्या निरनिराळा करीत असतो. म्हणून तत्त्वे ही चिरकालिक म्हणता ये समाजाची रचना कशी आहे, ती कशी असावी, व्यक्ती व समाज " कसे आहेत, कसे असावे, ह्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास जसज" तसतसे सामाजिक मूल्यांचे स्वरूप समजण्यास मदत होईल. ९ जाणा-या वाहनांमुळे, इकडची बातमी काही तासा पोहोचविणा-या यत्रांमुळे, भयंकर संहारक अस्त्रांमुळे, कम्युनिस्ट व ह्यांच्या जगड्ड्याळ कारवायांमुळे कुठचाच समाज इतरांपासून आ शक्य नाही. सामाजिक मूल्यांचा विचार करताना सर्व मान १०४ ही असते व बदलते हे कधीही चिरकालिक • तरी समाजरचनेविषयी 1. ह्या तत्त्वांबद्दलही निराळ्या काळी लक म्हणता येत नाहीत. व समाज ह्यांचे संबंध स जसजसा होईल, होईल. हल्ली जलद तासातच तिकडे 7स्ट व भांडवलशाही पासून अलिप्त राहणे सर्व मानवजातीचा ।। संस्कृती ।। विचार करावा लागेल; व समाज व व्यक्ती एवढ्यावरच न थांबता निरनिराळ्या समाजांचे व संघांचे परस्परसंबंध कसे असावे, ह्याचाही विचार करावा लागेल. । पूर्वी जगाचा आजच्या इतका संकोच जरी झाला नव्हता, सर्व मानवसमाजाबद्दल आज आहे तेवढी माहिती जरी नसली, तरी सर्व मानवजातीला लागू पडतील, अशा तत्त्वांचा उच्चार झालेला आहे. 'वसुधैव टुम्बकम्' असा आचार ठेवावा, हे वचन विचार करण्यासारखे आहे. डुबपद्धती, विशेषतः पितृप्रधान कुटुंबपद्धती ही सर्वच व्यक्तींना सुखकारक असत असे नाही. ह्या कुटुंबात पुरुष वर्ग बराचसा स्वतंत्र असतो. नीतीची वन त्यांच्या बाबतीत शिथिल असतात. स्त्रियांचे स्थान गौण, परतंत्र असून त्यांच्यावरची नीतिबंधने अतिशय कडक व काही बाबतीत (उदा. सती जाणे) अमानुष क्रौर्याची होती. मुले-मुली व बायको ह्यांच्यावर पुरुषांची । सत्ता होती. तरीही साधारणपणे कुटुंबामध्ये सुख व शांती असे. काही उषांनी आपल्या बायका टाकून दिल्या, पणाला लावल्या, मारिल्या; आपल्या उच पैशाच्या मोबदल्यात म्हाता-याशी, रोग्याशी, अंधळ्याशी लग्न लाविले; आपल्या मुलग्यांचा राज्यावरील हक्क बाजूला ठेविला; काही स्त्रियांनी याला मारिले; मुलांनी पितरांना म्हातारपणी हाकून लाविले, राज्यलोभाने या खून केला; सख्ख्या सावत्रपणाच्या भांडणात खून व मारामा-या "; तरी कुटुंबात साधारणपणे भयंकर अन्याय होत नसत, कुटुंबाचे " समान नसूनही प्रत्येकाचे काही हक्क व कर्तव्ये होती. बापाकडून "G कटकटी न होता शांतपणे सत्तासंक्रमण व्हावे, म्हणून आश्रमधर्म गतला होता. कुटुंबातील बहुतेक घटकांना आज ना उद्या गौण स्थानापासून सत्तेच्या । स्थानापर्यंत जाण्याची शक्यता होती. आजचे पोर उद्याचा कर्ता असतो, आजची सून उद्याची सास असते. त्याचप्रमाणे घरातले मूल अनुभव खासच दुःखाचा नव्हता. कुटुंब मातृप्रधान असले, तरी Vतची स्थाने, लहानथोरपणा असतोच; पण कुटुंबातील रचना शी असते की, सर्वसाधारणपणे एकमेकांची नाती स्पर्धेपेक्षा प्रेमाची असतात. पित्या सांगितला असणे हा अनुभव खासच दुःखाचा त्यातही सत्तेची स्थाने, लहा १०५ || संस्कृती ।। सत्तासंक्रमण झाले, तरी त्यांत दुःखाबरोबर आनंदही असतो. असमानतेचे शल्य राहील,अशी कायमची असमानता नसते. काही परिस्थितीत हक्क नसलेल्यांना (मुले व स्त्रिया) इतकी सवलत मिळते की, कर्त्या पुरुषांची हाडे झिजतात व इतर चैनीत राहतात. कुटुंब हा संघ फार लहान, एकमेकांचे संबंध रोज येणारा, सर्व माणसे पुष्कळ काळ एकत्र राहिलेली, असा असतो. त्याची उपमा मोठ्या संघांना, किंबहुना सर्व मानवजातीला कशी लागू पडणार? तरीही रचनात्मक दृष्टीने मानवी समाजाच्या मूल्यांचा विचार करिताना कुटुंब ह्या संस्थेचा आपल्याला उपयोग होण्यासारखा आहे. नुसते कम्युनिस्टच नव्हेत, तर इतरही बरीच राष्ट्रे आज लोकराज्य में सामाजिक समता ह्यांवर भर देताना आढळतात. विषमता ही अन्याय द्योतक आहे. जास्तीत जास्त समता कशी प्रस्थापित करावयाची, ह्याचे मा" भिन्न आहेत. । 'समता' ह्या शब्दाबरोबरच 'स्वातंत्र्य व बंधुभाव' असे दोन शब्द वा. उच्चारिले जातात. पैकी 'स्वातंत्र्य' ह्या शब्दाचा उच्चार पाश्चात्य लाप विशेष करितात. कम्युनिस्ट रशियात ह्या शब्दाचा वापर फारसा ‘बंधुभाव' हा शब्द निरनिराळ्या अर्थांनी निरनिराळ्या समाजांत वापर दिसतो. आपण जसा श्रीयुत किंवा श्रीमती शब्द वापरतो, अगदी 'कॉमरेड' हा शब्द कम्युनिस्ट रशियात वापरतात. त्याचेच भाषांतर आप 'भाई' ह्या शब्दाने केलेले आहे; पण 'साथी', 'सौंगडी' ह्या ना नसलेल्या शब्दाने अर्थ जास्त चांगला साधतो. पूर्वी 'कॉमरेड काही विशिष्ट भावना असेल; आज तो केवळ उपचाराचा शब्द झा ज्याप्रमाणे श्रीयुत किंवा श्रीमती संपूर्णतया श्रीहीन असू शकतात, ‘कॉमरेड' म्हणून संबोधल्या जाणा-या माणसाबद्दल काडीचा नसून वैर असण्याचाही संभव आहे. सध्या आपणांला ह्या उपच न देता समता, बंधुभाव व स्वातंत्र्य ही समाजरचनेची व म्हणून धर्माची तत्त्वे म्हणून स्वीकारिता येतील का, हे पाहणे आहे. १०६ पाश्चात्य लोकराज्ये ता, अगदी तसाच तर आपल्याकडे |' ह्या नातेवाचक कामरेड’ शब्दामागे ' शब्द झाला आहे, शकतात, त्याप्रमाणे ल काडीचाही बंधुभाव या उपचाराकडे लक्ष व म्हणूनच उच्चतम ।। संस्कृती ।। | पण ते करण्याआधी आणखी एकदोन तत्त्वांचा विचार केला पाहिजे. ती म्हणजे 'सत्य' व 'न्याय'. समता, बंधुता, स्वातंत्र्य ही तत्त्वे ज्याप्रमाणे समाजरचनेची तत्त्वे होऊ शकतात, त्याप्रमाणे सत्य होऊ शकेल का? सत्य म्हणजे जे आहे ते. खरोखर पाहता त्याला चांगला किंवा वाईट असा काहीच गुण नाही. इतर तत्त्वांत 'आहे-ते' बरोबरच, किंबहुना आहे-ते' पेक्षा थोडा जास्त जोर 'असावे-ते' ह्यावर आहे. अप्रमाण आचारविचारांबद्दल पचार करताना मी प्रतिपादन केले होते की, आचारविचारांची प्रमाणे उरावण्यास सर्वच आचार कारणीभूत ठरतात. पण एक लक्षात ठेवले पाहिजे. या वेळी आपण ध्येयाकडे जावयाचा मार्ग कसा वेडावाकडा असतो, ते खविले. खुद्द ध्येयाची रूपरेषा सुस्पष्ट असते, की गोळाबेरीज कामचलाऊ असत? ध्येय हे 'अस्ति'-आहे, अशा स्वरूपाचे नसून 'सन्तु' -असोत, होवोत | अशा प्रकारचे असते. सूक्ष्म विचार केला, तर काही सांप्रदायिक सोडता याचे स्वरूप फारसे सुस्पष्ट असत नाही. ध्येयवाचक शब्द एकच असतो: निरनिराळे लोक व संघ तोच शब्द अर्थांच्या थोड्या थोड्या फरकाने उपयोगात आणतात. ध्येय ठरविण्यास सत्याचा उपयोग होतो म्हणावे, तर "° पटत नाही; कारण एका काळची स्वप्ने किंवा निव्वळ कल्पनाविलास उपन्या काळचे सत्य होऊन जाते. अंतरिक्षात भ्रमण करणे, दुस-या | जाणे, उत्तरध्रुवाच्या बर्फाखालून सर्व सुखसोयींनी युक्त अशा पाणबुडातून " ह्या गोष्टी पन्नास वर्षांपूर्वी कोणास शक्य तरी वाटल्या असत्या का? काही नवे शोध तर क्रांतीच्या दष्टीने ह्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत. नराचे वीर्य त ब-याच काळपर्यंत जिवंत अवस्थेत ठेवून ते मादीच्या गर्भाशयात " हा शोध नुसता आश्चर्यकारक नव्हे, तर विलक्षण क्रांतिकारक " आहे. शेतीत व पशुपालनात या शोधाचा सर्रास उपयोग होतोच. | पाच स्त्रिया नव-याकडन संतती होणे शक्य नसल्यास ह्या मागनि करून घेतात. पण नुकतेच एक असे उदाहरण घडले आहे की, S) प्रौढ कुमारिकेने या मार्गे प्रजोत्पादन करून घेतले. ही बाई एका या प्रमुख होती. एक उत्तम शिक्षिका, संचालिका व कर्तव्यदक्ष नागरिक १०७ ।। संस्कृती ।। म्हणून आपल्या गावात मान्यता पावलेली होती. तिचे म्हणणे असे की, पुरूषाच्या संगतीचा तिला कंटाळा होता, पण मातृत्व हवे होते. शाळेच्या नियामक मंडळाकडे तिने हे सर्व लिहून प्रसूतीची रजा मागितली व ती मंजूर झाली. कुटुंबसंस्था ही समाजाचा पाया समजली जाते, ती मूलतः बदलण्याचेच हे पूर्वचिन्ह आहे. ती नक्की कोणत्या दिशेने बदलेल, हे मात्र आत्ताच सांगता येत नाही. सत्य दोन त-हेने बदलत असतेः एक, नवनव्या शक्ती प्राप्त झाल्यामुळे जे नव्हते ते साध्य झाल्याने; व दुरारे, पूर्वीच्या सत्याचे नव्याने एक निराळेच दर्शन झाल्याने. अनुभुती जसजशी व्या होते, तसतसे सत्याचेही स्वरूप बदलत जाते. ही गोष्ट काही नवी नाe ब्राह्मी स्थितीत संसाररूपी सत्याचा अविष्कार काही निराळ्याचे स्वरूप होतो, हे आपण सर्वांनी ऐकिलेच आहे. गुरूत्वाकर्षणाच्या सत्याचा न्यू"" झालेला अविष्कार व आइन्ष्टाइनला झालेला अविष्कार ह्यात फ र व आइन्ष्टाइनला झालेला अविष्कार ह्यांत फरक आहे; पण त्यामुळे पूर्वीचा अविष्कार मिथ्या होत नाही. पूर्वी गुन्हेगार म्हटला त्याला शिक्षा करून समाजातून नष्ट करून टाकिले की प्रश्न संपला, वाटे. आता गुन्हेगार ही व्यक्ती व तिची कृती ह्या दोहोंलाही जबाबदार आहे, हे सत्य समाजाला नव्याने दिसून येऊ लागले आहे: हे समाजरचनेचे एक तत्त्व होऊ शकत नाही; पण सत्यशोधनाचा व स्वातंत्र्य हा समाजाचा एक आवश्यक हक्क समजला पाहिजे. स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिला निरनिराळ्या बंधनांत टाकणारे लोक वारंवार उच्चार करितात, समाजहितचिंतकाची वस्त्रे लेतात. अ सत्य काय आहे, हे शोधून काढण्याची धडपड केली पाहिजे, या बदलत्या समाजातील बदलती सत्ये आकलन करण्याची व ती " शक्ती अंगात पाहिजे. भावनेमुळे मनुष्य सत्य शोधण्यास असम भावना प्रेमाची असो वा द्वेषाची असो, ती सत्याच्या शोधाच्या येते; व सूर्यप्रकाशाइतकी लख्ख सत्ये दिसेनाशी होतात. पाच साम्राज्यवादी आहेत म्हणावे, तर कम्युनिस्ट रशिया व चीन ह्याच नाहीत काय? केवळ भूमध्यसमुद्र मध्ये आहे म्हणून अल्प १०८ आहे. 'सत्य' सत्यशोधनाची तळमळ 'ला पाहिजे. व्यक्तीचे कणारे लोक ध्येयांचा तात. अशा वेळी । ती राबविण्याची पास असमर्थ होतो. शोधाच्या आड येतेच त. पाश्चात्य राष्ट्र चीन ह्यांची साम्राज्ये अल्जीअर्स फ्रान्सचे ।। संस्कृती ।। फ्रान्सचे नाही म्हणावयाचे, तर उरालपर्वताच्या पूर्वेकडील मंगोल टोळ्यांचे प्रदेश रशियाचे कसे होतात? फ्रान्स, इंग्लंड व बेल्जियम यांनी आफ्रिकनांवर अत्याचार केले, ते जाहीर होतात; काझाक, काल्मुक वगैरे लोकांवर रशियाने काय जुलूम केले ते बाहेर फारसे फुटू शकत नाहीत. राजसत्ताक, प्रजासत्ताक वा कम्युनिस्ट प्रजासत्ताक - कोणतीही राज्यव्यवस्था असली, तरी ती संपूर्णतया साम्राज्यवादी असू शकते, ही सत्यस्थिती आहे; व साम्राज्य आले म्हणजे समता अशक्य, हेही तितकेच खरे. हे सत्य विचार करण्यासारखे आहे. अधिकार गाजविण्याची सवय झालेल्या लोकांचा अधिकार गेला, किंवा काहींना अधिकार मिळालाच नाही, असे लोक तो मिळविण्यासाठी ध्येयवादाचे कसे पांघरूण घेतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून केरळराज्यातील शिक्षणविषयक विधेयकाकडे बोट दाखविता येईल. हे विधेयक पहिल्याने प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यात व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा येईल, अशी काही कलमे होता; पण लोकमताला मान देऊन ती दूर केली आहेत. आताच्या विधेयकाने 'दशकाचा व शिक्षणाचा दर्जा सुधारेल व त्या धंद्यात शिरलेले दुष्ट प्रघात नाहीतसे होतील, असे वाटते. असे असूनही त्या विधेयकाचे निमित्त पुढे 07 बेकायदा चळवळ करण्याचा विचार काही राजकीय व सांप्रदायिक पुढा-यांनी चालविला. कम्यनिस्ट करितील तेवढे चांगले हे जसे सत्य नव्हे, जस ते करितील तेवढे वाईट, हेही सत्य नव्हे. आजचा समतावाद जो काही असा काही राज्यांत दिसतो. तो संपूर्णतया स्वसंघाइतकाच व्यापक आहे. बध मानवसमाजाला ते तत्त्व निष्ठेने लावण्याचा अजून प्रयत्नच झालेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. वर्तमानपत्रे, रेडियो, पुस्तके ह्यांद्वारे "Yoया ध्येयवादांचे पांघरुण घेणारी राष्टे व व्यक्ती इतक्या जोराचा | करीत आहेत की, सत्यान्वेषण करणे जवळ जवळ अशक्य होऊन ल आहे. ज्या धर्माचा आपण शोध करीत आहो, त्याचे काहीसे आकलन यासाठी सत्यान्वेषणाची तयारी पाहिजे. नुसत्या कृतीला ज्ञानाची 7 नाही; पण ध्येय ठरवून साधनांची निवड करण्यासाठी ज्ञानाची म्हणजे जे आहे ते’ (सत्य) समजून घेण्याचे आहे ते’ (सत्य) समजून घेण्याची आवश्यकता आहे; आणि 'जे त' एका दृष्टीने नित्य पण एका दृष्टीने सदैव बदलते असल्यामुळे आवश्यकता नाही; पण आहे ते'। १०९ || संस्कृती || कुणालातरी जगात कायमचे सत्य सापडले आहे, अशा विश्वासावर न बसता ते अनवरत शोधीत राहिले पाहिजे. आज ज्या त-हेने 'सत्य व अहिंसा' हे। शब्द उच्चारिले जातात त्या दृष्टीने नव्हे; पण कधीही उसंत न घेता सत्यशोधन करणे हे एक ध्येय किंवा अंतिम ध्येयाचा एक भाग होऊ शकेल. | सामाजिक न्याय-अन्यायांवर जुन्या व नव्या वाङ्मयातून, विशेषतः नव्या वाङ्मयातून, पुष्कळ विचार झाला आहे. विस्तृत व खोल अथान 'समता' हा शब्द वापरला, तर त्यात 'न्याय' ह्या कल्पनेचा अंतर्भाव होता. निरनिराळे समाजसुधारक क्रांतिकारक अन्यायाविरुद्धच झगडत असता: अगदी शांतपणे विचार केला, तर असे दिसून येते की, अशा त-हेच्या झगड्यातून नवे अन्याय निर्माण झालेले आहेत. असे का व्हावे, ते सर्व समजत नाही. काही वेळा अन्यायाविरुद्धचा झगडा खरोखरच अन्यायावि होत असतो; पण ब-याच वेळा सत्ता काबीज करण्यासाठी, लोकाय, वेधण्यासाठी अन्यायाचे बुजगावणे पूढे करण्यात येते. काही धार्मिक लावा अशी ठाम श्रद्धा असते की, त्यांच्या धार्मिकपणाचे माप होण्यासाठी त्या सद्वृत्तींना वाव मिळण्यासाठी ईश्वराने जगात गरिबांना व दीनांना जना घातले आहे. तशीच श्रद्धा पुढा-यांची आहेसे वाटते. वर सांगितलेल में लोक निदान कोणीतरी भीक मागायची तरी वाट पाहतात. पण शासन वर्गातील लोक अमके लोक, अमका वर्ग मदत करण्यालायक ९ ठरवितात, त्याला मदत कशा त-हेने करावयाची ते मार्ग फक्त। लोकांना माहीत आहेत, असे समजून मदत करणा-या निरनिराळ्या निर्माण करितात; त्यांवर पाण्यासारखा पैसा खर्च करितात. त्यामुळे अ" दारिद्रयाचे निवारण तर होतच नाही, पण पूर्वी असलेल्या शा जोडीला नवे शासक येऊन बसतात. कोटकल्याण कुणाचे होत अ ह्या मदतीच्या योजनेमध्ये कामावर नेमलेल्या शेकडो लहानमोठ्या का सत्यशोधनाची आवश्यकता असते ती अशा वेळी, लोककल्याणास कायदे करून भागत नाही, त्यांची न्याय्य अंमलबजावणी होत । पहावे लागते. कुळकायदा जितका चांगला आहे. तितकीच त्याची अस वाईट आहे. पूर्वीच्या जमीनमालकांना कायद्याने जे मिळावयास पा ११०

  • सांगितलेले धार्मिक

पण शासनकर्त्या या निरनिराळ्या संघटना *तात. त्यामुळे अन्यायाचे, असलेल्या शासकांच्या गाचे होत असेल, तर या कार्यकत्र्यांचे ककल्याणासाठी नुसते में होते की नाही, हे ची अंमलबजावणी वयास पाहिजे, ते । संस्कृती ।। क्वचितच मिळते. जे जमीनमालक शक्तिमान आहेत ते तो कायदा खुशाल धाब्यावर बसवतात, व कुळांच्या पदरात काहीच पडत नाही. लाच खावयाला एक नवीन कुरण मोकळे झाले. तालुकावार ह्या कायद्याची नीट अंमलबजावणी करणे काही कठीण काम नाही; पण ते करण्यास लागणारा त्रास व विलंब कोणी सोसावा? एक कायदा केला की फुकट मोठेपणा मिळतो, अन्यायाचे परिमार्जन केल्याचे श्रेय मिळते. तीच त-हा आदिवासी यांच्या बाबतीत. त्याना आदिवासी' म्हणून निराळे ठेवण्यात इतक्या लोकांचे हात गुंतलेले आहत की, न्यायाच्या नावाने त्यांच्यावर व इतरांवर काही अन्याय तर होत असल ना, अशी शंकाही कोणाच्या मनात येत नाही. निरनिराळ्या शब्दांना 'नशनराळ्या काळी काही विशेष धार्मिक महत्त्व आलेले असते व त्यामुळेही उळ लोकांवर अन्याय होण्याचा संभव आहे. 'को-ऑपरेटिव्ह शेती' हा एक व शब्द आहे. शेतीचे उत्पन्न खावयाला पुरत नाही, तेव्हा ते वाढवावयाचे, 8 ध्येय. रशिया व चीन ह्या देशांत 'को-ऑपरेटिव्ह शेती' चालू आहे, तेव्हा "हा ती करावी, असे एका पुढा-याच्या मनात आले. सुदैवाने देशात ' सक्ती कायद्याने झाली नाही; पण होण्याचा संभव आहे. कोणाच्या पात काही विचार आला की, तो सबंध समाजावर लादणे हा एक घोर १ आहे. ज्यांच्याविषयी ही नवी सधारणा आहे किंवा ज्यांच्या आयुष्याला यामुळे मुख्यतः निराळे वळण लागणार आहे, त्यांचा विचार घेण्याला काय त असावी? पण अशा त-हेच्या वर्तणुकीच्या बुडाशी एक गृहीत असते. ण सुधारणेचा विचार ज्याच्या मनात आला, तो मनुष्य शहाणा, शकलेला, विचारवंत व लोकहितदक्षक असा असतो; व ज्यांच्यासबधा सुधार " करावयाच्या ते अज्ञ, अशिक्षित, मागासलेले असतात. त्यांना " हित कळत नाही, तर देशाचे किंवा समाजाचे काय कळणार? • मग ते राजपुरुष असोत किंवा इतर कोठल्याही वर्गाचे असोत, ला सर्वज्ञ समजतात व सत्तेच्या जोरावर आपले विचार इतरावर त असतात. ह्याच संदर्भात 'स्वातंत्र्य' ह्या तत्त्वाचा विचार करावा ते म्ह शिकलेला, विचारवंत शासक, मग ते राजपुर लागेल. । संस्कृती ।।। १११ जिच्याबद्दल नेहमी विचार येतो, ती गोष्ट म्हणजे एक पिढी अन्याय करून जाते, दुसरीला त्या अन्यायाची फळे भोगावी लागतात. अन्यायाचे परिमार्जन करताना नवे अन्याय होण्याशिवाय गत्यंतर नाही का, असे | मनात येते. तसे झाले, तर अन्यायांची साखळी कितीही क्रांत्या झाल्या, तरी तुटणे शक्य नाही. त्याचप्रमाणे किती मागच्या अन्यायांचे उट्टे फेडिता येते, किती पिढ्यांच्या मागच्या अन्यायांचे परिमार्जन करिता येते, हेही ठरविण कठीण आहे. कित्येक हजार वर्षे मानवसंघ पृथ्वीवरून इकडून तिकडे भटकत आहेत, एकमेकांशी युद्धे करीत आहेत. एक दुस-याला जिंकतो व अंकित करतो; एक दुस-याची जमीन हिरावून घेतो, दुस-यावर जुलून करितो; जित-जेते एकत्र मिसळतात, एकजीव होतात; नवीन संघ ज म्हणून येतात; प्रत्येक नव्या आक्रमणाची किंवा संक्रमणाची आठवण या-ना त्या रूपाने राहते. अशा परिस्थितीत किती जुन्या गोष्टींची आठवण ०" न्याय मागावयाचा? जुन्या ऐतिहासिक घटनेमुळे जर आजच्या सभा अन्यायकारक गोष्टी टिकून राहिल्या असतील, तर न्याय मागण आहे, व हा न्याय मागताना जुन्या ऐतिहासिक घटना विसरता आल्या, उत्तमच. आपल्याकडील जातिसंस्था व त्यातल्या त्यात अस्पृश्य" दोन्ही संस्था अन्यायकारक आहेत. त्या नाहीतशा झाल्या पाहिज तसे होताना जुन्या ऐतिहासिक घटना - की ज्यांचे मूळही हल्ला माहीत नाही, -उकरून काढणे योग्य नाही. आजकाल विश्वनाथमा चाललेला जो सत्याग्रह आहे, त्याबद्दल दोन शब्द लिहिणे वाव" नाही. काशी येथील जुने विश्वनाथमंदिर उध्वस्त करून और मशीद बांधिली. पुढे अहिल्यादेवी होळकर यांनी नवे विश्वनाथ मंदिर व गेली जवळजवळ १००-१५० वर्षे हिंदू भाविक त्या नव्या मंदिरा दर्शनासाठी जातात. औरंगजेबाने हिंदू मंदिर भ्रष्ट करुन तेथे मशि ह्या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे व मुसलमानांची मशीन जागा हिंदूच्या ताब्यात आली पाहिजे, ह्या बुद्धीने आज काही ! सत्याग्रह करीत आहेत. औरंगजेब मरून इंग्रजी राज्य स्थान ११२ न्याय मागणे योग्य त्यात अस्पृश्यता ह्या या पाहिजेत. पण भूळही हल्ली नीट ल विश्वनाथमंदिराबद्दल लहिणे वावगे होणार न औरंगजेबाने तेथे नाथ मंदिर बांधिले, प्या मंदिरात लाखोंनी तेथे मशिद बांधली 7ची मशीद बनलेली आज काही हिंदू मंडळी न्य स्थापन होण्याआधी ।। संस्कृती ।। शिदे-होळकर व पेशवे सामर्थ्यवान होते. त्यांना भ्रष्ट मंदिर मुसलमानांच्या हातून हिसकावून घेऊन परत मूर्ती स्थापन करणे सर्वस्वी शक्य होते. त्यांनी | तसे केले नाही. पण त्यांनी कमकुवतपणा केला म्हणून, जी पिढी जागृत झाली, तिने अन्यायाचे परिमार्जन करून घेण्याचा प्रयत्न करू नये का, असा सवाल वरील सत्याग्रही करितात. ज्या वेळी मंदिर उध्वस्त झाले, तेव्हा | आणि नंतर शंभर वर्षे भारतात निरनिराळी राज्ये होती. एका राजाने दुस-याचा मुलूख व वित्त घेण्याची शक्यता होती व प्रथाही होती. आता सर्व जमाती एका राज्यात आल्यावर ज्या हक्कावर हिंदूंनी १५० वर्षे पाणी | ताडले, तो दमदाटी करुन मिळणे शक्य नाही. हिंदू राज्यकर्त्यांनी मंदिर | परत घेतले नाही, ह्याची कारणे हिंदू धर्मात खोलवर रुजलेली, आजही | १७मूल झालेली अशी आहेत. हिंदू धर्मात विटाळाचे बंड फार मोठ्या |अनाणावर होते. हिंदू माणसे, चीजवस्तु, घरेदारे ह्यांना फार चटकन विटाळ होत असे. ती भ्रष्ट होत, बाटत, ती ताबडतोब हिंदुत्वाला मुकत. 'विटाळ' ५ जुन्या बायका ज्या त-हेने वापरीत, त्यावरून ती कल्पना नसून एखादी °/तात धरता येईल अशी वस्तू आहे, असे वाटावे. 'विटाळ घरभर कालविणे | शब्दप्रयोग पूर्वी फार प्रचारात असे; आजही कधीमधी ऐकू येतो. जे "Clsoल, ते ब-याचदा कायमचे विटाळायचे. तसेच हिंदू मंदिरांच्या बाबतीत . राज्यसत्ता व सामर्थ्य असूनही एकदा बाटलेले मंदिर परत पवित्र होणे " नव्हते. ह्या विचित्र धर्मात देवसुद्धा कायम बाटावयाचे. अशामुळे मंदिर 7 घणे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. नवे मंदिर झाले, श्रद्धेची गरज नागली. आजही मंदिर मिळाले. तरी सर्व हिंदू तेथेच जातील, असे शक्य | "S: स्वामी करपात्रीजी सध्याच्या विश्वनाथ मंदिरात हरिजन हिदेना 46 येऊ देत नाहीत. तेव्हा सर्वसाधारण हिंद मशिद बनलेल्या मंदिरात शातील, असे दिसत नाही. विठोबाला अस्पृश्यांमुळे विटाळ झाला, असे " पठ्ठलाचे दर्शन न घेणारी कित्येक घरे आज पंढरपुरात आहेत. हे सर्व हेले, म्हणजे हा सत्याग्रह योग्य वाटत नाही. दोन जमातीत नवी कुरबूर उत्पन्न करण्याशिवाय काही फलनिष्पत्ती होईल असे वाटत नाही. हिंदूंच्या ११३ | ।। संस्कृती ।। अन्यायमूलक कल्पना दूर करण्याचा प्रयत्न करून, जुन्या वेडगळ कल्पना काढून त्याला सार्वलौकीक धर्माचे स्वरूप देण्यानेच विश्वनाथमंदिराच्या अन्यायाचे परिमार्जन होईल; जुन्या जखमांच्या खपल्या काढून त्या वाहत ठेवण्याने नव्हे. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विष्णूची नसून जैनांच्या नग्न तीर्थंकरांपैकी एकाची आहे असा पुरावा मिळाला, वारक-याचे परम दैवत व परम मंदिर जैनांच्या ताब्यात देणे योग्य ठरेल का? आपण न्याय मागताना तो इतरांनाही देण्याची तयारी ठेवावयास हवी. लोकांकडून आपण काही अपेक्षा ठेविल्या, तर लोकांनी आपल्याकडून तसल्या अपेक्षा कराव्या, हा मूलभूत न्याय आहे. म्हणजे न्यायाची मीमांसा करताना आपण एक मूलभूत तत्त्वाशी येऊन ठेपलो. हेच तत्त्व समता, बंधुता व स्वातंत्र्य ह्या बुडाशी आहे. | सांघिक आयुष्यात पहिल्याने कसला संकोच होत असेल, तर तो स्वातंत्र्यान सांघिक जीवन जेवढे गुंतागुंतीचे, एकमेकांवर अवलंबून असलेले, तव स्वातंत्र्याचा संकोच जास्त. वाटा नसलेल्या निर्जन डोंगरावर किंवा जग मन मानेल तसे हिंडता येईल; पण शहरात आखलेल्या रस्त्यानेच लागेल. खाणे, निजणे, लग्न करणे, कोणाशी करणे वगैरे सर्वच बाब जीवन आखले जाते. सर्व बाजूंनी जीवनाला मर्यादा पडतात. ह्या न सर्वांना सारख्या प्रमाणात पडाव्या, शक्य तितक्या कमी पडाव्या समाजरचना करण्याची जी धडपड, ती समतेसाठी धडपड. जाव' जबाबदा-या व कष्ट आणि जीवनातील उपभोग्य गोष्टी सवाना। तंतोतंत सारख्या प्रमाणात वाटल्या जाव्या, अशा त-हेची समाज अगदी लहानलहान व अगदी दरिद्री समाजात ब-याच अंशाने दि" बायका, मुले, पुरुष ह्यांनी अविरत कष्ट केले की, जेमतेम पोटाला । असे ज्यांचे जीवन, तेथे समता दृष्टीस पडते. ती समता कष्टाची, दी। व उपासाची असते. संपत्तिमान समाजात विषमता दिसते. त नाहीशी होणे शक्य नाही; कारण अशा समाजात कष्ट व उपम पुष्कळ प्रकार असतात व सर्व त-हांच्या कष्टांना जसे माप लावण ११४ बितीत पड. जीवनातल्या |ष्टिी सर्वांना अगदी 7 समाजव्यवस्था अशाने दिसून येते. मि पोटाला मिळेल कष्टाची, दारिद्र्याची दिसते. ती सर्वस्वी व उपभोग ह्यांचे प लावणे कठीण, । संस्कृती ।। तसे उपभोगांनाही माप लावणे कठीण. त्याचप्रमाणे जबाबदा-याही निरनिराळ्या त-हांच्या असतात, मानसन्मानही निरनिराळ्या त-हांचे असतात. सर्वस्वी शरीरकष्टांवर जगणा-या लहान समाजात शासनसंस्था जवळजवळ नसतात, व ज्या असतात त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असतात. खूपशा लोकांचे पित्त व जीवित ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग ज्या त-हेने मोठमोठ्या समाजात आढळतात, तसे लहानलहान समाजांत दिसून येत नाहीत. त्यामुळेच समता म्हणजे काय व ती कशी प्रस्थापित करावी, हे ठरविणे अवघड जाते. समता प्रस्थापित करण्याची धडपड जेथे-जेथे चालते, तेथेतेथे विशेषतः तीन चार गोष्टींवर भर दिला जातो. लोकराज्यात दर काही ना सार्वत्रिक निवडणुका घेतात व आपले शासनकर्ते कोण असावेत, हे * ठरवितात. २१ वर्षांवरील प्रत्येक इसमाला एक मत असले, म्हणजे श्रीमंत गरिबांत समता झाली. पण गरीब हे अशिक्षित व दरिद्री असतील, " त्यांची मते पूर्वाधिकाराच्या किंवा पैशाच्या जोरावर मिळविता येतातं. मान वरील समता खरीखुरी होण्यास शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे व वा वाटणी विषम होता कामा नये. शिक्षण ब-याच वरच्या पायरीपर्यंत । मोफत व सक्तीचे करण्याने एक प्रश्न सुटायला मदत होते. ह्याच • सार्वत्रिक परीक्षा घेऊन त्यांत वर येणा-यांना विद्यापीठात शिक्षण स मदत करणे हा दुसरा उपाय आहे. हा उपाय इंग्लडमध्ये फारच " उरला आहे. ५० वर्षापर्वी ऑक्सफर्ड व केंब्रिज ह्या युनिव्हर्सिट्या "हणजे श्रीमंत जमीनदारांची राखीव मिरास होती. आता सरकारी परीक्षा व री शिष्यवृत्या ह्यामळे ह्या विद्यापीठातील शेकडा ७५ विद्यार्थी मध्यम ।' चा वर्गातून येऊ लागले आहेत. शिक्षण सार्वत्रिक करताना ते मुली या दोघांनाही मिळेल, अशी दक्षता घेतली पाहिजे. लोकशाही गर्न समता प्रस्थापित करावयाची असल्यास अधा। | नाही. मजुरवर्गाच्या मार्गदर्शनाने पगाराचे मान असे वाढले आहे "पगारात माणूस सुखाने राहू शकतो व कमाल पगार किमानाच्या करा पटींपेक्षा जास्त असत नाही. उत्पन्नावरील कर व मृताच्या ११५ सार्वत्रिक सरकारी व मुलगे ह्या दोघांनाही मि थापित करावयाची असल्यास अर्धा समाज निरक्षर ठेवून चालणार नाही. मजूरव की, किमान पगारात माणूस ।। संस्कृती || संपत्तीवरील कर ह्यांमुळेही संपत्तीच्या समान वाटणीला मदत होते. फुकट किंवा कमी पैशांत वैद्यकीय मदत, मजूर व इतर लोकांना काम देणा-या संस्थांकडून कमी भाड्याची घरे बांधून घेणे वगैरे गोष्टींमुळे समानता प्रस्थापित झाली नाही, तरी व्यक्ती-स्वातंत्र्य राखण्यास खास मदत होत. ह्याशिवाय आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामायिक सार्वजनिक संपत्तीची निर्मिती करणे. करांच्या रूपाने व्यक्तीने मिळविलेला बराचसा पैसा सरकार, नगरपालिका वगैरेंकडे आला, म्हणजे त्यांतील बराचसा सार्वजनिक सुखसोयींसाठी खर्च करण्यानेही समता निर्माण होण्यास म होते. प्रत्येकाला, विशेषतः शहरातील चाळीवजा मोठमोठ्या घरा' राहणा-यांना बाग करिता येणे शक्य नसते; पण शहरात शक्य तित ठिकाणी लहानमोठ्या सार्वजनिक बागा करणे शक्य असते. लंडन शह" मोठमोठ्या बागा तर आहेतच. पण पाचसहा मोठी झाडे, हिरवळीचा त गालिचा व झाडाखाली बसण्यासाठी सहासात बाके अशा चिमुकल्या काही फर्लागाफर्लागांवर आहेत. सर्वांना खुली असलेली खेळाचा न पोहण्याचे तलाव वगैरेही बांधण्यात येतात. सांस्कृतिक दृष्ट्या अतिमहत्व गोष्टी म्हणजे सार्वजनिक वाचनालये, कला, शास्त्र, इतिहास १ प्रदर्शने सार्वजनिक नाट्यमंदिरे वगैरे होत. पॅरिसमधील म्युझे द लाम, व इतर ठिकाणची प्रदर्शने ह्यांकडे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून बोट दा येईल. बर्लिनमधील प्राणिसंग्रहालयात विद्यापीठाची बरीचशी या होत. सबंध जर्मनीभर लहानलहान गावी नगरपालिकेने बांधिलेली ना आहेत नाममात्र भाड्याने ती मिळत असल्यामुळे नाटके स्वस्तात " परवडते. काही मोठ्या शहरांतून बर्लिनसारख्या नगरपालिकेने देऊन नट ठेविलेले असतात व त्यांनी बसविलेल्या नाटकांचा दजा समजला जातो. कला, सौंदर्य ह्यांचा उपभोग घेणे, ज्ञान मिळविण चांगली ठेवणे हे सर्वांना साध्य करणे हे ही समतेचेच निदर्शक आहे: संपन्नतेत असावी, दारिद्र्यात नसावी. दारिद्र्य हा व्यक्तीचा किया गुण नाही. ते एक व्यंग आहे व ते नाहीसे झाले पाहिजे. ११६ ली खेळांची मैदाने, वगैरेंची हर चिशी व्याख्याने धलेली नाट्यमंदिरे यस्तात दाखविणे रपालिकेने तर पगार नाटकांचा दर्जा चांगला ज्ञान मिळविणे, प्रकृती नदर्शक आहे. समता वा समाजाचाही ।। संस्कृती ।। | पण संपत्तीच्या विषम वाटणीपेक्षा बोचक गोष्ट म्हणजे अधिकाराची व मानाची वाटणी. अगदी लहान अधिकारापासून ते मोठ्या अधिकारापर्यंतच्या सर्व जागी अधिकार एकसारखाच फिरत राहिला, तर समाजाचे स्थैर्य बिघडते. तो कायम किंवा ब-याच काळापर्यंत एकाच व्यक्तीच्या किंवा गटाच्या हातात राहिला, तर समाज कुजल्यासारखा होतो व असंतोषाची बाज धुमसत राहून त्याचा भडका होण्याचा संभव असतो. कुटुंबात बाप किवा आई आपल्या अधिकाराचा त्याग करण्यास तयार होत नाही. संस्थांतूनही सर्वत्र हीच स्थिती आढळते. कोणी पैसे दिले, म्हणून अधिकार गाजवू पाहतात. कोणी गट करून वर्षानुवर्षे एका लहानशा वर्तुळातच सर्व अधिकार द्रित करतात. कोणाला अधिकाराची जागा मिळाली की, ती काही वर्षे अनुभवून दुस-या कोणास संधी द्यावी, असा कधी विचारच कोणी मनात जात नाही. दुसरे काही नाही, तर एखादी सही किंवा एखादे मत पढातरी हक्क रहावा, म्हणून सतत धडपड चालते. अधिकार संक्रमण अतिपणे व्हावे म्हणून नियमित कालांतराने निवडणुका, विशिष्ट वयानंतर निवृत्ती वगैरे अनेक युक्त्या निरनिराळ्या समाजांत योजिलेल्या दिसतात. समता निर्माण करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत, त्या सर्वच "या आहेत. पण सामायिक संपत्तीची निर्मिती जोपासना व संवर्धन ह्या " त्यात कठीण आहेत. सपाट, खाचखळगे नसलेले रस्ते सर्वांना असतात; पण त्यावर विटीदांडू खेळावयाला, गली करावयाला किंवा प्या मांडवांच्या खांबांसाठी खड़े करावयाला किंवा होळी पेटवावयाला " काही वाटत नाही. नगरपालिका रस्त्यावर झाडे लावते, त्यांना " चालत; पण लोकांच्या उघड लुटीपुढे ती टिकणे शक्य वाटत नाही. ती झाडे फुलांची असली, तर फुलांसाठी संबंध नाची असली, तर फुलांसाठी सबंध झाड ओरबाडून काढणे, पाला काढणे, दस-याला सोने लुटण्यासाठी कोवळ्या झाडांच्या 1 मोडून हिसकून काढणे, एखादे झाड औषधी म्हणून त्याची । काढणे व कोणी पाहत नाही असे साधुन झाडच तोडून नेणे हे प्रकार व मुता-या सरोस चालतात. धर्मशाळांतून घाण करणे, सार्वजनिक ११७ फांद्या हातांनी । संस्कृती ।। शक्य तितक्या वाईट रितीने वापरणे, वाचनालयांतील पुस्तकांची पाने फाडणे व शक्यतर पुस्तकेच लांबविणे, बसेस व आगगाड्या ह्यांतील सामानाची शक्य तितकी नासधूस करणे, शाळा, कॉलेज व वसतिगृहे यांतील बाके मोडणे, देवळाच्या आवारात गायी, शेळ्या, गाढवे, कुत्री मोकाट सोडून त्याचा उकिरडा बनविणे, ह्या गोष्टी पाहिल्या म्हणजे सार्वजनिक संपत्ती निर्माण झाली, तरी तिचा उपभोग घ्यावयाला लागणारी संस्कृती आपल्यात आधी निर्माण केली पाहिजे, हे ध्यानात येते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानार्जन नसून संस्कृतीची जोपासना, उपभोगाची पात्रता आणण्याची अभिरुची व सामाजिक मूल्यांचे परिशीलन ह्या गोष्टी शिकविण्याची संधी आहे, हे लक्षात येईल. संस्कृतिसंपन्न जीवनात व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. सामायिक संपत्ती निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. बंधुता म्हणजे दुस-याबद्दल सौजन्य, करुणा व आत्मीयतेची भावना. ती असल्याशिवाय खरी समेत प्रस्थापित होणेच शक्य नाही. ह्या सौजन्याचा आविष्कार रोजच्या जीवना झाला पाहिजे; फक्त संकटकाळी किंवा विपत्काळी नाही. देवाणघेवाण, यांनी मला केलेले जे आवडणार नाही ते मी दुस-याला करणार नाc" स्वतःवर अन्याय सहन करणार नाही, दुस-यांवर होऊ देणार नाही, अ" भावना असल्याशिवाय समता नांदणार नाही. ज्या समाजात नागराज आहे, यंत्रांच्या द्वारे उत्पादन होते, सार्वजनिक मालमत्ता निर्माण होत, अ" समाजात समता टिकवावयाची, तर वरील तत्त्वाला पोषक अशा आचार" कसोशीने पालन करावे लागते. नुसती समाजकल्याणकारी तत्त्व " असून चालत नाही. त्याबरहुकूम आचार बहसंख्य लोकांनी ठेविला " धर्म हे 'मनोपुब्बंगम' असले, तरी आचारप्रधान आहेत, हे विसरून जा नाही. हे विसरून चालणार | समानता हे तत्त्व जरी एक महत्त्वाचे मूलगामी तत्त्व मानिल, सार्वकालिक होईलच, असे सांगता येत नाही, अशा काही विपत्ती समाज त्व मानिले, तरी ते ही विपत्ती समाजावर ११८ ।। संस्कृती ।। येण्याची शक्यता आहे की, थोडा वेळ समानता बाजूला सारून सत्ता केंद्रित करावी लागेल. पण असे प्रसंग जितके थोडे येतील तितके चांगले; कारण सत्तेचा लोभ हा संपत्तीच्या लोभापेक्षा समानतेचा मारेकरी ठरतो. क्रांतीच्या मार्गे समानता प्रस्थापित करण्याविरुद्ध हाच मोठा आक्षेप आहे. क्रांतीच्या काळात लहान महत्वाकांक्षी गटाच्या हातात सत्ता केंद्रित होते व विषमतेचे नवे पाश समाजाभोवती घट्ट बसतात. | सध्या कोठच्याही मानवसमाजांत वरील तीन तत्त्वे पूर्णतया किंवा ब-याच प्रमाणात दिसून येत नाहीत. सर्व मानवसमाजात ही तत्त्वे कधीकाळी अस्थापित होतील, की त्याआधीच मानवसंस्कृती व समाज ही दोन्ही नष्ट ताल, हेही आज सांगता येत नाही. पण ही तीन तत्त्वे त्यांतल्या त्यांत ल्याणकारी धर्माची तत्त्वे म्हणून समजायला हरकत नाही. ह्या धर्माचे आचारकांड मधूनमधून दिग्दर्शित झाले आहे. त्यापेक्षा जास्त तपशिलात शिरणे म्हणजे धर्मतत्त्वाचे व्यापकत्व घालविणे होईल. आपल्या तत्त्वज्ञानाच्या भाषेत त्याचा उच्चार करावयाचा म्हणजे 'अहं " स तत्व व्यक्ती हे साधन नाही, असे सांगते; 'तत् त्वम्' म्हणजे 'मी " { हे सांगते. 'सर्व खलु इदं ब्रह्म' ह्यात दोन गोष्टी अनस्यूत आहेतः मानतेच्या लायकीचे आहेत ही एक गोष्ट, व समाजात जे-जे काही |" आहे त्याची संपूर्ण जबाबदारी समाजावर म्हणजेच सर्व व्यक्तीवर हा दुसरी गोष्ट. खिस्ती व मुसलमानी धर्मात सर्व सृष्टी देवाची व ""या अशी द्विधा विभागली आहे, व सैतानाच्या सृष्टीचा मुक्तीचा मार्ग तला आहे. समता, बंधुभाव व स्वातंत्र्य ह्यांचे पोषण सर्वग्राही ब्रह्मतत्त्वावरच " पाहिजे. इतके व्यापक आत्मौपम्य असेल, तरच समानतेच्या परम धर्माचे ग्रहण होईल, एरव्ही नाही. ११९ | || संस्कृती ।।