पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परगण्याची साराबंदी स्वत: स्वराज्याच्या पेशव्यांनी केली, असा ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आढळतो. स्वराज्यातील साऱ्याचे दर मोघल साऱ्यापेक्षा कमी होते. मोघल १/२ सारा वसूल करीत असत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोघलांचा वाटा अर्धा होता. १/२ सारा वसूल करणे हा दरबारी नियम. प्रत्यक्षात वसुली वतनदारांमार्फत म्हणजे अर्थातच बेहिशेबी होत असे. शिवाजीराजाचे हे प्रमाण उत्पन्नाचे पाच हिस्से करून दोन सरकारकडे आणि तीन शेतकऱ्याकडे असे ठरविले. वतनदारांकडून हे काम सरकारी अधिकाऱ्यांकडे आले आणि राजा अतिशय काटेकोर लक्ष घालत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी गोळा केलेला हा वसूल सरळ स्वराज्याच्या खजिन्यात जाऊ लागला. कोकणात नारळ, सुपारी हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन. या वस्तूंचे भाव सरकारातून ठरविले जात. आणि या वस्तू व्यापाऱ्यांना विकताना सरकारी अधिकाऱ्याला उपस्थित राहणे हे त्याच्यावर बंधनकारक होते. गावाची रचना करतानासुद्धा अत्यंत आदर्श पद्धती ठेवली. वसवलेल्या गावात बाजारपेठेचा कारभार त्या गावापेक्षा पूर्णत: वेगळा केला. पेठाची वस्ती वेगळी केली. गावाचे दोन भाग केले. मुजेरी म्हणजे शेतकऱ्यांची वसाहत व मोहोवाकि म्हणजे बारा बलुतेदारांची वस्ती.

 स्वराज्याची स्थापना करताना शिवाजीराजाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीची ठळक उदाहरणे फक्त वर नमूद केलेली आहेत. सबंध चरित्रातील अशी अनेक घटनास्थळे दाखविता येतील की ज्या धोरणांचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंध आहे. त्यात धर्माचीबाबसुद्धा ही दुय्यम मानली. शिवाजी राजा आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आदिलशहा, कुतूबशहा आणि मोघलांकडून फौजेच्या बळावर चवथाई वसूल करी. सुरत, नंदूरबार, धरणगाव, चोपडा, मलकापूर, कारंजे इत्यादी गावांत राजांनी चवथाई वसूल केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. आपल्या मुलखाचे व रयतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला फौज बाळगावी लागते तिच्या खर्चासाठी ही वसुली करणे भाग आहे असे रास्त समर्थन राजाने या संदर्भात केले आहे.

 आर्थिक, सामाजिक, राजकिय अशा सर्व जाचातून महाराष्ट्रातील शेतकरी मुक्त होत असतानाच मोगल राजधानीच्या परिसरातील शेतकरीही या सर्व जाचांनी पिळून निघत होता. ज्यावेळेला स्वराज्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात होती आणि शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करण्याचे काम सुरू होते, बरोबर त्याचवेळेला उत्तरेतील जाट शेतकऱ्यांनी दिल्ली तक्ताविरुद्ध बंडाचा उठाव केला होता. रयतेतील शेतकऱ्यांमधील हा धगधगणारा असंतोष संघटित होऊ लागला. अंसतोषाचा पहिला

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ७६