पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भडका पेटला तो मथुरेला. तेथील जमीनदार गोकला यांच्या नेतृत्वाखाली जाट शेतकऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला. मथुरेच्या आसपासची सर्व खेडी एकत्र झाली. हा शेतकऱ्यांच्या अंसतोषाचा वणवा विझविण्यासाठी अब्दुल नबी हा औरंगजेबाचा सरदार चालून गेला. त्या ठिकाणी झालेल्या झुंजीत दि.१० मे १६६९ रोजी चिडलेल्या लोकांनी अब्दुल नबीला नेमके टिपले. गोकलाच्या विजयी सैन्याने सदाबाद हा औरंगजेबाजा परगणा लुटून फस्त केला. पहिल्याच संघर्षात यश मिळाल्यामुळे मथुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या वणव्याची झळ आग्ऱ्यापर्यंत पोहोचली. मोघलांच्या राजधानीभोवतालच्या प्रदेशातील शेकडो खेड्यातील हजारो जाट व अन्य शेतकरी यांनी औरंगजेबाची शाही सत्ता उधळून लावली. अव्यवस्था, धुमाकूळ आणि कत्तली बेसुमार झाल्या.

 जाटांपाठोपाठच सतनामी लोकांनीही औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध उठाव केला. दिल्लीच्या ईशान्येस ७५ मैलांवरील नरनौळ जिल्ह्यात सतनामांचा जबर जोर होता. हा भाग तर त्यांचा बालेकिल्लाच झाला. चारित्र्यसंपन्न प्रामाणिक बंधुत्ववादी सतनामी फकिरासारखी वेशभूषा करून अगदी किरकोळ भांडवलावर शेती आणि व्यापार करीत, गैरमार्गाने धनसंपत्ती गोळा करणे यास ते पाप समजत. जाटांबरोबरच सतनामी औरंगजेबाच्या लुटारू सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. संतनाम्यांचे नेतृत्व एका वृद्ध महंतणीकडे होते. पाहता पाहता ही चळवळ प्रचंड फोफावली. औरंगजेबाचे धाबे दणाणले . बादशाही सैन्याची लांडगेतोड होऊ लागली. या चळवळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या छोट्या-छोट्या पथकांची अन्यायाविरुद्ध कंबर कसून उभा राहिलेल्या शेतकऱ्यांनी लूट आणि दारुण परावभ केला. औरंगजेबाच्या अमर्यादित सत्तेवर धार्मिक छळाचा डाग पण होता. साहजिकच सतनाम्यांमध्ये महंतिणीच्या मंत्रसामर्थ्यामुळे आपण औरंगजेबाच्या शाही फौजेचा पराभव करू शकू ही भावना निर्माण झाली. नारनौळच्या लढाईत पराभव होऊन संपूर्ण शहर चवळवकर्त्यांच्या ताब्यात आले.

 लूट, अत्याचार, बेबंदशाही, जुलूम याविरुद्ध उभा राहिलेला हा संघर्ष महाराष्ट्रातातील छत्रपती शिवाजीराजाच्या स्वराज्याप्रमाणे मूर्तरूप घेऊशकला नाही. याची तत्कालीन कारणे अनेक असतीलही. तरी पण अशा उठावापूर्वी कींवा संघर्षापूर्वी रयतेमध्ये राजकर्त्याबद्दल जो विश्वास निर्माण व्हायला हवा होता तो या उठावकर्त्यांना करता आला नाही, हे निश्चित. नेमकि हीच गोष्ट शिवाजीराजाने स्वराज्याची निर्मिती करीत असताना बरोबर हेरली आणि सुरुवातीपासूनच धर्माचा, जातीचा क्षुद्र विचार न करता जो जो स्वराज्यासाठी उभा राहणार आहे त्यास बरोबर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ७७