पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६६५ रोजी वज्जगड पडला. मोगलांच्या तोफा आता वज्जगडावरून पुरंदरवर आग ओकू लागल्या. ही घनघोर लढाई ३० मे पर्यंत म्हणजे तब्बल ४९ दिवस सुरू होती. पुरंदरच्या बुरुजाच्या उंचीएवढे दमदमे उभे करण्याचे काम सुरू होते. हे काम अगदी सफेद बुरुजाच्या समोर सुरू होते. अर्थातच हा दमदमा उभा न करू देण्याची कोशीस पुरंदरावरील सैन्य करीत होते. प्रथम ३० मे १६६५ रोजी एक घनघोर लढाई झाली. मराठ्यांच्या माऱ्यामुळे मोगलांचे अतोनात नुकसान झाले. मिर्झाराजाच्या भूपतसिंह नावाच्या सरदाराबरोबरच असंख्य सैनिक ठार झाले. दिलेरखानाच्या हाताखालील एक सरदारही कामी आला. परंतु पुरंदरावरील सैन्याचे दुर्दैव आडवे आले आणि सफेद बुरुजावरील दारूचा स्फोट होऊन अपघात झाला आणि सफेद बुरुज पडला (२ जून १६६५).

 शिवाजीराजाची नस कोणी ओळखली असेल तर फक्त मिर्झाराजा जयसिंगानेच. अफझलखान, शाइस्तेखान, दक्षिणेचा सुभेदार असताना औरंगजेब, विजापूरचा आदिलशहा, रणतुल्लाखान असे किती किती शत्रू राजाने अंगावर घेतले. अद्भुत विजय मिळवले, पराभव पचवले. परंतु यांच्यातील एकालाही जो शिवाजी समजला नाही तो मिर्झाराजा जयसिंगांला कळला. जयसिंग अतिशय हुशार, शूर आणि मुत्सद्दी सेनापती होता. ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदरला वेढा घातल्यानंतर तब्बल ७० दिवसांनंतरही पुरंदरच्या तटाच्या वाळूचा कणसुद्धा बाहेर पडू शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी राजगडावर बसलेल्या राजाला पुरंदरावर हातघाईची लढाई सुरू असताना विशेष चिंता वाटत नाही याची जाणीवही जयसिंगाला झाली. त्याच्या लक्षात आले की राजाचा जीव किल्ल्याच्या बुरुजामध्ये किंवा राजगडच्या राजधानीत अडकलेला नाही. गड, किल्ले जिंकून राजा शरण येणार नाही, त्याचे प्राण आहेत ते रयतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये. जोपर्यंत ही रयत त्यांच्या राजाच्या बाजूने आहे तोपर्यंत किल्ले बुरुजावर मराठ्यांच्या सैन्याचा पराभव करता येऊ शकेल, पण स्वराज्याचा बीमोड करता येऊ शकणार नाही, याबद्दल जयसिंगाची खातरी पटली. त्याने एका नव्या रणनीतीचा अवलंब सुरू केला.

 मोगलांच्या फौजांना जुन्नर व तळकोकणात धुमाकूळ घालण्याचे आदेश देण्यात आले. २७ एप्रिल रोजी दाऊदखान रोहिडे किल्ल्याजवळ पोहोचला. मोगली धुमाकुळाला चहूबाजूंनी ऊत आला. रोहिडे ते राजगड या परिसरातील किमान ५० खेडी मोगलांनी जाळून उद्ध्वस्त करून टाकली. उभ्या पिकाची नासाडी केली. चाऱ्याच्या गंजी पेटविल्या. या भागातील शेतकरी डोंगरातील दऱ्याखोऱ्याच्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ६७