पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधाराने चार खेड्यात गोळा झाले. मोगलांच्या एका तुकडीबरोबर त्यांच्या संघर्ष झाला. जबर झुंज झाली. मोगलांच्या मदतीला दाऊदखानाची कुमक आली. राजे रायसिंह, अचलसिंह कछवाह यांच्या फौजा मोगलांच्या मदतीला आल्या. चार खेड्यांत गोळा झालेले शेतकरी, मराठे जीव वाचवून डोंगरात पळून गेले. मोगलांनी तेथील चारही खेडी जाळून खाक केली. गरीब प्रजा, गुरेढोरे, मालमत्ता मोगलांच्या हाती लागली. अनेक माणसे कैद झाली. २८ एप्रिलला मोगली सैन्याने याच भागात ठाण मांडले. ३० एप्रिलला राजगडच्या रोखाने हे सैन्य निघाले, पायथ्याशी पोहोचले. राजगडावरील तुफानी माऱ्यासमोर दाऊदखानाच्या प्रचंड फौजेचा टिकाव लागला नाही. दाऊदखान माघारी वळला. गुंजणखोऱ्यामार्गे तो शिवापूरला आला व तेथून कोंढाण्याच्या दिशेने नासधूस करीत जाऊ लागला. (२ मे १६६५). मिर्झाराजेला हे वृत्त कळताच त्याने दाऊदखान व कुतुबुद्दीन यांना लोहगडाकडे जाण्यास आज्ञा केली. मोगली पथक लोहगडच्या परिसरात घुसले. अकस्मात मराठे त्यांच्यावर तुटून पडले. या धुमश्चक्रीत मराठ्यांची मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. मोगलांच्या फौजांनी लोहगडच्या पायथ्याची सर्व लागवड जाळून टाकली. गरीब प्रजा, गुरेढोरे कैद झाली. दुसऱ्या दिवशी लोहगड, विजापूर, तिकोणा, तुंग या किल्ल्यांच्या डोंगरालगतची खेडी जाळून नष्ट करण्यात आली. या सर्व लढाईचा परिणाम म्हणजे कुतुबुद्दीनखानाच्या हातात ३०० स्त्री-पुरुष व ३००० गुरे-ढोरे सापडली. या सर्व लढाईत जागोजागी मराठे आणि मोगल यांचा संघर्ष होत होता. स्वराज्याचे सैन्य डोंगर किल्ल्यावर सुरक्षित होते, पण प्रजानन मोगलांकडून कैद होत होते. त्यांचा अनन्वित छळ सुरू होता. कैद केलेल्यांना नगर -परांड्यांच्या किल्ल्यात ठेवले जाऊ लागले. राजाची रयतेकडूनची ही अशी नाकेबंदी मिर्झाराजे जयसिंगाने अतिशय कौशल्यपूर्ण रणनीती व दबावतंत्राचा वापर करून केली होती.

 या सर्वांना परिणाम म्हणून स्वराज्याची खरोखरी कोंडी झाली.

 मिर्झाराजेच्या या रणनीतीमुळे निराश्रित झालेल्या रयतेच्या, त्यांच्या अनन्वित छळाच्या, मोगल फौजांकडून झालेल्या अत्याचाराच्या लुटीच्या खबरी राजापर्यंत तातडीने पोहोचत ज्या रयतेसाठी आपण यास्वारीची संकल्पना केली, ज्या प्रजाजनांच्या कल्याणासाठी आपण या स्वराज्याची मुहूर्तमेढ केली त्याचीच मोगलांच्या फौजांनी केलेली दैना पाहून पुरंदरच्या खबरीनी विचलित न झालेला राजा चिंतेत पडला. स्वराज्याचे गड कील्ले खूप होते. एका गडावरून दुसऱ्या गडावर मोगलांशी संघर्ष करायचा म्हटले तरी अनेक वर्षे निकराची झुंज देता आली असती. जयसिंगाचे त्यावेळचे वय लक्षात घेता त्याच्या हयातीत तरी शिवाजीराजाचा पूर्ण

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ६८