पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या काळचे वतनदार. तत्कालीन व्यवस्थेनुसार गावच्या काळीवर व पांढरीवर म्हणजेच शेतीवर व रयतेवर, तसेच गावचे शिवार अथवा चराऊ पडीत जमिनीवर पाटलांची सत्ता चाले. तर कुलकर्णी हा वतनदार असे. आणि परगण्याची रयत व भूमी यांच्यावर मालकी देशमुखांची असे. त्यांचे सहायक देशपांडे होते. ज्या राज्याशी परगणा जोडलेला असे त्या राज्याच्या राजाला धान्य, रोख रक्कम जी लागेल ती वतनदार पुरवीत असत. अर्थात वसुलीच्या परगण्यासाठी ते राजाला जबाबदार असत. म्हणजे रयतेच्या दृष्टीने परगण्याचा राजा देशमुख. तो आपल्या पदरी 'पेशवा' बाळगे. या देशमुखांना स्वतंत्र मुद्रा मिळत होती. परगण्याच्या दप्तरावर देशमुखाचा शिक्का असणे अत्यंत आवश्यक होते. कोणत्या गावच्या शेतीवर किती महसूल वसूल करायचा, व्यापाऱ्याकडून किती जकात घ्यायची हे निर्णय परगण्याचा देशमुख स्वमर्जीनुसार ठरवी. गाव शिवारातील जमिनीचे बांध कायम राखणे, तंटेबखेडे मिटविणे,गुराढोरांवर, पिकांवर व रयतेवर दुसऱ्याकडून जुलूम न होऊ देण्याची काळजी घेणे, नव्या वसाहती करणे, इनाम देणे हे अधिकार देशमुखाकडे. राजाला द्यायचा महसूल वतनदार राजाशी किंवा सुभेदारांशी परस्पर स्वतंत्रपणे ठरवून घेत. तिजोरीत भरायच्या वसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक रक्कम वतनदारांची फौज रयतेकडून वसूल करीत. या संदर्भात सभासदांनी केलेले वर्णन फार बोलके आहे. ते लिहितात,

 "आदिलशहा, निजामशहा, मोगलाईतील ज्यांनी देश काबील केला, त्या देशात पाटील, कुलकर्णी व देशमुख यांच्या हाती रयत सोपविली. त्यांनी हवी तेवढी कमाई करावी आणि मोघम रक्कम भरावी. हजार दोन हजार मिरासदाराने जमा करावी आणि त्या गावच्या नावावर मात्र दोनशे ते तीनशे दिवाणखान्यात खंड भरावा. यामुळे मिरासदार श्रीमंत होऊन गावात गढी, वाडे, कोट, बांधून सैन्य बाळगून बळावले.... ज्या दिवाणास भेटणे नाही, दिवाणाने गुंजाईस अधिक सांगितल्याने भांडावयास उभे राहतात, ये जातीने पुंड होऊन देश बळकाविले."

 'आज्ञापत्र' काराने वतनदारांबद्दल लिहिताना म्हटले आहे, "राज्यांतील देशमुख आदी करून यांची वतनदारी ही प्राकृत परिभाषा मात्र होती. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायक आहेत. हे लोक म्हणजे राजाचे वाटेकरी आहेत." वरील वतनदार म्हणजे बुलंद शक्तद्द होती. या शक्तद्दला सांभाळणे हेच रयतेसाठी काम होऊन बसले होते. जर या वतनदारांना त्यांच्याच राजाकडून थोडा जरी उपद्रव झाला तरी ते शत्रूच्या गोटात सामील होत आणि आपल्याच राज्याच्या विरुद्ध लढायला उभे राहत.

 ही वतनदारी आली कशी? अगदी शिवपूर्व काळाच्या शेकडो वर्षे आधीपासून

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ५९