पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 शेतकऱ्यांचा राजा


 शिवाजीराजांच्या पन्नास वर्षांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनाचे अर्थ लावण्याचे काम निरनिराळ्या विचारवंतांनी, इतिहास संशोधकांनी, तत्वचिंतकांनी, धर्माभिमान्यांनी आपापल्या दृष्टिकोनांतून केले आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचे राजे होते. खऱ्या अर्थाने ते केवळ शेतकऱ्यांचेच राजे होते, इतक्या सुस्पष्टपणे शिवाजी महाराजांच्या जीवनकालाचा अर्थ कोणी लावला नाही. कारण असा खरा अर्थ शेतकऱ्यांपुढे येणे त्यांच्या दृष्टीने सोयीचेही नव्हते व नाही.

 त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा राजा कधी मिळालाच नाही. शिवपूर्वकालीन अवस्था ही कोणीही येऊन रयतेस लुटावे आणि राज्य करावे अशी राहिली. पण स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना व नतरही महाराजांनी प्रसंगी अतिशय कठोरतेने, प्रसंगी मृदुतेने, प्रसंगी सामंजस्याने, गनिमी काव्याने सर्व बुद्धिकौशल्य पणाला लावून पहिल्यांदा शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. वाढवले. हरवलेली सुरक्षितता परत मिळवून दिली.

 शिवपूर्व काळात शेतकरी समाज हा वतनदारांच्या लहरीवर जीवन जगत असे. दुष्काळ असो, नापिकी असो की अतिवृष्टीमुळे नासाडी होवो, वसुलीचा रेटा हा वतनदाराच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे असे. अगदी नापिकीच्या काळात म्हणजे दुष्काळातसुद्धा वसुलीसाठी वतनदारांची फौज येत आहे असे कळताच शेतकरी प्राणभयाने डोंगरदऱ्यांमध्ये लपून बसत याची नोंद इतिहासात पदोपदी आढळते. वतनदारांना विरोध करणे म्हणजे त्याचे वैर विकत घेणे; वसुली नाकारणे म्हणजे संसाराची राख-रांगोळी करून घेणे, धूळधाण करून घेणे होते. शेतकऱ्यांची लूट करून बादशहाच्या खजिन्यामध्ये पैसा भरणारे वतनदार आणि त्यांचे राजे पातशहा यांना रयतेची फारशी चिंता नसे. त्यामुळे शेती, शेतकरी किंवा गावगाड्याशी राज्यकर्त्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला होता. शेतकरी, गावकरी यांच्यावर सत्ता चाले ती गाव-वतनदार, परगणे वतनदार किंवा सुभेदारांची. वतनदारांचे धोरण हे या निमित्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हे

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ५८