छायेत आणि सावलीत राहूनही बाळाजी होनप देशपांडे याना शिवाजीराजापेक्षाही शाइस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय !
तत्कालीन राजकिय परिस्थितीनुसार वतनदार आणि देशमुख यांचे राज्य चालत असे. आपल्या वतनातील गावांचा महसूल गोळा करायचा आणि पदरी सैन्य ठेवायचे ते महसूल गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, आपल्या वतनाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी. पण हे स्वतंत्र अस्तित्व कोठल्या तरी वतनदाराची बांधीलकि राखत असे. त्यामुळे हे वतनदार आणि देशमुख फार शिरजोर झाले होते. राजाने त्यांचा फौजफाटा बाळगण्याचा अधिकारही काढून घेऊन त्यांना ताब्यात आणले आणि सैन्य बाळगण्याचा अधिकार हा पहिल्यांदाच स्वराज्याकडे घेतला. सैन्य स्वराज्याचे, घोड्यांच्या पागा स्वराज्याच्या, हत्यारे स्वराज्याची ही कल्पनाच सबंध इतिहासात पहिल्यांदा आली.
राजाला ज्या स्वकियांविरुद्ध लढावे लागले, आपल्याच माणसांविरुद्ध हत्यार उपसावे लागले याची काही निवडक आणि फक्त ठळक उदाहरणे वर दिली आहेत.
याशिवाय राजाच्या चरित्रामध्ये अशी अगणित उदाहरणे स्वकियांविरुद्ध लढावे लागण्याची देता येतील. स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याला आपल्याच माणसाविरुद्ध लढावे लागले हे केवढे दुर्दैव!
इ.स.१६४८ च्या सुमारास विजापूरच्या नोकरीतील पाचसातशे पठाण शिवाजीकडे चाकरीस राहण्यास आले. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी स्पष्ट सल्ला दिला,
"तुमचा लौकीक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली, तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा वर्ण, चारही जाती यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे."
शिवाजीने हा सल्ला मानला आणि गोमाजी नाईकास निसबतीस ठेवून घेतले.
या पार्श्वभूमीवर स्वराज्याच्या निर्मितीसाठी परधर्मीयांनी शिवाजीला केलेली मदत किंवा अगदी जीवघेण्या प्रसंगातसुद्धा ज्या खंबीरतेने ते त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याचा उल्लेख राजाच्या सबंध कर्तुत्वाचा उच्चांक गाठणारा ठरावा. खवासखानाची मोहीम मोडून काढल्यानंतर राजे कुडाळवर चालून गेला. कुडाळचे लखम सावंत १२ हजार हशमांसह ठाण मांडून बसले होते. राजाने त्यांचा दारुण पराभव केला आणि सावंताला तोंड लपवून पोर्तुगीजांच्या आश्रयाला पळून जावे लागले. याचवेळी "फोंडा" या आदिलशहाच्या बळकट किल्ल्याला शिवाजीने