पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि मराठेसुद्धा शिवाजीच्या बाजूने उभे राहिले नाहीत. खेळोजी भोसल्यांचे उदाहरण फार महत्त्वाचे आहे. मिर्झा राजांनी आमिष दाखवून काही सरदार फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. जावळीचे खेळोजी भोसले ५०० पायदळासह मिर्झा राजेंना फितूर झाले. पण राजाचे जवळचे सहकारी कान्होजी नाईक हे खंडोजी खोपड्यांना क्षमा करावी म्हणून शिवाजीकडे आले. कान्होजी नाईकांनी खूप रदबदली केली. खंडोजी खोपड्यांना जिवानिशी मारणार नाही असे वचन राजाने त्या कान्होजीना दिले. पण खंडोजीच्या दगलबाजीचा संताप त्याच्या मनातून यत्किंचितही कमी झाला नव्हता. राजाने खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. ज्या पायाने चालत गेला तो पाय आणि ज्या हाताने फितुरी केली तो हात त्यांनी निष्ठुरतेने कलम केला. त्याचवेळी कान्होजी नाईकांना जिवानिशी ठार मारणार नाही हे दिलेले वचनही पाळले.

 स्वराज्याविरुद्ध असलेल्या वतनदारांविरुद्ध राजाला नेहमीच संघर्ष करावा लागला. पण त्यावेळी राजाचा द्वेष करणारे लोक किती खालच्या थराला गेले होते याचे उदाहरण म्हणून तुळजाभवानीचे मंदिर अफझलखानाने तोडले त्यावेळी दिसून येते. अफझलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकरजी मोहिते, कल्याणकर यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि प्रत्यक्ष राजाचे चुलते संभाजीराव भोसले हे उपस्थित होते. शाइस्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील इतर हिंदू सरदार असणे हे स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे आणि दत्ताजीराव खंडागळे, हे मराठे सरदारसुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजी राजे भोसले, परसोजी भोसले ही मंडळी शिवाजीच्या रक्ताची, नात्याची अगदी सख्खे चुलत-चुलत असेच नातलग होते. यापेक्षा शाइस्तेखानाच्या सरदारांत सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव ही जिजाऊंच्या माहेरची मंडळी स्वराज्याचा नाश करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून उतरली होती. पुण्याची देशमुखी आपल्याला मिळावी एवढ्या अपेक्षेवर लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले. खानाने शितोळ्याची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप हे पुण्याच्या राजाच्या लाल महालाच्या शेजारीच राहात. शिवाजीचे बालपण हे कदाचित बाळाजींच्या अंगाखांद्यावर, मांडीवर गेलेले असेल. स्वराज्याच्या छत्र-

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ४५