पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजाने ज्यावेळी तळ कोकणावर स्वारी केली तेव्हा सिद्दी खवासखान यास विजापूर दरबाराने शिवाजीशी लढायला पाठविले. खवासखानाच्या सैन्यात घोरपड्यांनी दाखल व्हावे असा विजापूर दरबाराचा हुकूम होता. घोरपडे सैन्यासह मदतीस येण्याआधीच राजाने त्यांच्या जहागिरीवर छापा घातला आणि स्वत: घोरपड्यास ठार केले.

 जावळीजवळील हिरडसचा देशमुख असाच शिरजोर झाला होता. त्याच्या ताब्यात रोहिडा नावाचा मजबूत कील्ला होता. त्यावर राजाने एकाएकि हल्ला करून तो हस्तगत केला आणि लढाईत देशमुख मारला गेला.

 राजावर वेळोवेळी चाल करून येणाऱ्या विजापूरच्या सैन्यात तर अगणित मराठे सरदार असायचेच. केवळ दरबारात मनसबदारी मिळावी, वतन मिळावे, शेतकऱ्यांना आणि येथील मुलखाला लुटून सजवलेल्या दरबारी श्रीमंतीत आपला वाटा असावा या पलीकडे त्यांची दृष्टी नव्हती. सर्जेराव घाडगे, घोरपडे हे रुस्तुमेज खानाबरोबर राजावर चालून आले तर वाडीकर, सावंत भोसले आणि शिवाजीचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे खवासखानाबरोबर राजावर चालून आले. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालीकर हे कोकणातील सरदार सिद्दी जोहारच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून राजा निसटलाच आणि विशाळगडाकडे आला तर त्याला रोखण्यासाठी, पकडण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी दबा धरून बसले होते. एकिकडे मावळातील ३०० शेतकरी, धारकरी शिवाजीचे प्राण वाचावे, स्वराज्याचे अस्तित्व राहावे म्हणून मरणाची खात्री असताना पावनखिंडीत उभे होते. तर सूर्यराव आणि जसवंतराव स्वराज्याचे अस्तित्व मोडण्यासाठी विशाळगडच्या पायथ्याशी उभे होते. विशाळगडावरून स्वराज्यात परत आल्यानंतर काही दिवसांतच १६६० मध्ये राजा सूर्याजीराव सुर्व्याच्या शृंगारपुरावर चालून गेला. संगमेश्वर परिसर ही सुर्व्याची जहागिरी ताब्यात घेतली. सूर्यराव सुर्वे यांनी जरी अपराध केला असला तरी आपल्या स्वराज्याच्या कार्यात शिवाजीने त्यांना सामावून घेतले. तेथून पुढे राजा जसवंतरावावर चालून गेला. जाताना संगमेश्वराजवळ तानाजी मालुसरे व पिलाजी सरनाईक यांना व्यवस्थेसाठी ठेवून गेला. नव्यानेच ताब्यात घेतलेल्या या जहागिरीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्याने तानाजीला सांगितले होते. सुर्व्यानी गद्दारी करून रात्रीच्या वेळी तानाजीच्या सैन्यावर हल्ला केला. यानंतर मात्र सुर्व्याकडे राजाने शृंगारपूरचे वतनसुद्धा ठेवले नाही. सर्व मुलूख खालसा केला. त्याचबरोबरीने बरीच लहान मोठी वतनेही बंद करून टाकली.

 ऐन लढाईच्या वेळेला पूर्ण स्वराज्यावर संकट उद्भवले असतानासुद्धा एतद्देशीय

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ४४