पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोण मानितो? येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक याल तर आजच यावे-आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर, त्याचे कृपेने राज्य करितो. आम्हा श्रीचे कृपेने, बादशहाने राजे किताब, मोरचेल. सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावलीचे करितो. तुम्ही आम्हांसी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे. आणखी वरकड मुलूख तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."

 संतप्त झालेल्या राजाने मोऱ्यांना अखेरचे पत्र पाठविले,

 "जावली खाली करून, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजूरची काही चाकरी करणे. इतकियावर बदफैली केलीया मारले जाल."

 अखेर राजाने जावळीवर स्वारी केली. महिनाभर लढाई चालली. युक्तद्द करून मोऱ्यांनी खूद रायगडच काबीज केला. रायगड परत हाती येण्यासाठी राजाला तीन महिने लागले. अखेर १५ जानेवारी १६५६ ला त्याने जावळी ताब्यात घेतली. चंद्ररराव मोरे बायकांमुलांसह जीव घेऊन रायरीला किल्ल्यावर लपून बसला. राजाने रायरी कील्ला ताब्यात घेतला. पण चंद्रराव मोऱ्यांना मदत केली ती त्यांचे भाचे बालाजी नाईक व हैबतराव शिळीमकर यांनी. चंद्रराव मोरे यांचे सर्व गुन्हे पोटात घालून मोजकी शिबंदी ठेवून जावळीचे वैभव भोगावे हे समजावण्यासाठी राजाने मोऱ्यांना चाकणला आणले. मोरे राजाच्या कैदेत होते. वरकरणी चंद्ररावाने राजाचा सल्ला आपण मानतो आहेत असे दाखविले. पण चंद्रराव मोऱ्याने सुटकेसाठी मुघोळकर घोरपड्यांना गुप्त पत्रे लिहिली होती. या फितुरी संबंधीचे कागद राजाच्या हाती पडले. तेव्हा मोरे बेईमान आहे म्हणून चाकण येथे त्याची गर्दन मारली आणि जावळी स्वराज्यात सामील झाली.

 मोऱ्याप्रमाणेच घोरपडे हेही त्या काळातील एक मातब्बर वतनदार होते. घोरपडे हे खरे तर भोसल्यांचे सख्खे भाऊबंदच. परंतु भोसल्यांचा त्यांनी आयुष्यभर द्वेषच केला. मानी शहाजी महाराजांविरुद्ध आयुष्यभर विजापूरच्या दरबारात तक्रारी केल्या. तक्रारीसुद्धा अशा की, शहाजीराजे हे दक्षिण भारतातील ऐतद्देशीय राजांशी सहानुभूतीने वागतात या स्वरूपाच्या. शहाजीराजांविरुद्ध विजापूर दरबाराचे मत कलुषित करण्यात आणि शहाजी राजांना गफलतीत, बेसावध असताना कैद करण्यात बाजी घोरपड्यांनी पुढाकार घेतला. घोरपड्यांचे वतन तसे शिवाजीच्या स्वराज्यापासून खूप दूर. मुघोळ आणि कुडाळ या परिसरात. कर्नाटक तळ कोकणात.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ४३