पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभा पश्चिम किनारा व काही भाग यावर हुकमत गाजवत. कोकण व घाटमाथ्यावरील रस्ते मोऱ्यांच्याच ताब्यात होते. १६२७ साली माणकाईने दत्तक घेतलेले कृष्णाजी बाजी निपुत्रिक वारले. चंद्ररावास राजाने जावळीच्या सिंहासनावर बसविले. हिंदवी स्वराज्य स्थापनेत त्यांच्याकडून सहकार्य मिळेल या अपेक्षेने. मावळे संघटित करून स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम सुरू असतानाच मोऱ्यांच्या जावळीच्या सत्तेला नकळत धोका उत्पन्न झाला. यामुळे चंद्रराव मोऱ्यांनी राजाशी सरळ संघर्ष आरंभिला. जावळीच्या गादीवर बसविण्याचे वेळी राजाचे उपकार विसरून चंद्रराव मोऱ्याने इमान जाहीर केले ते विजापूरच्या आदिलशहाशी. बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडील बिरवाडी व काही गावांचे अधिकार चंद्ररावांनी त्यांना हुसकावून आपल्या ताब्यात घेतले. दुर्बळ पाटील राजाकडे आले. राजाने पाटलांची त्यांच्या वतनावर पुनर्स्थापना केली. त्यामुळे चंद्रराव मोरे चिडला तर नवल नाही. चंद्रराव मोरे दिवसेंदिवस शिरजोर होऊन स्वराज्यावर आक्रमण करू लागला. चिखलीचे रामजी वाडकर यांचे व चंद्ररावाचे वैर. चंद्ररावांनी त्यास ठार मारले. रामजीचा पुत्र लुमाजी हा स्वराज्यातील रोहिड खोऱ्यातील पळसोसी या गावी जीव लपवून बसला. चंद्रराच मोरे पाठलाग करीत रोहिडखोऱ्यावर स्वारी करून आला. व स्वराज्याच्या हद्दीतील रोहिडखोऱ्यात त्याने लुमाजीस ठार मारले. गुंजण मावळची देशमुखी शिळीमकरांकडे. पण चंद्रराव मोऱ्यांनी या गुंजण मावळच्या देशमुखीवर आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली. राजाने शिळीमकरांनी बाजू उचलून धरली. शिळीमकर शिवाजीच्या बाजूला जाऊन मिळालेले पाहून चंद्ररावांनी 'शिवाजी तुमची जहागिरी बळकावील' अशी शंका शिळीमकराच्या मनात निर्माण करण्यास सुरूवात केली. चंद्रराव हे शिळीमकराचे मामा. शिवाजीला हे वृत्त कळताच त्याने शिळीमकरांना अभयपत्र पाठविले आणि 'लोक काही सांगत असतील तरी त्यावर विश्वास न ठेवता आपण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये' असे कळविले. त्याचवेळी मोऱ्यांना मात्र जबरेचे पत्र पाठविले. त्या पत्रात राजा लिहितो.

 "तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हा श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नौकर होऊन आपला मुलूक खाऊन, हामराह चाकरी करावी नाही तर बदफैल करून फंद कराल, तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेवू."

 उत्तरादाखल चंद्ररावाने शिवाजीराजास उद्धटपणे लिहिले की, "तुम्ही काल राजे जाहला, तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ४२