पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणण्यात दोन्ही जमातींच्या म्होरक्यांनी एकत्र येऊन, अगदी कारस्थान करून दंगलीला कारण ठरलेले प्रसंग घडवून आणलेले असावेत असा बळकट संशय येतो.

 जातीय दंगली सुरू झाल्या, की दंगलीत किती मेले, जखमी झाले, नुकसान किती झाले याच्या चर्चा गल्लोगल्ली आणि घरोघरी होऊ लागतात. ही भयानक आकडेवारी क्रिकेटच्या सामन्याच्या धावसंख्येप्रमाणे सांगितली जाते. 'आपले किती गेले, त्यांचे किती कापले?' अशी भाषा सुरू होते. आपले गेले ही एक भयानक कहाणी आणि त्यांचे कापले गेले तो केवळ अपरिहार्य प्रतिक्रियेचा भाग असा आकडेवारी देणाऱ्यांचा आविर्भाव असतो. अगदी भले भले शहाणेसुरतेसुद्धा 'आपले', 'त्यांचे' अशी भाषा बोलू लागतात. एरव्ही आपल्या धर्माविषयी कोणतीच आस्था न बाळगणाऱ्यांनासुद्धा आपला एक धर्म असल्याचा साक्षात्कार होतो व त्या धर्मात जन्मण्याचा अपघात झालेले सर्व आपले, त्यांची-आपली सुखदुःखे सारखी आणि जे नीच लोक दुसऱ्या धर्माच्या आईबापांच्या पोटी जन्मले ते क्रूरतम शिक्षेसच पात्र अशी मनातल्या मनात पक्की विभागणी. कोणतीही जातीय दंगल असो, कोणत्या जातीचे किती नुकसान झाले या आकडेवादीला तसे काहीच महत्त्व नसते. महत्त्वाची गोष्ट ही, की 'आपली-त्यांची' भाषा चालू होते. दोन समाजांतील दरी रुंदावत जाते आणि जातीय दंगलींना चेतावणी देणाऱ्यांना नेमके हेच हवे असते. हिंदू जातीयवादी संस्था, मुसलमान धर्मांधता शिकवणाऱ्या संघटना, सवर्णांचे मंच आणि दलितांच्या आघाड्या या सगळ्यांनाच अशा तऱ्हेचे मनांचे विभाजन हवे असते. किंबहुना असे तट पडण्यासाठीच त्यांचा सगळा अट्टहास असतो.

 जनसामान्य जेव्हा स्वत:ची ओळख जन्माच्या अपघाताने पटवून घेऊ लागतात तेव्हा जातीयवाद्याचा प्रयत्न सफल होतो. प्रत्येक मनुष्य हा समाजप्रिय असतोच. कोणत्या ना कोणत्या गटाशी, समुदायाशी आपला संबंध आहे ही भावना त्याला सुखकर वाटते. आयुष्यातल्या दैनंदिन अनुभवातल्या सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण समांतर अनुभव असणाऱ्यांशी करावी असे प्रत्येकाला वाटते. कलावान कलावंतांच्या बरोबर राहू लागले आणि शेतकरी बलुतेदार एकत्र बसू लागले तर जातीयवाद्यांची मोठी कुचंबणा होऊन जाईल. असे अर्थवादी गट त्यांना अजिबात न रूचणारे व न परवडणारे. लोकांनी आपल्या धर्मजातीप्रमाणे एकत्र यावे, एवढेच नव्हे तर दुसऱ्या सगळ्या धर्मांतील व जातीतील लोकांचा द्वेष, तिरस्कार करावा, स्वत:चा श्रेष्ठतेचा टेंभा मिरवावा, दुसऱ्याला हीन आणि दुष्ट लेखावे ही

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १९७