पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अभ्यास झाले. उलटीसुलटी चर्चाही झाली; पण या सगळ्या चर्चा अभ्यासून पाहिल्यानंतर अत्याचाराच्या अफवेला दुजोरा मिळण्यासारखा एक कणमात्र पुरावा पुढे आला नाही.

 दंग्यात मरणारी माणसे क्वचितच धर्मनिष्ठ संस्था, संघटनांची असतात. जमशेदपुरच्या दंगलीत दहा दिवस आधी सरसंघचालक यांनी तेथे भाषण केले. जमात-ए-इस्लामच्या अध्यक्षांनी मक्केहून आणलेले एक फौऊंटनपेन त्यांना सदिच्छा म्हणून दिले. असल्या संघटना एकमेकांच्या मागे हात धुवुन लागल्या आहेत असे दृश्य कधीच पाहायला मिळत नाही.

 दंग्याच्या आधी काही दिवस तशी दंग्याची चाहूलही नसताना दोन्ही जमातीतील सभांत काही बेताल भाषणे होतात. वातावरण तापायला सुरुवात होते. ही भाषणे करणारी माणसे प्रत्येक वेळी काही देवरस, ठाकरे पातळीचे नेते मंडळी असतातच असे काही नाही. एखादा सिन्नरकर महाराजही ही कामगिरी बजावून जातो.
 हिंदूसारख्या बहुसंख्य जमातीलाही मुसलमान आपल्यावर कुरघोडी करतील अशी भीती वाटते तर मुसलमानांना बहुसंख्याक हिंदूंकडून धोका असल्याचा बागुलबुवा जमातवाले दाखवतात. मनांत अकारण-सकारण असुरक्षिततेची भावना असली, की कोणत्यातरी एका प्रसंगाने काही घडते आणि विस्फोट होतो.

 निमित्त ठरणाऱ्या प्रसंगाचीही एक पद्धत ठरलेली आहे. गाय मारणे किंवा पूजास्थानात डुक्कर येणे, देऊळ किंवा मशीद यांच्या पावित्र्याचा तथाकथित भंग होणे, मशिदीवरून वाद्यांची मिरवणूक जाणे असे निमित्त कुठेही आणि कधीही मिळू शकते. या परंपरागत निमित्ताखेरीज आता काही राष्ट्रीय पातळीवरचे वाद तयार होऊ लागले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एखादा क्रिकेटचा सामना चालू असताना एखाद्या विद्यार्थ्याने वेस्ट इंडिजबद्दल कौतुक दाखवले तर त्यातून कत्तली होत नाहीत. पाकिस्तानच्या टीमबद्दल मला स्वत:लाही खूप कौतूक वाटते; पण असे कौतुक कुणा मुसलमानाने जाहीरपणे केले तर त्यातून केव्हाही दंगा उद्भवू शकतो.

 शेकडो वर्षांपूर्वी कोणत्या जागी कोणती वास्तू होती हा वाद आता निरर्थक आहे. एकामागोमाग एक आक्रमणांच्या लाटा सोसलेल्या या देशात कोणत्या जागी सुरुवातीला काय होते हा वादही तसा बाष्कळ आहे; पण या वादातूनही पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे दंगली उद्भवण्याचे सामर्थ्य तयार झाले आहे.

 वेगवेगळ्या दंगली घडण्याचे तात्कालिक आणि स्थानिक कारण काय होते हे पाहायला गेले तर बऱ्याच वेळा एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. हे प्रसंग घडवून

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १९६