पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याला मोपल्यांचे बंड असे नाव दिले आणि हिंदू-मुसलमानांच्या दंग्याचे स्वरूप दिले तेव्हा शेतमजुरांचा पराभव झाला. देशाची फाळणी तरी का झाली? सिंध प्रांतात आणि पूर्व बंगालात शेतमजूर तेवढे मुसलमान आणि जमीनदार सगळे हिंदू अशी स्थिती होती. मजुरांचे बंड मोडण्याकरिता जमीनदारांनी मुसलमानांचे आक्रमण म्हणून भुई थोपटायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा मुस्लिम लीगवाल्यांनी घेऊन पाकिस्तान तयार केले. असाच धोका आज महाराष्ट्रात संभवतो.

 शेतकरी तितुका एक हे फार महत्त्वाचे सूत्र आहे. शेतकरी छोटा असो, मोठा असो, बागायती असो, कोरडवाहू असो, त्याची जात कोणतीही असो तो एक आहे हे संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. शेतमालाला भाव हा गरिबी हटवण्याचा एककलमी कार्यक्रम आहे आणि देशातील सर्व समस्यांचे मूळ शेतकऱ्यांच्या शोषणात आहे अशी संपूर्ण अर्थवादी भूमिका घेऊन शेतकरी आंदोलन पुढे सरसावत आहे. आर्थिक रणभूमीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पराभव होऊ शकत नाही याची जाणीव झाल्यानंतर भयभीत झालेला दुष्मन पुन्हा एकदा 'फोडा आणि झोडा' नीतीचा अवलंब करायला सज्ज झाला. धर्माच्या नावाखाली भावना भडकवून देणारे लोक वेगवेगळ्या नावाखाली गावोगाव शिरू पाहताहेत. आपापल्या जातीचे भांडवल करून पुढे झाले म्हणजे निदान आपल्या जातीच्या लोकांचा गठ्ठा पाठिंबा मिळतो हे लक्षात आल्यावर धूर्त आणि आपमतलबी पुढारी गरिबांच्या भुकेचे आर्थिक विश्लेषण बाजूला सारून वेगवेगळ्या धर्मांच्या आणि देवदेवतांच्या जयजयकारांच्या घोषणा बुलंद करू लागले आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्या या कारस्थानांना यश येत आहे.

 राखीव जागांच्या प्रश्नावर जे दंगे माजतात त्याचा विचार करू. हा प्रश्न म्हटला, की भल्या भल्या म्हणणाऱ्या सवर्णांची आणि दलितांची माथी फिरतात. राखीव जागा असाव्यात किवा नसाव्यात, त्या किती असाव्यात, जन्मजात मागासलेपणा अधिक महत्त्वाचा का आर्थिक मागासलेपणा, राखीव जागांचे वेगवेगळ्या सेवांच्या गुणवत्तेवर होणारे परिणाम यांपैकी खरे म्हटले तर कोणतीच बाब महत्त्वाची नाही. राखीव जागांचा प्रश्न हा गरिबी हटवण्याशीही संबंधित नाही आणि बेकारी दूर करण्यात तर नाहीच नाही. बहुजन समाजातील बेकारांच्या पोटातील भूक ही काही दलित समाजाच्या बेकारांच्या पोटातील भुकेपेक्षा वेगळी नसते. हिंदूंच्या पोटातील भूक मुसलमानांच्या पोटातील भुकेपेक्षा वेगळी नसते. भुकेला जात नाही, भाषा नाही आणि धर्मही नाही. देशात शंभर तरुण दरवर्षी नोकरीला तयार होत असले तर सरकारी धोरणाप्रमाणे दहाच नोकऱ्या तयार होतात. त्या दहा नोकऱ्यांचे वाटप

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८६