पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/196

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कशाही पद्धतीने झाले तरी नव्वद तरुण, मग ते कोणत्याही जातीचे असोत, बेकार उरणारच आहेत. मग या वादावर गरिबांनी एकमेकांची डोकी का फोडावीत?

 पण याहीपेक्षा फालतू गोष्टीवर वादविवाद लावले जातात. या देवतेची पूजा, त्याची मिरवणूक येवढ्या तेवढ्यावरून मुडदे पाडले जातात. देवळादेवळांतून कर्णे लावून धर्माधर्मांचा प्रचार चालू आहे. ओढा खळखळ वाहत असला म्हणजे पाणी स्वच्छ राहते; पण त्या पाण्याला तुंबारा बसला, की त्याचे डबके होते. त्यात शेवाळं साठतं, किडे होतात आणि डबक्यातल्या डबक्यात त्यांच्या एकमेकांतील जिवघेण्या लढाया चालू होतात. राष्ट्रांचे नेतृत्व महात्मा गांधींच्या हाती होते. देश स्वातंत्र्यासाठी झुंजत होता. तेव्हा राष्ट्रभाषेच्या प्रचारात मद्रास प्रांत सगळ्यांत अग्रेसर होता. महात्मा गांधींचे नेतृत्व जाऊन छोट्या छोट्या गांधींचे नेतृत्व आल्यावर तामिळनाडूत हिंदीला कडवा विरोध होत आहे. कारण देशातील विकासांची गती खुंटली आहे. देशाचे डबके बनले आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना शहरात जाण्याचा आदेश का दिला? खेड्यातल्यापेक्षा शहरात जातीयता कमी का जाणवते? कारण उघड आहे. खेड्यांच्या तुलनेत शहरातील प्रत्येकाच्या विकासाची गती फार मोठी आहे. थोडे का होईना सगळेच जण वर चढत असले, तर दुसऱ्याला अडवण्याची किंवा पाडण्याची प्रवृत्ती शहरात होत नाही; पण खेड्यातला विकासच खुंटला. शेतकरी बुडतो आहे. शेतमजूर रोजगाराकरिता वणवण फिरतो आहे. भविष्यकाळ सर्वांचाच भेसूर आहे, आशा करण्यासारखे किंवा अभिमान बाळगण्यासारखे कोणाजवळ काही नाही; मग जे असेल त्याचाच खोटा अभिमान बाळगायचा. ब्राह्मणाने जगाला हीन मानायचे, मराठ्याने ब्राह्मणांची हेटाळणी कराची, दोघांनी मिळून महारांना कमी लेखायचे. महारांनी मांगांना, मांगांनी चांभारांना ही अशी भुकेकंगालांची लढाई गावोगाव चालू आहे. आगीत तेल ओतून पोळी भाजायला येणारे अनेक. इतिहासाचे नाव घेऊन स्वाभिमान आणि अस्मितेच्याच बाता करीत लुटलेल्या आणि नाडलेल्या हीनदीनात लढाया माजवून देणारे उदंड झाले आहेत. जातीचे राजकारण हा गठ्ठा मतांचा किफायतशीर धंदा झाला आहे. हे वर्षानुवर्षे चालले. गावाला विभागणाऱ्या या भिंती ओलांडून समग्र गावाची चळवळ कधी उभी राहूच शकली नाही. गावठाणे आणि राजवाडे वेगळे. परिणामत: गावठाणे आणि राजवाडे दोघांनाही इंडियाने फस्त केले आहे.

 मी सभेला येण्यापूर्वी काही जणांनी चिठ्या पाठवून कळविले, की गावोगाव खुले आम जातीयवादाचा प्रचार झाला आहे. 'काही झाले तरी आपल्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १८७