पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बिगरशीख आहेत; पण तरीही तेथील शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली १९७० सालापासून शेतकऱ्यांची निखळ अर्थवादी चळवळ बांधण्याचे भरकस प्रयत्न चालू होते. १९८० सालापर्यंत अशी परिस्थिती तयार झाली, की शेतकरी संघटना ठरवेल त्याच्या हाती सत्ता जाऊ लागली. शेतकऱ्यांच्या या नव्या ताकदीचा आर्थिक पातळीवर पराभव करणे कोणालाच शक्य नव्हते. म्हणून मोठ्या दुष्टबुद्धीने त्याला जातीयवादी स्वरूप देण्यात आले. देशाच्या अखंडतेचा आणि एकात्मतेचा दिवसरात्र घोष करणाऱ्यांनी 'देश फुटला तरी बेहतर, शेतकरी जिंकता कामा नये' अशा तऱ्हेने मोर्चे बांधले. शेतकरी आंदोलन दुर्बल झाले. मी पंजाबमध्ये सरहिंद गावी गेलो, गुरु गोविंदसिंघांच्या दोन मुलांना या जागी भिंतीत चिणून मारले, त्याच ठिकाणी २१ ते २३ फेब्रुवारी हे तीन दिवस पंचवीस हजारांवर शेतकरी केवळ शेतकऱ्यांच्या निखळ आर्थिक प्रश्नावर विचार विनिमय करत होते. त्यांच्यापैकी पुष्कळांना मी जवळजवळ दोन वर्षांनंतर भेटत होतो. मला पाहून त्यांना भरून येत होते. नोव्हेंबर १९८४ च्या दिल्ली येथील दंग्यात महिलांवर जे अत्याचार झाले त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातून दहा हजार स्त्रिया पंतप्रधानांच्या घरासमोर निदर्शने करणार आहेत. हे ऐकल्यानंतर ते म्हणाले, "गेल्या दोन वर्षात पंजाब बाहेरून आम्हाला पहिली चांगली बातमी ऐकायला मिळाली. पंजाबात धर्माधर्मांत भांडणे लावणाऱ्यांना मुंहतोड जबाब देण्यासाठी आम्हाला हिंमत आली." पंजाबमधील शेतकऱ्यांच्या लढ्यात धर्ममार्तंडांनी पाडलेली फूट दूर करता आली तरच गरिबीची लढाई यशस्वी होईल.

 पंजाबमधून येताना वाटेत गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मी हजर होतो. लक्षावधी शेतकरी जमले होते. गुजरातमध्ये हा अभूतपूर्व मेळावा असं सगळे म्हणत होते; पण शेतकरी एका बाजूला उठत असताना त्या गुजरातमध्ये राखीव जागांच्या प्रश्नावर आणि दुसऱ्या कारणासाठी जातीजातींचे आणि धर्माधर्मांचे दंगे होऊन रक्ताचे पाट वाहत आहेत. शेतकरी चळवळीतसुद्धा धार्मिक चिन्हे आणि ध्वज आणण्याचा प्रयत्न होतो आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले तर गुजरातमधील शेतकरी ताकद, आंदोलन संपेल. हा धोका महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनालाही आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटना मजबूत आहे, ताकदवान आहे म्हणून या जातीय रोगाच्या साथीचा आपल्याला धोका नाही, असा खोटा आत्मविश्वास क्षणभरही बाळगू नका. जेव्हा जेव्हा, जेथे जेथे शेतकरी आंदोलन सबळ झाले तेव्हा तेव्हा तेथे तेथे जातीधर्मवादाच्या किडींनी त्याला खलास केले आहे, असे इतिहास सांगतो. केरळातील शेतमजुरांचा उठाव सशक्त झाला त्याबरोबर जमीनदार नंबुद्री बाह्मणांनी

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १८५