पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खुला परवाना दिला. बाहेरून यंत्रसामुग्री आणून त्याची कापडं बनवायची व्यवस्था केली; पण हे कापड तयार झालं; त्याने माझ्या बहिणींच्या हाती एक नवा पैसा तरी आला काय? मुळीच नाही. धन झाली ती परदेशातल्या कारखानदारांची, धन झाली धिरूभाई अंबानीची, नस्ली वाडियांची. उलट कापसाचे भाव पडले, पेरा कमी झाला, मजुरी बुडाली, यंत्रमाग बंद पडले, हातमाग थांबले. माझ्या बहिणीच्या हातात उरणाऱ्या दोन पैशातलासुद्धा पैसा कमी झाला. इतकं देशद्रोही धोरण अगदी इंग्रजी अमलात लॉर्ड कर्झननेसुद्धा अमलात आणायची हिंमत केली नसती. गोऱ्या इंग्रजालाही जमलं नाही ते आता काळा इंग्रज करतो आहे अन् हे काही फक्त कापड धोरणाबाबत नाही, सर्वच क्षेत्रात आहे. औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधी, शिक्षण, कामगारांसंबंधी कायदे प्रत्येक क्षेत्रात उघडपणे गरिबांना आणखी कोपऱ्यात लोटण्याची तयारी आटोकाट होत आहे.

 या संकटालाही तोंड देणे जमेल; पण याहूनही मोठे संकट दुसरीकडे तयार होत आहे. मी गेल्या आठवड्यात पंजाबमध्ये गेलो होतो. पंजाबमध्ये चालू असलेला वाद हा हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक स्वरूपाचा वाद नाही. मी या विषयावर अनेकवेळा बोललो आहे. १९८४ च्या मार्चमध्ये शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली ८० हजार शेतकरी विजेचे भाव कमी करून मिळावेत या मागणीसाठी आंदोलनात उतरले. आठ दिवस चंडीगढ येथे राजभवनाला वेढा घालून बसले. अकाली दलाच्या पुढाऱ्यांनी, इतरही काही पक्षांनी आंदोलनात घुसायचा प्रयत्न केला, त्याला शीख शेतकऱ्यांनी विरोध केला. या वादाचे स्वरूप जातीय नाही हे उघड आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धचा लढा शेकडो वर्षांपासून चालू आहे. शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हे शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्धच्या लढ्याचेच पहिले रूप आणि महात्मा जोतीबा फुल्यांचा 'भटशाही' विरुद्धचा लढा हाही त्याच लढ्याचा एकोणविसाव्या शतकातील अवतार. तसेच पंजाबातील शीख गुरू आणि त्यांच्यानंतर बंदा बहादुर यांच्या पराक्रमांच्या गाथा शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्याकरिता अवतरल्या. या शतकात सर छोटुराम यांच्या युनियनिस्ट पक्षाने हिंदू, शीख आणि मुसलमान या तिघांचीही भरभक्कम एकी केली आणि लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी व सावकार काँग्रेसचा पराभव केला. १९६५ पासून हरितक्रांती सुरू झाली. पंजाबी शेतकऱ्यांनी देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण केला; पण हरितक्रांतीचा फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. तो कर्जातच बुडाला. फायदा झाला तो व्यापाऱ्यांचा, ट्रॅक्टर विकणाऱ्या, खत विकणाऱ्या, औषध विकणाऱ्या व्यापाऱ्याचा. पंजाबमधला शेतकरी शीख आहे आणि व्यापारी बहुतांश

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १८४