पसरलेल्या, 'आंदोलन नगराला' भेट द्यायला निघालो. एक पन्नाशीच्या बाई मला पाहताच धावत पुढे आल्या. सगळे पत्रकार ऐकत होते. त्या म्हणाल्या, "शरदभाऊ, तुम्ही आमच्या गावात आला होता. आंदोलनात भाग घ्यायला तुम्ही सांगितल होतं. नुसत्या पुरुषापुरुषांनी येऊन भागणार नाही मायबहिणींनीपण आलं पाहिजे म्हणून सांगितलं. मनात पहिल्यापासून फार यायचं होतं बघा, इकडे यायसारखं एक लुगडं माझ्यापाशी नाही. आज शेजारणीकडनं घेतलं अन् तडक इकडं आले बघा."
घराबाहेर पडायचं झालं तर बरं दिसावं, निदान लाज राखली जावी इतपतसुद्धा ज्याच्या घरी कापडं नाहीत अशी माणसं आजही देशात रुपयात चार आणे आहेत. माझ्या असंख्य बहिणी दोन दांडांचं, तीन दांडांचं, जागोजाग ठिगळं शिवलेली आणि जिथं ठिगळानं भागत नाही तिथं गाठी मारलेल्या अशी कापडं नेसतात. या माझ्या बहिणींच्या अंगावरच्या कपड्याचे एखादं भोक तरी कमी करेल ते कापड धोरण चांगलं, हे कसं काय व्हायचं?
या माझ्या बहिणींना तुम्ही विचारा, 'का गं बये, तू असली कापडं का घातलीस? देशात तर कापडाला काही तोटा नाही. दुकानं भरभरून वाहत आहेत. कापडाचे सेल लागले आहेत. रंगीबेरंगी झुळझुळीत कापडं विकत घ्या म्हणून लाखो रुपये खर्चुन पेपरात, दूरदर्शनवर जाहिराती देतात मग तू असली कापडं का घातली?' ती म्हणेल, 'काय करावं? मिळतं त्यात पोट भरणं कठीण. दरवर्षी म्हणतो- कापडं करायची; पण जमतच नाही.' तुम्ही विचाराल, 'तुला पैसा का पुरत नाही? तुमच्या घरातली सगळी माणसं आळशी आहेत? का कसे?' ती म्हणेल, 'नाही बाप्पा, घरातली सगळी माणसं, अगदी आठ वर्षांचा पोर अन् साठ वर्षांची म्हातारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतात; पण सांजी कशी ती येत नाही अन् हातात पडंल त्या पैशानं पोट भरायची मारामार. कापडं घेतली तर प्रथम कारभाऱ्याला नंतर पोराला. मला घ्यायला जमतच नाही बघा.' मग कापड धोरण चांगल कोणतं? ह्या प्रश्नाचं उत्तर उघड आहे. एका बाजूला कापडं तयार होतात त्याच्याबरोबर शेतमजुरांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हाती मिळकत जात नाही. कापड तयार होण्याची मिळकत ज्यांच्या अंगावर कापड नाही त्यांच्या हाती गेली, तर तयार कापड खपेल. नाहीतर नुसतंच दुकानात साठून राहील अन् उघडे ते उघडेच राहतील. राजीव गांधींच्या कापड धोरणातून काय झालं? ज्याच्याकडे अधिक साड्याचे ढीग लागले आहेत त्यांना जाडी भरडी कापडं नकोत, झुळझुळीत तलम, टेरिलीन, अक्रॅलिनची कापडं पाहिजेत. माझ्या बहिणीच्या अपेक्षा राजीव गांधींना त्यांची चैन जास्त महत्त्वाची वाटते म्हणून त्यांनी परदेशांतून राजीवस्त्रांची आयात करायला