आजची जी परिस्थिती आहे त्याचं कारण काय आहे? हे आपण समजून घेणं जरुरीचं आहे. निवडणुका कुणी जाहीर केल्या? अयोग्य वेळी जाहीर केल्या का? या मुद्द्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. निवडणुका जास्तीत जास्त फायद्याच्या वेळी जाहीर करणे, त्या निवडून येणे, सत्ता हाती घेणे हा राजकारण्यांचा धंदा आहे. त्यासाठी प्रसंगी प्रेताच्या टाळूवरचं लोणीसुद्धा खायची त्यांची तयारी असावी लागते. त्यांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं नागरिकाचं काम केलं पाहिजे. ज्यांच्या मनात देशाविषयी खरोखर कळकळ आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी तरी निदान देशाच्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.
१९४७ मध्ये भावाभावांच्या भांडणामुळे फाळणी झाली. त्या वेळी वाटलं, ऑपरेशन झालं आता भांडण संपलं. पुढे असा रोग या देशाला होणार नाही; पण भावाभावांतल्या भांडणाचा रोग हा कॅन्सरसारखा दिसतो. ४७ मध्ये ऑपरेशन झालं असलं तरी आज ८४ मध्ये अशी वेळ येऊन ठेपली आहे, की पुन्हा एकदा ऑपरेशन, पुन्हा एकदा फाळणी होणार आहे, की काय अशी शंका येते. मी हे गंभीरपणे मांडतो आहे. म्हटलं जातं की त्या वेळी वाद हिंदूमुसलमानांचा होता. आज कदाचित हिंदूशिखांचा आहे. माणसं काय माणसाशी कुणी हिंदू आहे, मुसलमान आहे म्हणून भांडतात? माझा या कल्पनेवर विश्वास नाही.
ज्या ज्या म्हणून जातीय दंगली झाल्या असं म्हटलं जातं त्यांच्यामागे वेगळंच काही कारण असतं असं दिसून येतं. उदाहरणार्थ, काही महिन्यांपूर्वी भिवंडीत ज्या दंगली झाल्या त्यांना हिंदूमुसलमानांच्या दंगली म्हटलं गेलं; पण दंगलीमध्ये जे जे काही धडलं ते जर संगतवार पाहिलं तर असं दिसून येतं, की भिवंडीमध्ये ज्या मोकळ्या जागा पडल्या होत्या त्यावर खेड्यापाड्यातून स्थलांतरीत झालेली जी गरीब शेतकरी माणसं होती, झोपडपट्ट्यांतून राहत होती त्या जागा रिकाम्या करून घेण्यासाठी त्यांना व्यवस्थितरित्याआगी लावण्यात आल्या. ज्यांना या जागा मोकळ्या करून घ्यायच्या होत्या त्यांनी हिंदूमुसलमानांच्या झगड्याचं नाव घेऊन आपला आर्थिक स्वार्थ साधून घेतला असं आपल्याला ऐकायला मिळालं.
ज्याच्या पोटामध्ये भूक असते तो हिंदू असो, मुसलमान असो, का इतर कोणत्याही धर्माचा असो त्याला ही जाण असते, की हिंदूच्या पोटातली भूक आणि मुसलमानाच्या पोटातली भूक यात काही फरक नसतो. या देशाचा इतिहास पाहिला तर ज्यांना ज्यांना पिळलं जातं त्या शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं जेव्हा म्हणून काही आंदोलन उभं राहण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा अर्थवाद बाजूला पडावा, त्यांच्या आर्थिक शोषणाची तक्रार, आर्थिक मागण्या पडाव्यात याकरिता