अर्थवादी चळवळींना जातीयवादाचा बडगा
माझ्या शेतकरी भावांनो आणि बहिणींनो, सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत. वर्तमानपत्रं उघडावीत तर निवडणुकीच्या घोषणा, रस्त्यावर बाहेर पडावं तर निवडणुकीचे फलक, जाहिराती जो तो म्हणतो आहे मला मतं द्या. आजपर्यंत आपापल्या पक्षांची प्रौढी सांगणारी मंडळी पक्षाची तिकिटं मिळाली नाहीत म्हणून त्या पक्षांतून उठून दुसऱ्या पक्षांत जाऊन बसताहेत, नवीन पक्ष काढताहेत. ज्यांना तिकिटं मिळाली ती कोणत्या तऱ्हेने मतं मिळवता येतील, कोणत्या तऱ्हेने आपल्या पक्षाचं राज्य येईल या चिंतेत मग्न आहेत.
मी हे जे लिहीत आहे ते कोणा उमेदवाराला किंवा पक्षाला निवडून आणा हे सांगण्यासाठी लिहीत नाही. आज देशामध्ये जी विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा आपल्याला थोडा विचार करावयाचा आहे. आज रस्तोरस्ती पाट्या, फलक, पोस्टर्स लावले आहेत आणि सर्वांनी एकच नारा आणि घोष लावला आहे की या देशाची एकात्मता आणि अखंडत्व टिकवायचे असेल तर आम्हालाच मते द्या. ज्यांनी ३७ वर्षे या देशावर राज्य केले ते म्हणतात, 'देश जर एक ठेवायचा असेल तर ते काम आम्हीच करू शकू.' विरुद्ध बाजूची मंडळी साहजिकच त्यांच्यावर आरोप करून म्हणतात, 'जर हे राज्यावर आले तर देशाचं वाटोळं होईल. आम्ही जर राज्यावर आलो तर मात्र आम्ही सगळं काही व्यवस्थित करू.' गेली ३५ वर्षे दर पाच वर्षांनी हेच घडत आलं.
आपल्यासमोर यादोन्ही मंडळींनी ठेवलेला मजकूर आहे; पण मनात शंकेची पाल चुकचुकते. एखादा मुलगा एका वर्गात अनेक वर्षे नापास होत राहिला आणि आपण नापास का होतो हे त्याला सांगता येत नसेल तर बाप त्या मुलाला अधिकाराने विचारू शकतो, की "बाळा, तू गेली ३६ वर्षे नापास का होतो आहेस हे जर तुला कळलं नाही तर आता काय एकदम चमत्कार होणार आहे आणि तू एकदम नापासाचा फर्स्टक्लास होणार आहेस?"
गेली ३७ वर्षे ही राज्यकर्ती मंडळी का नापास होत आहेत? या देशाची ही