पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणूनबुजून जातीजातीची, धर्माधर्माची भांडणं लावून देण्यात आली.

 इंग्रजी अमदानीतील एक उदाहरण पाहा. इंग्रज जेव्हा या देशावर राज्य करू लागले तेव्हा शेतीच्या शोषणासाठी त्यांनी जमिनीच्या रयतवारीची पद्धत सुरू केली. केरळमध्ये त्यावेळी जमिनीची मालकी अशी मुळी कल्पनाच नव्हती. सगळ्या गावाने मिळून जमीन कसायची. हिशेबठिशेब ठेवायचे कागदपत्रांचे काम नंबुद्री ब्राह्मण करायचे तर शेतावर मजुरी करणारे हे मुख्यत: मोपला जातीचे मुसलमान होते. इंग्रजांनी विचारले, की 'या जमिनीचे मालक कोण?' लोक म्हणाले की, 'मालकी म्हणजे काय आम्हाला समजत नाही.' इंग्रजांनी विचारलं, 'हिशोब कोण बघतो ?' तेव्हा नंबुद्री ब्राह्मण म्हणाले, 'आम्ही पाहतो.' त्यांना इंग्रजांनी सांगितले की, 'मग तुम्हीच मालक आहात.' तेव्हा त्यांनाही बरं वाटलं आणि फायद्याचं वाटलं. जमिनी त्यांच्या नावावर लावण्यात आल्या. शेतमजुरांच्या जेव्हा जे लक्षात आले तेव्हा साहजिकच त्यांच्यात असंतोष पसरला. त्यांनी चळवळ उभी केली. सुरुवातीला चळवळीचे नेतृत्व एका हिंदू तरुणाकडे होते. शेतमजुरांत बहुसंख्य मुसलमान. ते सर्व चळवळ करू लागले तेव्हा फायद्याला लालचावलेल्या नंबुद्री ब्राह्मणांनी सर्व देशभर हाकाटी केली, की मुसलमान आम्हा हिंदूंवर हल्ला करतायत. खरं तर शेतमजुरांच्या पोटाचा प्रश्न; पण तो घेऊन शेतकरी शेतमजूर उठतो आहे म्हटल्यावर त्याला वळण दिलं हिंदूमुलसमान भांडणाचं. हे स्वरूप आल्यानंतर पर्याय न उरून मोपला शेतमजुरांनीही मशिदींचा आसरा घेतला. पोलिस मशिदीत घुसले आणि त्यांनी मोपल्यांना प्रचंड संख्येने कापून काढले. जे मोपल्यांचं बंड म्हणून ओळखलं जातं ती मुळात शेतकरी शेतमजुरांची अर्थवादी चळवळ होती. तिला मतलबीपणे, क्षुद्रवादी हिंदूमुसलमानांच्या भांडणाचं स्वरूप देण्यात आले.

 स्वातंत्र्याआधी सिंध राज्याच्या पश्चिम भागात जे हिंदूमुसलमान वाद होते त्यांचेही स्वरूप हेच होते. बहुसंख्य जमीन मालक हिंदू. शेतावर काम करणारे मुसलमान. पोटाचा प्रश्न मांडला म्हणजे त्यातून हिंदू-मुसलमानांचे दंगे होत. १९४७ मध्ये या राज्याची फाळणी झाली तेव्हा या राज्याचे तीन भाग होते. आज जो भाग पाकिस्तानात गेला आहे तेथे बहुतेक शेतकरी मुसलमान तर आजच्या पंजाबमध्ये शीख आणि आजचा हरियाना व हिमाचल प्रदेशाच्या भागात हिंदू बहुसंख्येने शेतकरी होते. आजही आहेत. १९२५ सालापासून या एकत्रित सिंध राज्यातील शेतकऱ्यांची 'जमीनदारा युनियन' होती. सर छोटूराम हे या युनियनचे प्रमुख होते तोपर्यंत शेतकऱ्यांची बाजू- हिंदू, मुसलमान, शीख या तीनही धर्मांच्या शेतकऱ्यांची- त्यांनी एकत्रितपणे मांडली. मुसलमान शेतकरी तर त्यांना प्रत्यक्ष परमेश्वर मानीत. सर्व

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १७४