पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचारपद्धती पुढे मांडली.

 समाजाचा इतिहास हा शेतीतील गुणाकाराच्या वाटपाचा इतिहास आहे. या लुटीतून इंग्लंडची भरभराट होते आहे. देशातील शहरांची वाढ होते आहे. थोडक्यात शेतीची लूट हे भांडवलनिर्मितीचे साधन आहे ही जाणीव जोतीबांना स्पष्ट दिसते. ही लूट व्यवहारांत संभाव्य होते, याचे कारण अज्ञान व अविद्या. ब्राह्मणांनी विद्याबंदी केली नसती तर अशी लूट होऊ शकली नसती अशी त्यांची कल्पना. विद्याबंदी आणि जातिव्यवस्था नसलेल्या देशांतही शेतीचे शोषण होत असते याची जाणीव त्यांना असण्याचे कारण नव्हते. पुढे याच देशात विद्येचा प्रसार झाला, भटांचे नोकरीतील प्राबल्य कमी झाले, तरीही शेतकऱ्याचे शोषण चालूच राहील हीदेखील अपेक्षा त्यांना नव्हती.

 हिंदू धर्मव्यवस्थेपासून ते दूर गेले ते एकनिर्मिक कल्पनेकडे म्हणजे ख्रिस्ती किंवा मुसलमानी नमुन्याकडे. शंकराचार्यांच्या आत्मवादी अद्वैताची हेटाळणी केल्यानंतर आर्य या देशात येण्यापूर्वी प्रस्थापित असलेल्या वस्तुवादी लोकायताची जोतीबांना माहिती होती असे दिसत नाही. त्यामुळे हिंदू देवतांची निर्भर्त्सना करण्याची हिंमत असलेला हा विचारवंत आडातून फुफाट्यात पडला. वस्तुवादी भूमिकेकडे येऊ शकला नाही. अविद्येमुळे शेतकरी बुडाला हा निष्कर्ष या आत्मवादी भूमिकेतूनच निघाला.

 विचाराने वस्तुस्थिती बदलत नाही. वस्तुस्थितीने विचार ठरतो अशी विज्ञानवादी भूमिका जोतीबांना घेणे जमले नाही. भारतातील शोषण ही काही एक अपवादात्मक घटना नाही, जातिव्यवस्थेमुळे व भटशाहीमुळे उगवलेली ही विवक्षित विषवल्ली नाही. औद्योगिकरणाकरिता आवश्यक असलेल्या भांडवलनिर्मितीसाठी अवलंबल्या गेलेल्या एका विश्वव्यापी विपरीत अवस्थेचा तो केवळ भारतीय अवतार आहे, ही विचारांची व्यापकता जोतीबांच्या काळात भारतात तरी असंभाव्यच होती.

 ज्या एकनिर्मिक ख्रिस्ती धर्माचा जोतीबांवर इतका प्रभाव पडलेला होता त्या धर्माच्या प्रदेशात जोतीबा कार्यरत असतानाच मार्क्सने हेगेलचा आत्मवादी अद्वैत उलथवला होता. वस्तुवादी अद्वैताची मांडणी केली होती. त्यांतून मानवी इतिहासाचा एक नवा क्रांतिकारी अर्थ जगापुढे मांडला होता. गंभीरतेने, भारदस्तपणे प्रस्थापित विद्वत्तेच्या परिमितींनासुद्धा पुरे करीत मांडला. जगाला पहिली परिपूर्ण विचारपद्धती मिळाली. समाजाच्या उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्था उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरून ठरतात. प्रत्येक अवस्थेत वर्गा-वर्गांचा संघर्ष यांतून वर्गविहीन समाजाची स्थापना कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली होईल असे भाकीत केले.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १२०