पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/126

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जोतीबा चुकले, तसे मार्क्सही घसरला. मनुष्यप्राण्याचा विचार तितका स्थलकालसापेक्ष म्हणून मर्यादितच. जोतीबांची पाळेमुळे जशी शेतकरी वर्गात होती तशी जर मार्क्सची असती तर युरोपीय देशातील कामगारांच्या श्रमशक्तीच्या शोषणापेक्षा वसाहतींतील शेतकऱ्यांच्या श्रमशक्तीचे शोषण जास्त महत्त्वाचे आहे हे त्याला कळले असते. तिसऱ्या जगाचे शोषण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत साम्राज्यवादी देशांतील कामगारांचे शोषण अपरिहार्य नाही. पाश्चिमात्य देशांतील कामगाराला भेडसावणारा प्रश्न त्याची नवी मोटार गाडी पार्क करायला जागा मिळत नाही हा असेल. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या देशात कामगार-कारखानदार गुफ्तगू होऊन शेतकऱ्याचे शोषण होईल. ही सर्व आज प्रत्यक्ष दिसणारी चित्रे मार्क्सला पाहता आली नाहीत कारण तो जोतीबा नव्हता.

 एकेश्वरवादापाशी अडकलेल्या जोतीबांना शेतकऱ्यांच्या शोषणातली सनातनता जाणवली होती; पण समजली नव्हती. या शोषणाचे 'भटशाही' हे तत्कालीन स्वरूप आहे. त्या जातीच्या अंगभूत गुणांमुळे शोषण होत नाही, आर्थिक इतिहासक्रमाचा अपरिहार्य भाग म्हणून होते. हा शोषक कधी दरवडेखोराच्या रूपांत येतो, कधी जमीनदार सावकाराच्या, कधी भटाभिक्षुकाच्या, कधी राजा महाराजांच्या, कधी इंग्रजांच्या, कधी स्वकीय राज्यकर्त्यांच्या. हे त्या काळात त्यांना उमगत नाही.

 शेतकऱ्यांचा शोषक भट पुढे आपल्यात शूद्रच काय अतिशूद्रही सामील करून घेईल, शिक्षणाचा प्रचार करील; पण शेतकऱ्यांचे शोषण सोडणार नाही. कारण शेतीच्या शोषणाखेरीज त्याला सोईस्कर असा भांडवलनिर्मितीचा मार्गच नाही. हे जोतीबांना समजले नाही कारण जोतीबा मार्क्स नव्हते.

 भारतातील विवक्षित परिस्थितीमुळे जोतीबांवर मर्यादा पडल्या. तसेच युरोपीय देशांतील ऐतिहासिक परिस्थितीमुळे मार्क्स फसला. १९४८ च्या पॅरिसच्या उठावात शेतकऱ्यांनी भाग घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेला मार्क्स औद्योगिक कामगाराला क्रांतीचा अग्रदूत मानू लागला.

 कामगारांना या भूमिकेस साजेसा आर्थिक शोषणाचा, वर्गजाणिवेचा आणि विग्रहाचा विचार त्याने मांडला. वस्तुत: शोषण हे तिसऱ्या जगांतील प्राथमिक अर्थव्यवस्थेचे होत आहे आणि या लुटीचा फायदा पुढारलेल्या देशांतील कारखानदार, भांडवलदार, कामगार धरून सगळेच कमीअधिक प्रमाणात घेत आहेत. औद्योगिकदृष्ट्या सर्वांत प्रगत देशात क्रांती होत नाही, मागासलेल्या देशांत होते. एका देशातील कामगार दुसऱ्या देशातील कामगाराच्या हक्कासाठी लढत नाही. १५०० रुपये महिना मिळवणारा कामगार कारखान्याच्या कुंपणाबाहेर रिकाम्या

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १२१