पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धर्माची, श्रद्धेची, रूढीची पकड खऱ्या अर्थाने ढिली झालेली नाही. भटशाहीचा अस्त झाला. विद्येचा प्रसार झाला. जोतीबांच्या अटी मोठ्या प्रमाणावर पुऱ्या झाल्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम मात्र दिसून आले नाहीत.

 भट, कुणब्याचा पोर सरकारी नोकरीत गेल्यावर तो कुणब्याला सन्मानाने वागवेल, त्याच्यावर अन्याय करणार नाही अशी जोतीबांची अपेक्षा होती. या अपेक्षेचे कारण जोतीबांनी चितारलेल्या खास मराठा म्हणविणाऱ्या गृहस्थाच्या शब्दात-

 'माझा ज्यांच्याशी रोटीव्यवहार, बेटी व्यवहार त्यांच्याशी वाकडा होऊन माझ्या मुलीमुलांस मुरळ्या वाघे करू काय? त्यांच्या मुलाबाळांच्या मध्ये माझ्या मुलाबाळांना सारे जन्म काढावयाचे आहेत. इ.इ. (शेतकऱ्याचा असूड, पान २६७)

 शूद्रांचे नोकरीतील प्रमाण ब्राह्मणांच्या बरोबरीने झाले. लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण पाहता ते आणखीही वाढावयास पाहिजे; पण या संख्यात्मक बदलातून जोतीबांना अपेक्षित असा गुणात्मक बदल अजिबात घडून आलेला दिसत नाही.

 शालांत परीक्षा पास होऊन पुढाऱ्याच्या ओळखी-वशिल्याने भू-विकास बँक, जिल्हा परिषद, बांधकाम वगैरे ठिकाणी चिकटलेला कुणबी पोरगा शेतकऱ्याला पूर्वीच्या ब्राह्मण कामगाराइतकेच नव्हे, बहुतांशी अधिक अरेरावीने वागवितो. हात ओले झाल्याखेरीज कामाला हात लावीत नाही. घरचा चोर जिवानिशी सोडेना अशी स्थिती. प्रत्यक्ष राज्यकर्तेपदी कुणब्यांची पोरे आली तरी फरक नाही.

 देशपातळीवर गोरा इंग्रज जाऊन काळा इंग्रज आला तसेच गावपातळीवर गोरा(!) ब्राह्मण जाऊन काळा ब्राह्मण आला. अन्याय, अत्याचार तसाच कायम राहिला. याही बाबतीत जोतीबांची औषध योजना फोल ठरली आहे. याची कारणे शोधणे आवश्यक आहे.

 जोतीबा आणि मार्क्स

 शेतकऱ्याच्या प्रश्नाला जोतीबांनी हात घातला तो मोठ्या व्यापक भूमिकेतून. शेतकऱ्याची परिस्थिती फार केविलवाणी आहे हो ! त्याच्यावर दया करा अशी अति भिकेची किंकाळी त्यांनी मारली नाही. शेतकरी कष्ट करतो, राबतो; पण त्याच्या कष्टाचे फळ त्याच्याकडून लुटून नेले जाते. प्रथमत: भटशाहीकडून आणि राहिले सुरले इंग्रजांकडून. हे शोषण फार पुराणे आहे. त्याची सुरुवात पेंढारी, कहीवाले, मागून सरदार, राजेरजवाडे यांच्या लुटीतून होते (सत्सार २, पान ३०१). वेठबिगार, धर्मव्यवस्था, करभार, अपुऱ्या किमती हे सर्व शेतीच्या लुटीचे प्रकार आहेत ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीच्या लुटीचा एक इतिहास आणि

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ११९