पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकरीपुत्रांसारखीच. त्यापैकी कोणी शेतकऱ्याच्या अवस्थेकडे लक्ष देईल तर हराम! अशा शेतकरीपुत्रांवर जोतीबांनी कडाडून असूड फडकावला आहे.

 कोणी कंत्राटे व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटी, पेनशने घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीने पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवतात; परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुले पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. (पृष्ठ क्र. १८९-१९०)

 संस्थानिकांनी भटशाहीच्या कारस्थानाला आळा घालावा अशा आशेने बघावे तर ते,

 ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. (पृष्ठ क्र. १९०)

 सुशिक्षित कुणब्यांकडे पहावे तर,

 ही शेतकऱ्यांची साडेसात तुटपुंजी विद्वान मुले, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी बांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्मण कामगार कसा करतात, तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारचे कानावर घालण्याविषयी आपल्या गच्च दातखिळी बसवून, उलटे ब्राह्मणांचे जिवलग शाळूसोबती बनून जातात. (पृष्ठ क्र. २४२)

 एवढेच नव्हे तर

 .. पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनातून बाह्मण कामगारांचे नाव ऐकल्याबरोबर टपाटपा लेंड्या गाळतात... (पृष्ठ क्र. २४३)


 या भयानक स्थितीचे कारण काय?

 जोतीबांनी शेतकऱ्यांच्या आणि शेतकीच्या स्थितीचे जे वर्णन केले आहे ते वाचताना शंभर वर्षांपूर्वीचे लिखाण वाचतो आहे असे वाटत नाही. अगदी आजच्या परिस्थितीचेच वर्णन एखादा सिद्धहस्त लेखक प्रत्यक्ष करीत आहे असे वाटते.

 १८८३ मध्ये जोतीबांनी केलेले निरीक्षण. १९४० मध्ये साने गुरूजींनी दिलेली हाक-

'रात्रंदिवस तुम्ही करीत असा काम।
जीवनांत तुमच्या उरला नाही राम।
घाम गळे तुमचा हरामाला दाम ।
येवो आता तुम्हां थोडा तरी त्वेष ।
येथून तेथून सारा पेटू दे देश ॥'

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ९८