पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणि १९८० पासून शेतकरी संघटनेने मांडलेले अर्थशास्त्र यांतील समान सूत्र - 'शेतकऱ्याची दुरवस्था' उघड आहे; पण या परिस्थितीला जबाबदार कोण? या गरिबीचे कारण काय? संघटनेचा विचार आणि जोतीबांचे द्रष्टेपण यांत एकसूत्र आहे की काही फरक आहे? हे समजून घेण्यासाठी जोतीबांनी या परिस्थितीची केलेली कारणमीमांसा बारकाईने समजून घेतली पाहिजे.
 अगदी पहिली गोष्ट म्हणजे 'शेतकरी लोक लग्नकार्य निमित्ताने बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत' या त्या काळीसुद्धा अनेक विद्वानांनी आणि संस्थांनी मांडलेल्या लटक्या कंडीस जोतीबांनी विरोध केला आहे.

(पृष्ठ क्र. २३०, २४४, २४५)

 शेतकऱ्याच्या घरच्या मंगलकार्याचे त्यांनी उभे केलेले चित्र मोठे विदारक आहे.

 ... गावांतील तरूण स्त्रिया वरमाईस बरोबर घेऊन, कांदे चिरून, हळकुंडे फोडून, भाजल्या बाजरीचा बेरूवार, हळद, चिकसा दळून काढतात. त्यामुळे सदरच्या पदार्थांची घाण, रातदिवस काम करणाऱ्या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या पातळाच्या घाणीमध्ये मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गंधी चालते, की तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्रास होतो. त्याच्या घरापुढे अंगणात लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढी रोवून, त्याजवर आडव्या तिडव्या फोंकाठ्यावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्र सावली केलेली असते. ढोलकी अथवा डफड्याचे महार मांगाचे बदसूर वाजंत्र्याची काय ती मौज! नवऱ्या मुलास गडगनेर म्हटले, म्हणजे पितळीमध्ये अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातले की, नवऱ्या मुलीमुलांबरोबर फिरणारी मुले लांडग्यासारखी घासामागे घासाचे लचके मारून एका मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात. लग्नातील भोजन समारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरिता पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याच्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्यांबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदा चार अथवा पाच आतडीबरगड्याचे रवे पडले म्हणजे जेवणाराचे भाग्य...
 अशा थाटाची शेतकऱ्यांत लग्ने होत असून, तेथील एकंदर सर्व गैरमहित शहाणे ब्राह्मणांतील विद्वान, आपल्या सभांनी लटक्या मुटक्या कंड्या उठवून कारभारीस सुचवतात, की शेतकरी आपले मुलाबाळाचे लग्नात निरर्थक पैसा खर्च करितात, त्यामुळे ते कर्जबाजारी झाले आहेत.' (पृष्ठ क्र. २४४-२४५)

 जोतीबांच्या लेखणीतून उतरलेल्या या वर्णनाची ताकद ते मुळात वाचूनच

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ९९