Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
प्रस्तावना

कल्पाच ध्यान केले असतां कल्पना सहजच नाहीशा होतात (क्र. ५५). खरें ध्यान व खोटें ध्यान यांमध्ये इतकाच फरक आहे की, खऱ्या ध्यानांत आत्म्याचे चिंतन होतें, व खोट्या ध्यानांत अनात्म्याचे चिंतन होतें. ध्येय व ध्याता यांमध्ये अनन्यलक्षण उत्पन्न झाल्यासच ध्यानाची परिसमाप्ति झाली असें म्हणता येईल. बाजारी लोकांस प्रमाण आणि अप्रमाण या गोष्टी कळत नसल्याने खोट्याच गोष्टी उठवून ते वाउग्याच बोंबा मारतात. साधकांनी मानसपूजा व प्रत्यक्ष दर्शन यांमध्ये महदंतर आहे असे समजून खऱ्या ध्यानाचा मार्ग शोधून काढावा (क्र. ५६). ज्यास आत्मज्ञानाची किल्ली मिळाली, संदेहनिवृत्तीकरितां जो परिश्रम करतो, जीर्ण जर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जो जीर्णोद्धार करण्यास प्रवृत्त होतो, असत्क्रिया सोडून स्वरूपाकडे जो अखंड निजध्यास लावितो, जे लक्षू जातांही लक्षवत नाही त्यास जो लक्षितो, जेथें मनबुद्धीचा प्रवेशही नाही त्याचे जो अनुभवाने आकलन करितो, व उन्मनीच्या शेवटी आपली आपणांस ज्यास अखंड भेट अनुभवितां येते, त्यासच साधक म्हणता येईल (क्र. ५७). अशा साधकामध्ये व देवामध्ये सख्यभक्ति उत्पन्न होते. आपली संसारव्यथा सोडून आपण देवाचे चिंतन केले असतां देव आपली चिंता करतो. देवाच्या सख्यत्वासाठी आपले सौख्य, जिवलग, प्रपंच, व प्राण वेचण्यासही साधकाने तयार व्हावें. आपण ज्याप्रमाणे वचनें बोलावीत त्याप्रमाणे प्रत्युत्तरें येतात. म्हणून आपण ज्या भावना ईश्वराविषयी ठेवाव्यात त्या भावना ईश्वर आपल्याविषयी ठेवितो (क्र. ५८). महापूजेच्या अंती ज्याप्रमाणे देवास मस्तक वाहतात त्याप्रमाणे आत्मनिवेदनभक्ति आहे. देव व भक्त हे दोघे एकच आहेत अशी ज्याची खात्री पटली तोच साधु या जगांत मोक्षदायक जाणावा (क्र. ५९). आपण आत्मरूप आहों अशी खात्री पटल्यावर देह प्रारब्धाच्या ओघांत खुशाल सोडून देण्यास काय हरकत आहे (क्र. ६०)? सलोकता, समीपता, सरूपता या तीन्ही मुक्तापेक्षां ईश्वराशी जीत तादात्म्य होते अशी सायुज्यमुक्ति श्रेष्ठ आहे (क्र. ६१). ज्याने आपण आपणांस ओळखिलें तो जीत असतांच मुक्त होऊन गेला. देह पुण्यनदीच्या तीरावर पडावा, दक्षिणायनापेक्षा उत्तरायणच देह सोडण्यास योग्य, "अग्निर्ज्योतिरहः शुक्लः" हा अर्चिमार्ग धूम्रमार्गापेक्षा श्रेष्ठ होय, अशा प्रकारच्या खोट्या कल्पना साधूच्या मनास शिवत नाहीत. जो जीवन्मुक्त झाला त्याचा देह रानांत पडो, अगर स्मशानांत पडो, तो धन्यच होय (क्र. ६२).