Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना

करण्यासंबंधी सांगितले होते; आणि देहावसानाचे वेळी त्यांनी उद्धव गोसावी यांस मठाची व्यवस्था करण्यास सांगितले. यामुळे उभयतांचा तंटा वाढत जाऊन शेवटी ते प्रकरण संभाजीपर्यंत गेले. संभाजीने दिवाकर गोसावी यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाने खिन्न होऊन उद्धव गोसावी जे एकदा शके १६०७ मध्ये टांकळीस जाऊन राहिले ते पुनः या प्रांताकडे आले नाहीत. शके १६२१ मध्ये त्यांचे देहावसान होईपर्यंत ते केवळ दुग्ध प्राशन करून होते. वासुदेव गोसावी यांचा उल्लेख शिवाजी व संभाजी यांच्या सनदांसंबंधी पूर्वी केलाच आहे. यांनी मंत्राची जोपासना बरोबर केली नाही म्हणून रामदासांनी यांस एकदां भरसभेत ठोकून काढिले. त्यावेळी ते जे एकदां रामदासांसमोर जमिनीवर पडले ते रामदासांनी क्षमा म्हणेपर्यंत उठलेच नाहीत. आणखी रामदासांच्या शिष्यांपैकी "स्वानुभवदिनकर" या ग्रंथाचे कर्ते दिनकर गोसावी यांचा उल्लेख केला पाहिजे. नगर जिल्ह्यांतील तिसगांव मठाचे हे अधिपति असून स्वानुभवदिनकरांतील यांनी केलेलें योगाचे विवरण ज्ञानेश्वरीबरहुकूम असून फार वाचनीय आहे. रामदासांच्या शिष्यिणीपैकी वेणुबाई व अक्का या प्रमुख होत. वेणुबाईचा "सीतास्वयंवर" या नांवाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांचा मठ अद्यापि मिरजेस आहे. रामदासांच्या समोरच त्यांनी सज्जनगड येथे समाधि घेतली, ती आजतागायतही तेथें दृष्टीस पडते. अक्का या रामदासांनंतर चाळीस वर्षे राहिल्या. सज्जनगड येथें रामाच्या मूर्तीवर जे देऊळ बांधले गेले ते यांच्याच नेतृत्वाखाली होय. यांचीही समाधि सज्जनगड येथेच आहे. गिरिधर हे वेणुबाई व बाईयाबाई यांचे शिष्य असून त्यांनी रामदासांस पाहिले होते. रामदासांनी समाधि घेतली त्यावेळी हे पंचवीस वर्षांचे असल्याने रामदासांचे चरित्र त्यांस पूर्ण अवगत असले पाहिजे. हे बीड मठाचे अधिपति असून रामदासांच्या समोर त्यांनी एकदां कीर्तनही केले होते; यांचा ग्रंथ "समर्थप्रताप" हे एक समर्थांचे चरित्रच असल्याने व तेंही प्रत्यक्ष समर्थांस पाहिलेल्या गृहस्थाने लिहिलेले असल्याने त्याची किंमत विशेष आहे. रामदासांनी समाधि घेतल्यावर अर्धशतकाने हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये १८.३६ यांत अफझुलखानाचा वध, चाफळ मठाचा जीर्णोद्धार, व प्रतापगड येथे शके १५८३ साली समर्थांकडून तुळजादेवीची स्थापना, या सर्वांचा उल्लेख आहे. आत्माराम यांनी "दासविश्रामधाम" या नांवाचा जो प्रचंड ग्रंथ लिहिला आहे त्यांतील सर्व कथा गिरिधरांच्या समर्थ-