पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आजच्या मेळाव्याला नाशिक, अहमदनगर, धुळे या ऊसउत्पादक जिल्ह्यांच्या बरोबर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा महाराष्ट्राच्या सर्व भागांतून शेतकरी प्रतिनिधी हजर आहेत. ते या मेळाव्यातील निर्णय आपापल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. शिवाय, उद्यापासून प्रचार दौराही सुरू होणार आहे. तेव्हा १० नोव्हेंबर १९८१ चा निरोप राज्याच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पोहोचून त्यादिवशी राज्यातील एकूणएक रस्ते बंद राहतील याबद्दल माझी खात्री आहे.
 आणि आमच्या ताकदीचा एकदा पुरावा घेऊनसुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि शेतकऱ्याच्या विरुद्ध धोरण चालूच राहिले तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांतील शेतकरी एकाच वेळी आंदोलनात उतरतील.
 शेतकरी संघटनेची घटना काय असावी, बांधणी कशी असावी, कार्यप्रणाली कशी असावी इत्यादीसंबंधी एक एक लेखी धोरण बनविण्याच्या दृष्टीने चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी २१ व २२ ऑक्टोबर १९८१ रोजी सर्व जिल्ह्यांतील, तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे अधिवेशन मांगीतुंगी येथे भरविण्यात येईल. या अधिवेशनास वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिनिधीही हजर राहणार आहेत. या अधिवेशनाचे यजमानपद बागलाण तालुक्याकडे असणार आहे. आपापल्या भागातील जास्तीत जास्त शेतकरी कार्यकर्त्यांना या अधिवेशनास येण्यास उद्युक्त करा.
 २० सप्टेंबर १९८१ रोजी पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) येथे जमलेल्या लाखभर शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणाचे शब्दांकन.

(शेतकरी संघटक २१ मार्च २००५)


◼◼


माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४