पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकण्याचा जो आदेश दिला आहे तो आदेश संचालक मंडळाने मान नये.
 हेही मोठे परिणामकारक हत्यार आहे. कारण कोणत्याही सहकारी कारखान्यात कोणी अध्यक्ष मोठा असत नाही, तर सर्वसाधारण सभा हीच सार्वभौम असते. त्या सभेचे आदेश मानणे अध्यक्षांना व संचालक मंडळाला भाग आहे. त्याउपर, जर सर्वसाधारण सभेचे आदेश डावलून त्यांनी पोलिसांच्या मदतीने फ्री सेलची साखर लेव्हीत घातलीच तर ती कशी अडवायची ते आपण ठरवू.
 आणि या विशेष सर्वसाधारण सभेत तिसरा ठराव करून संचालक मंडळाला आदेश द्यायचा की शेतकरी संघटनेने उसाच्या भावाच्या बाबतीत केलेल्या मागण्या जर का केंद्र सरकारने या वर्षी मान्य केल्या नाहीत तर येत्या हंगामामध्ये संचालक मंडळाने सरकाला लेव्हीची साखर देऊ नये. त्यासाठी त्यांना जर काही शिक्षा होणार असेल तर ती भोगण्याची त्यांनी तयारी ठेवावी आणि त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी संचालकपदांचे राजीनामे देऊन निघून जावे, आम्ही दुसरे संचालक मंडळ नेमू.
 शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणी कारखान्यावर प्रशासक नेमू पाहील किंवा कारखानाच बंद करू पाहील तर कारखान्याचे कामगार आपल्या बाजूने उभे राहतील.
 पुढच्या लढाईतल्या दोन आघाड्या - एक कोर्टाची आघाडी वकिलांनी सांभाळायची आणि दुसरी, लवादापुढे जाऊन आणि विशेष सर्वसाधारण सभा बोलावून शेतकऱ्यांनी लढवायची - आपण पाहिल्या.
 तिसऱ्या आघाडीवर संपूर्ण राज्यभर जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यातालुक्यात शेतकरी संघटना विचाराच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे तसेच शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या जातील. या कार्यक्रमादरम्यान त्या त्या भागातील शेतीच्या समस्यांचा अभ्यास केला जाईल.
 लढाईची चौथी आघाडी १० नोव्हेंबर १९८१ रोजीची. हा दिवस म्हणजे आपल्या गेल्या वर्षीच्या विजयी आंदोलनाचा वाढदिवस. १० नोव्हेंबर १९८१ रोजी सगळ्या महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांनी सगळे रस्ते, रेल्वे, पूर्ण दिवस बंद ठेवायचे आणि आपली ताकद दाखवायची. ज्यांना वाटते आहे की शेतकरी संघटना सपाट झाली त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन पडू द्या; जी मंडळी कोर्टात आपल्यासाठी लढत आहेत त्यांनासुद्धा शेतकरी संघटना म्हणजे काय ताकद आहे हे कळून अभिमान वाटला पाहिजे. शासनाला असे वाटले की शेतकरी संघटनेची ताकद संपली आहे, त्या शासनाला कळायला पाहिजे की, '१० नोव्हेंबर १९८१ रोजी महाराष्ट्रातला एकही रस्ता चालू राहणार नाही.'

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २३