पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होत असताना चीनमध्ये जायला ते काय तयार होतं? याची तीन महत्त्वाची कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चीनने पेकिंगमधल्या सगळ्या इमारतींवरचा त्यांना हातोडा, कोयता आणि तारे असलेला लाल झेंडा उतरविलेला नाही. अधिकृतरीत्या त्यांच्या देशाच्या नावामध्ये सोशलिस्ट (Socialist) हा शब्द आहे. अजूनही जाहीर घोषणांमध्ये सगळीकडे मार्क्स, एंगल्स, माओ या सगळ्यांची नावंते घेतात; पण चीनने राजकीय परिवर्तन न करता देशामधल्या निम्म्या भागामध्ये, विशेषतः दक्षिण भागामध्ये खुली व्यवस्था आणण्याचं काम अत्यंत झपाट्यानं केलं आहे. परदेशातील लोकांना इतकी खात्री आहे की चीनने नियोजनात्मक अर्थव्यवस्थेचे काय घातक परिणाम असतात ते चांगलं समजून घेतले आहेत, आता पुन्हा ते काही नियोजनाकडे जाण्याची शक्यता दिसत नाही. त्यांना खरोखरच खुल्या अर्थव्यवस्थेकडे जायचं आहे याची खात्री जगाला पटली. हिंदुस्थानच्या बाबतीत अशी खात्री पटलेली नाही. हे लोक खुल्या अर्थव्यवस्थेची भाषा करताहेत पण त्यांनी खरा घडा काही अजून शिकलेला नाही. राजकीय दबाव आला तर अजूनही ही माणसं आपल्या बोलण्यापासून चळतील अशी त्यांना धास्ती आहे. दंगे चीनमध्येही झाले, दंगे हिंदुस्थानातही झाले. दोघांमध्ये मोठा फरक आहे. तिएनमान चौकात जे काही दंगेझाले ते विद्यार्थ्यांनी आर्थिक स्वातंत्र्याकरिता आणि राजकीय स्वातंत्र्याकरिता केलेले दंगे आहेत. म्हणजे ती मागणी निदान विसाव्या शतकातली आहे. विसाव्या शतकाला प्रस्तुत असलेल्या मागणीकरता विद्यार्थी उतरले आणि त्यांवर सरकारने रणगाडे घातले, गोळ्या झाडल्या. दोनतीन हजार माणसं मेली. हिंदुस्थानात ज्या प्रश्नावर दंगा झाला तो प्रश्नच मुळी विसाव्या शतकातला नाही, तो त्रेतायुगातला प्रश्न आहे आणि त्याच्याकरिता भांडणारी ही माणसं, यांच्या हाती भांडवल सोपवणं कितपत योग्य आहे याबद्दल मनात शंका निर्माण होणं साहजिक आहे. ज्याच्या हाती पैसा आहे तो राम, रहीम, बाबर काही जाणत नाही; माझं भांडवल तिथं सुरक्षित राहू शकेल किंवा नाही याचा फक्त विचार करतो. हे भांडवलाच्या घाबरण्याचं दुसरं कारण आणि असे दंगेसुद्धा सरकारला थांबवता आले नाहीत. मशीद पडू देणार नाही असं म्हटलं तरी ती पाडायची सरकारला थांबवता आली नाही आणि मुंबईमध्ये दंगे सुरू झाल्यानंतर थांबवता तर आले नाहीतच पण हे दंगे सुरू करण्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचाच हात होता की काय इथपर्यंत चर्चा जेव्हा होते तेव्हा साहजिकच, पैसेवाले पैसे गुंतवायला घाबरतात.
 अशा परिस्थितीमध्ये कालच्या अंदाजपत्रकाचा थोडा मसुदा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मी मागेही अनेकवेळा असं म्हटलं आहे की, अंदाजपत्रकावर काही चर्चा होते ती चर्चा निरर्थक असते. कारण, अंदाजपत्रक ही एक महत्त्वाची गोष्ट होती, पण

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ८९