पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगितलं? धान्य फक्त स्वतःपुरतं किंवा स्वतःच्या गावापुरतं पिकवा. बाहेरून ट्रॅक्टर विकत घेऊ नका. खतसुद्धा विकत घ्यायचं कमी करा, जर तुम्हाला पिकवायचं असेल तर वाटेल तितकं पिकवा पण धान्य पिकवू नका. त्याच्याऐवजी डाळी पिकवायच्या असतील तर पिकवा, तेलबिया पिकवा, फळं पिकवा, दुधाचा धंदा करायचा असेल तर करा; पण धान्य करू नका आणि परिणाम काय झाला? पुन्हा एकदा आम्ही थोडं कमी पडलो.
 त्यावेळी मी आणखी एक कल्पना मांडली होती. शेतकरी संघटना ही एक लढाऊ संघटना आहे. ती आंदोलन करते. माझ्यासारखा कधी कचेरी आणि कार्यालयाच्या बाहेर न गेलेला मनुष्य वीसपंचवीस वेळा तुरुंगात जातो आणि माझ्यावर पाचपाचशे खटले लागतात. हा उद्योग मी का केला? मला काही तुरुंगात जायची हौस होती म्हणून नाही. माझा जन्म काही रस्ते अडवण्यात गेला म्हणून काही मी रस्त्यावर आलो नाही, तर शेतकरी संघटनेला सनदशीर आर्थिक हत्यारे हाताळण्यासारखी स्थिती नाही. आंदोलन करण्यापलीकडे गत्यंतर नाही. कारण, शेतकऱ्यांचा खरा शत्रू राजकीय धोरण आहे. त्यावेळी, मी असंही म्हटलं होतं की जर का सरकारचं धोरण शेतकरी विरोधी नसतं, शेतीमालाचा भाव पाडायचा असं जर सरकारचं धोरण नसतं तर काय झालं असतं? मला आठवतं, वर्ध्याच्या पहिल्या बैठकीमध्ये ज्या लोकांशी ओळख झाली त्याच्यामध्ये एक कार्यकर्ते होते. सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांना असं वाटलं, की शरद जोशी जे म्हणताहेत ते काही खरं नाही. सरकार शेतीमालाचा भाव पाडतं हे काही खरं नाही. आपलंच सरकार आपल्या विरोधी कसं काय असेल? मग त्यांनी एक छोटासा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यांनी काय केलं की, शेतकऱ्यांना जरा बऱ्यापैकी भाव देऊन ज्वारी व इतर धान्ये खरेदी केली आणि त्यांना असं वाटलं की ते धान्य विकल्यानंतर त्यांना फायदा होईल आणि ते शेतकऱ्याला बऱ्यापैकी भाव देऊ शकतील. काय झालं? सरकारनं त्यानंतर केली सुरुवात धान्याची आयात करायला. मग बजारपेठेतले ज्वारीचे भाव इतके पडले की या कार्यकर्त्यांनी जेवढे पैसे गुंतवले होते तेवढेसुद्धा त्यांना परत मिळाले नाहीत. याचा अर्थ काय? की केवळ आर्थिक व्यवहारांनी किंवा तथाकथित विधायक कार्यक्रमांनी शेतीमालाला भाव मिळू शकत नाही.
 शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं काढली पाहिजेत हे आम्हालाही समजतं हो! जर शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर तो साठविण्याची व्यवस्था पाहिजे इतकं समजण्याइतकी बुद्धी आम्हालाही आहे. जर शेतीमालाला भाव पाहिजे असेल तर त्या मालावर प्रक्रिया केली

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ५०