पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्णय घेणे आता कठीण राहिलेले नाही.
 स्वभापचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वामनराव चटप यांना येण्यास उशीर झाल्यामुळे आपल्याला सवड मिळाली. त्या वेळात आपण, येत्या निवडणुकीत प्रचारासाठी उपयुक्त ठरतील अशा फिल्म्स बनवल्या आहे त्या आपण पाहू शकलो. त्यात आपल्या शेतकरी आंदोलनाच्या गेल्या ३८ वर्षांच्या अनेक घटना आपण पाहिल्या; आपण या काळात काय काय सहन केले त्याचे त्यातून स्मरण झाले.
 स्वित्झर्लंडमधील सुखासीन व समृद्ध जीवन सोडून भारतात येऊन मी शेती करायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या मुली शाळेमध्ये शिकत होत्या. एके दिवशी शाळेतून परत आल्यावर माझ्या मुलीने त्यांची सहल काश्मीरला जाणार असल्याचे सांगून त्यासाठी चारपाचशे रुपयांची मागणी केली. माझी आर्थिक स्थिती आता स्वित्झर्लंडमधील राहिली नव्हती; आधीच्या आयुष्यात जमा केलेली एक एक चीजवस्तू विकीत घरसंसार चालवत होतो. मी मुलीला सांगितले की आता आपल्याला असा खर्च करणे परवडणार नाही. तिला हे सांगितले, पण रात्रभर मला झोप आली नाही. मनात सारखे विचार येऊ लागले, की ज्यामुळे आपल्या मुलींना हौसमौज करता येऊ नये असे जे आपण करतो आहोत ते योग्य आहे का? आपण आपल्या घरातील लोकांना जे दुःख देतो आहोत ते देऊन अखेरी आपल्या अंगीकृत कार्यात काही हाती लागणार आहे का? शेतीच्या अवस्थेत काही बदल होणार आहेत काय?
 आणखी एक आठवण, जी मी फारशी कोणाला सांगत नाही, माझ्या मनाला नेहमी डाचत असणारी आहे. शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात सुरू केलेली शेतकरी चळवळ देशभरात उभी राहिली तरच शेतकऱ्यांच्या दुःस्थितीत काही फरक पडेल, फक्त महाराष्ट्रातले प्रयत्न पुरे पडणार नाहीत हे लक्षात घेऊन १९८१ च्या ऑक्टोबरमध्ये देशभरातील समविचारी शेतकऱ्यांच्या संघटनांच्या नेत्यांची आम्ही एक बैठक वाला बोलावली होती. मी तिकडे जाण्याची तयारी करीत असताना माझ्या पत्नीने-लीलाने माझ्याकडे हट्ट धरला की मी वर्ध्याच्या या कार्यक्रमाला जाऊ नये. पण माझा वर्ध्याला जाण्याचा निश्चय पक्का आहे हे लक्षात आल्यानंतर ती माऊली मला मोठ्या तळतळाटाने म्हणाली, "नको म्हणत असतानासुद्धा तुम्ही मला आणि मुलींना सोडून जात आहात; हे शेतकरीसुद्धा एक वेळ तुम्हाला सोडून जातील हे लक्षात ठेवा." शेतकरी संघटनेच्या कुटुंबात आजवर वेळोवेळी जे काही घडले आहे आणि घडते आहे ते पाहिले की मला असे वाटते की माझ्या पत्नीचा शाप खरा ठरला आहे.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३११