पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. मी कांदा पिकवतो. पंचतारांकित हॉटेलात जेवण करणाराने कांदा मागितला तर कांदा चिरून दिला जातो, त्याचे वेगळे पैसे लावत नाहीत. म्हणजे फुकटच दिला जातो. तुमच्या या सिद्धांताप्रमाणे त्या कांद्याला मला काहीच मिळणार नाही. तोच कांदा एखाद्या टपरीवर चिरून त्याची भजी केली तर त्याला खूप किंमत येते, मग तिथे मात्र माझ्या कांद्याला भरपूर पैसे मिळायला पाहिजेत, असंच ना? माझा गूळ जर पन्ह्यात घातला तर पन्हं स्वस्त असल्याने कमी किंमतीत द्यावा लागेल; पण तोच गूळ आंबवून त्यातून हातभट्टीची दारू काढली तर ती चांगल्या भावाने विकली जात असल्याने त्याच गुळाला किती तरी जास्त किंमत मिळेल असाच तुमच्या सिद्धांताचा अर्थ ना?' शंकररावांच्या या प्रश्नावर प्रकांडपंडित अर्थशास्त्री निरुत्तर झाले. असे एकटे शंकरराव वाघच नव्हे, महाराष्ट्रभरच्या अर्धशिक्षित, अशिक्षित, अडाणी म्हणून हिणवल्या गेलेल्या शेतकरी समाजातील प्रतिभा शेतकरी संघटनेच्या उदयामुळे जागृत झाली आणि त्यांनी भल्याभल्या प्रस्थापित विद्वानांची बोलती बंद केली.
 शेतकरी संघटनेचा इतिहास बहुपेडी आहे - काव्याचा इतिहास आहे, साहित्याचा इतिहास आहे, अर्थशास्त्रीय अभ्यासाचा इतिहास आहे, आंदोलन तंत्राचा इतिहास आहे. शेतकरी संघटना ही मुळात प्रचलित अर्थाची संघटना नाहीच; शेतकरी संघटना हे कुटुंब आहे. शेतकरी संघटनेच्या एखाद्या पाईकाच्या घरी दुसरा एखादा पाईक गेला तर कोणी नातेवाईकच घरी आल्याचा आनंद होतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये - पार कोल्हापूरपासून ते गडचिरोलीपर्यंत - जी काही स्वच्छ मनाची शेतकरी माणसे आहेत, ज्यांना आपल्याकडे जी काही शेती आहे तिच्यात कष्ट करावे आणि सन्मानाने जगावे असे प्रामाणिकपणे वाटते अशा सर्वांचे हे कुटुंब आहे. एकमेकांना भेटले म्हणजे त्यांना नातेवाईक भेटल्याचा आनंद होतो. मला तर हा अनुभव नेहमी येतो. आज हिंदुस्थानामध्ये कमीत कमी हजार घरं अशी सांगता येतील की मी तेथे गेलो म्हणजे त्या घरातील माणसांना दसरादिवाळी झाली असं वाटतं; मी जर कुठं आजारी पडलो तर माझी सख्खी नातेवाईक मंडळी येण्याआधी त्या घरची मंडळी दवाखान्यात माझ्यापाशी येऊन पोहोचलेली असतात.
 पंचवीस वर्षे झाली, त्यावेळी 'शेपटी सरळ होणार नाही' म्हणता म्हणता, आता शेपटी सरळ झाली किंवा नाही माहीत नाही, सरळ होईल अशी बरीच आशा दिसते. शेतकऱ्यांची कोणतीही संघटना याआधी हिंदुस्थानभर कोणी नेली नव्हती. उत्तर हिंदुस्थानातील शेतकरी नेते उत्तर हिंदुस्थानात राहत होते, दक्षिणेतील दक्षिणेत राहत होते. संपूर्ण हिंदुस्थानात विस्तारलेलं शेतकरी संघटना हे पाहिलं आंदोलन झालं. एवढेच नव्हे तर सगळ्या शेतकऱ्यांना - वेगवेगळ्या पिकांच्या, वेगवेगळ्या प्रांतांच्या, वेगवेगळ्या भाषांच्या - 'शेतीकर्ज' या एका सूत्रामध्ये बांधण्याचे अजब काम या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२३