पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सावध ! ऐका पुढल्या हाका !
खांद्यास चला खांदा भिडवुनि!

 या कडव्याने शेतकरी संघटनेच्या जुन्या-नव्या पाईकांना जालना अधिवेशनात कुंपणरहित जगातील स्पर्धेचे आव्हान स्वीकारण्याचा मंत्र दिला. इंद्रजित भालेरावांच्या 'कुणब्याचा पोरा आता लढायला शिक' ने परभणीच्या रौप्य महोत्सव मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना पुढे येण्याचे आवाहन केले.
 शेतकरी संघटनेने गेल्या पंचवीस वर्षातील आपल्या वाटचालीत मराठी साहित्यातील, विशेषतः कवितांचा ज्या प्रतिभेने आणि समर्पकपणे उपयोग केला त्याचा वेगळा अभ्यास कोणी केला तर तो पीएच.डी. च्या पात्रतेचा ठरेल.
 शेतकरी संघटनेने साहित्यामध्ये - ग्रामीण साहित्यामध्ये जे प्रयोग केले, तसेच शेतकरी संघटनेचा ग्रामीण साहित्यावर झालेला परिणाम हा सुद्धा एक चमत्कार आहे.
 शेतकरी संघटनेने अर्थशास्त्रामध्ये तर प्रचंड चमत्कार केला. त्या दृष्टीने शेतकरी संघटना हे एक विद्यापीठ आहे. आठवीदहावी नापास झालेली शेतकऱ्यांची मुले शेतकरी संघटनेची एखाददोन शिबिरे केली किंवा दोनचार सभा ऐकल्या म्हणजे अर्थशास्त्रात असे काही तयार होतात की महाविद्यालयांत किंवा विद्यापीठांत जाऊन जागतिक व्यापर संघटनेपर्यंतच्या अर्थशास्त्रासंबंधी विषयांवर अशी काही मांडणी करतात की तिथले प्राध्यापक अचंबित होऊन त्याचं कौतुक करतात.
 एक शिवाजी निर्माण झाल्यामुळे जसा मावळ्यांच्या कर्तृत्वाला उभारी आली तशीच शेतकरी संघटनेच्या उदयामुळे शेतकरी समाजातील सुप्त प्रतिभेला आविष्काराचे धुमारे फुटण्याचा चमत्कार घडला. याचे एकच उदाहरण ऐकलेत तरी ते लक्षात यावे. आज भाषणाच्या सुरुवातला चाकणच्या शंकरराव वाघांचा मी मोठा आदरपूर्वक उल्लेख केला. सातवी आठवीसुद्धा न शिकलेले शंकरराव. आम्ही विदर्भात कापसाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याकरता सुरुवातीला गेलो तेव्हा ते बरोबर होते. तेथे स्वतःला विद्वान समजणारे अर्थशास्त्री जमले होते. शेतीमालाला भाव कसा मिळावा याबद्दल त्यांनी त्यांचा एक सिद्धांत मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार कापडाला जो काही भाव मिळतो त्यातून जिनिंग करणाऱ्या, सूत काढणाऱ्या, कापड विणणाऱ्या अशा मजुरांचा खर्च वजा जाता जी रक्कम उरेल ती सगळीच्या सगळी कापूस उत्पादक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. या सिद्धांतावर उभ्या केलेल्या कापूस उत्पादक संघटनेचे संस्थापक डॉ. कोरपे यांनी त्यांचा हा विचार, 'कॉस्ट ऑडिट' या नावाने आमच्या समोर मांडला. अल्पशिक्षित शंकरराव वाघ ज्यांनी ट्रकवरील क्लीनर म्हणून आपलं आयुष्य सुरू केलं यांनी डॉ. कोरपेंना म्हटले, हा तुमचा सिद्धांत माझ्या नीट लक्षात येत

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२२