पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यांच्यामध्ये व्हायला पाहिजे असे डाव्यांचे म्हणणे होते. असे म्हणत गावागावात शेतकऱ्याशेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याची करामत विद्वान करीत होते.
 शेतकरी संघटनेने पहिल्यांदा दाखवून दिले की, शेतकरी कोणत्याही प्रांताचा असो, कोणत्याही भाषेचा असो, कोणत्याही पिकाचा असो, - शेतकरी कोणतेही बियाणे लावो - सगळ्याच शेतकऱ्यांची शेती तोट्याची आहे आणि म्हणून शेतकरी कर्जात आहे. चारी दिशांना तोंडे करून आलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र बांधण्याचे सूत्र म्हणजे 'शेती तोट्यात आहे'. मोठे शेतकरी, लहान शेतकरी, शेतमजूर अशी शेतकऱ्यांची भांडणे लावून हा प्रश्न सुटणारा नाही. तसेच, शेतकऱ्यांना केवळ पाणी देऊन, बियाणे देऊन, सबसिडी देऊनही हा प्रश्न सुटणारा नाही. पाणी देतात, बियाणे देतात, खते देतात, कर्ज देतात, हे कशाकरता? शेतकरी संघटनेने स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांनी जास्त पिकवावे म्हणून ते हे सर्व देतात. त्याचा वापर करून आणि कष्ट करून अमाप पिकवलेला शेतीमाल शेतकरी बाजारात घेऊन गेला की लुटतात. मग ही सर्व मदत म्हणजे एखाद्या बकरीला अधिकाअधिक खाऊ घालण्याचा प्रकार आहे, ती धष्टपुष्ट झाली की अधिक मटन मिळणार एवढचा उद्देश.
 सबंध देशभर सरकारी मदतीचे गुणगान सुरू असताना इतका जगावेगळा विचार शेतकरी संघटनेने त्यावेळी मांडला. 'सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना लुटतं', 'सरकारचं धोरण, शेतकऱ्याचं मरण' 'तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तर लिलाव' अशी सगळी कोणी कधी न ऐकवलेली सरकारची धोरणे आणि त्याला 'भीक नको, हवे घामाचे दाम' हे उत्तर. हे उत्तर इतके चपखल बसले की त्याने चमत्कार घडला.
 शेतकरी संघटना बांधण्यात मला यश मिळाले, ते का मिळाले यावर मी अनेकवेळा विचार करतो. शेतकऱ्यांची सेवा करण्याकरिता माझ्याइतका अपात्र कोणी नाही. मी जन्माने शेतकरी नाही, शेतकऱ्यांचा शत्रू समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये, अपघाताने का होई ना, माझा जन्म झालेला, परदेशातील प्रदीर्घ वास्तव्यामुळे मराठी धडपणे बोलता येत नव्हते. इतके सारे दोष असूनही शेतकऱ्यांची संघटना बांधण्यात मी यशस्वी झालो याचे कारण मी शेतकऱ्यांची भक्ती केली. साधुसंतांनी सांगून ठेवले आहे की एकनिष्ठपणे भक्ती केली म्हणजे देव हमखास पावतो. मी शेतकऱ्यांची अव्यभिचारी भक्ती केली; शेतकऱ्यांना खुश केले, की मला आमदार-खासदार बनता येईल, मुख्यमंत्री बनता येईल, पंतप्रधान बनता येईल अशी भावना न ठेवता मी शेतकऱ्यांची भक्ती केली. शेतकरी संघटनेचे काम करीत असताना कधी कधी मी विचार करी खरंच परमेश्वर समोर उभा राहिला आणि काय हवे ते माग म्हणाला तर

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २१३