पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गुलामगिरीचा त्याग
 आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही गरीब आहोत, आमच्या जमिनी नापीक झालेल्या आहेत, आमच्या जमिनीच्या पोटातील पाणी संपत आले आहे, आमच्याकडे यंत्रे नाहीत, तंत्रे नाहीत, काही नाही; जे होते ते जुनेपुराणे आणि मोडकळीस आले आहेत, आम्ही कर्जबाजारी झालो आहोत हे खरे आहे. दुसरीकडे, जगातील इतर सरकारांनी त्यांच्या शेतकऱ्यांना पोसून पोसून बलदंड केले आहे हेही खरे आहे; नवीन तंत्रज्ञानाचा त्यांच्याकडे वापर होतो त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली हेही खरे आहे. म्हणजे जागतिक बाजारपेठेत स्पर्धेला उभे राहाणे म्हणजे एका बाजूला एक बलदंड पहिलवान आणि दुसऱ्या बाजूला एखादे लहान पोर उभे राहावे अशी लढाई आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि तरीदेखील येथे जमलेल्या आम्ही शेतकरी भावाबहिणींनी ठरवले आहे की जे काही तोडकेमोडके आमच्या हाती आहे त्यांच्या साहाय्याने आम्ही या स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला आहे. औरंगजेब सर्व साहित्यानिशी आला म्हणून इथले मावळे डगमगले नाहीत, हाती तलवार नसली म्हणून काय झाले? मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नांगराचे फाळ मोडून त्याचा सामना केला हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यात मेलेले चांगले.
 दुसऱ्या लोकांना हा निर्धार समजत नाही. त्याला तसेच कारणही आहे. एखादा वाघ, समजा, पिंजऱ्यात आहे. एक दिवस चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहिले तर वाघ असा विचार करीत नाही की आपण बाहेर गेलो तर काय होईल, आपल्याला इथल्यासारखे आयते खायला मिळेल का नाही? असा विचार करीत असेल तो वाघ असणार नाही. दरवाजा उघडा सापडला तर पहिल्यांदा तो छलांग मारून जंगलाकडे जातो, स्वतंत्र होतो. कुत्रा मात्र विचार करतो की इथे भाकरी तर मिळते की नाही? सुटून गेलेला कुत्रा पुन्हा पुन्हा मालकाकडे परत येतो, दोन लाथा बसल्या तरी भाकरी तर मिळते ना यातच त्याला समाधान वाटते. ज्यांना स्वातंत्र्य हवे असते ते वाघ असतात आणि स्वातंत्र्याचे ज्यांना भय वाटते ते कुत्रे असतात. मग, कुत्रे आणि वाघ यांच्यात संवाद होईलच कसा? म्हणून, आपला स्वातंत्र्याचा निर्धार हा दुसऱ्या लोकांच्या आकलनाबाहेरचा आहे.
 त्यांचे काही असो, आम्ही येथे जमलेले सर्व शेतकरी हे शिवरायांची परंपरा राखणाऱ्या मावळ्यांचे वंशज आहोत आणि ज्या कसायाने पन्नास वर्षे आपली मान कापली त्यांच्याकडे, स्वातंत्र्याच्या असिधाराव्रताला घाबरून त्या कसायाच्या दावणीला परत जाणार नाही.

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७५