पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राष्ट्रीय ‘रालोआ' आणि राष्ट्र संपवणारी 'संपुआ'


 केंद्र शासनात २००४ निवडणुकीत सत्तेवर आलेली संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) प्रमाणेच वेगवेगळ्या पक्षांचे गठबंधन आहे. रालोआतील बहुतेक पक्षांचा समझोता निवडणुकीआधीच झाला होता. त्या आधी जवळजवळ ५ वर्षे त्यांनी एकत्र कामही केले होते. त्यामुळे त्यांचा 'समान कार्यक्रम' आपोआपच स्पष्ट झाला होता. वेगवेगळ्या पक्षांना बरोबर घेऊन चालायचे म्हणजे प्रत्येक पक्षाने आपल्या ध्येयधोरणांतील आणि कार्यक्रमांतील, सहयोगी पक्षाला बोचणारी टोके बोथट केली पाहिजेत, याला सर्वच पक्षांची मान्यता होती. रालोआचे खुद्द निमंत्रक असलेले जॉर्ज फर्नांडिस हे समाजवादी चळवळींच्या अध्वर्यूंपैकी एक; पण त्यांनी कामगार चळवळीच्या अव्यावहारिक कलमांना मुरड घातली. भारतीय जनता पक्षाने अयोद्धेचे राममंदिर, समान नागरी कायदा आणि कलम ३७० चा आग्रह या बाबी गुलदस्त्यात ठेवण्याचे ठरवले आणि भारतवर्षास जागतिक महासत्ता बनवण्याच्या कामास प्राधान्य देण्याचे ठरवले. रालोआच्या काळात देश खंबीरपणे अणुसत्ता बनला. कारगिल प्रदेशावर पाकिस्तानने केलेले आक्रमण पुरेपणे निपटून काढले; त्याबरोबरच, पाकिस्तानपुढे दोस्तीचा हात करून उभय देशांतील नागरिकांना परस्पर-देशांत येणेजाणे सुकर व्हावे याकरिता बससेवाही चालू केली. गणकयंत्राचा उपयोग भरारीने वाढवला आणि संचाराचे नवे तंत्रज्ञानसुद्धा देशभर सर्वदूर पोहोचवले. भारतात येणारी परदेशी गुंतवणूक वाढली आणि देशी उद्योजकांना जग पादाक्रांत करण्यासाठी वाट मोकळी करून दिली. शेतीवर पडलेला कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अजगरी विळखा दूर करण्यासाठी त्यांचा एकाधिकार संपवण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, तीन दशके बंद पडलेला वायदा बाजार मुक्त केला. जागतिक व्यापार संस्थेत श्रीमंत

पोशिंद्यांची लोकशाही / ३०६