पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





विजय आणि पराभवाचे अर्थकारण


 दुसऱ्या महायुद्धात जर्मनी बेचिराख झाला. रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या दोस्त राष्ट्रांनी हिटलर व मुसोलिनी यांच्या नेतृत्वाखालील नाझीवादाचा संपूर्ण पाडाव केला. जर्मनी तर इतका उद्ध्वस्त झाला, की आता पुन्हा कधी जर्मनीतील कारखाने, उद्योगधंदे, व्यापार समर्थपणे उभे राहू शकतील, ही शक्यताच दिसत नव्हती. आणखी एक अजब प्रकार घडला. युद्धामुळे दोस्त राष्ट्रे थकली होती, याला थोडाफार अपवाद अमेरिकेचा. अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना प्रचंड प्रमाणावर युद्धसामग्री पोहोचविली. अमेरिकन फौजा युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांत प्रत्यक्ष धुमश्चक्रीत उतरल्या; पण अमेरिकेची भूमी रणभूमी एकदाही झाली नाही. दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालेल्या सरसकट बॉम्बहल्ल्यांच्या परिणामांतून अमेरिकेच्या अंगावर ओरखडादेखील न पडता, ती निभावून गेली. युद्धसामग्री तयार करण्यासाठी उभे केले गेलेले कारखाने झपाट्याने शांततेच्या काळातील उत्पादन करण्यासाठी आपापली फेरमांडणी करीत होते.
 जित राष्ट्रांच्या मदतीसाठी अमेरिकेने एक योजना जाहीर केली. योजनेचे नाव 'मार्शल प्लॅन' जेते राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांच्या पुनर्बाधणीसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी स्वतः कंबर कसून उभे राहावे, हे दृश्य त्या वेळी अनोखेच होते. पुनर्बांधणीसाठी प्रचंड रकमेची मदतकर्जे तर दिली गेलीच; पण त्याशिवाय जर्मन नाण्याचा विनिमयदर अत्यंत कमी ठेवण्याची परवानगी देऊन, जर्मनीतून होणाऱ्या निर्यातीवरील सारी बंधने सरसकट उठविण्यात आली. ही मदत मिळाली नसती, तर दृढनिश्चय, प्रचंड प्रयत्न, कष्टाळूपणा, जिद्द, उद्योजकता या साऱ्या जर्मन गुणांचे चीज झाले असते किंवा नाही, याबद्दल शंकाच आहे. निदान, जर्मन राष्ट्राच्या पुनर्बाधणीला कितीतरी अधिक वेळ लागला असता.

 प्रत्यक्षात युद्धातील शरणागतीनंतर वीसपंचवीस वर्षांतच जर्मनी पूर्णपणे सावरला

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८९