पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकाऱ्यांना मुंबईच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्याची आवश्यकता भासली असावी. पुण्यात मोफत S.T.D फोन करू देणारा वखारवाला दुर्मिळच. त्यामुळे मुंबईहून आदेश मिळायला वेळ लागत असावा.
  'बँक कर्मचारी बाहेर हाती लागला, तर...'
 शेवटी, चांगल्या ताससव्वातासाने शाखाप्रमुख वखारीतून आले. आपल्या केबिनमध्ये गेले. लघुलिपिकाला बोलावून घेतले आणि नंतर बाहेर येऊन माझ्या हाती एक पत्र दिले. या पत्राची छायालिपी मोठी बघण्यासारखी आहे. 'कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेचे सभासद आज संपात सामील झाले आहेत. त्यामुळे आज आम्ही कॅश व्यवहार सुरू करू शकलेलो नाही. आम्ही आपल्या सदर चेकचे पेमेंट करू शकत नाही. इ.इ.
 कामगारांनी आपापल्या मागण्यांकरिता संप करावा हे समजण्यासारखे आहे. बँककर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे भत्ते, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती, घरबांधणीची कर्जे हे सर्वांना ठाऊक आहे. घाईगर्दीत असलेले ग्राहक काउंटरच्या पलीकडे बसलेले. घड्याळ्याच्या काट्यांवर नजर लावून चुळबूळ करीत आहेत. बँककर्मचारी गप्पा मारत रमतगमत आपली कामे चालवत आहेत. काउंटरवरील ग्रहकाचे काम चटकन् संपवण्याऐवजी काउंटर बंद झाल्यानंतर करावयाची कामे हिशेबठिशेब बिनधास्तपणे आधीच उरकून घेत आहेत, हे पाहिल्यामुळे ज्याचा संताप झाला नाही असा कोणी ग्राहक नसेल. बँकेकडून कर्ज वगैरे हवे असेल तर कर्मचारी आणि अधिकारी मंडळी कर्जदाराला कशी लुटतात हे प्रख्यात आहे. यातील एखादा कर्मचारी कधी बँकेच्या बाहेर सापडला, तर त्याचे काय करता येईल याची दिवास्वप्ने पाहत बँकेचे ग्राहक ताटकळत प्रतीक्षा करीत तासन्तास उभे राहतात. हे सगळे खरे. बँक कर्मचाऱ्यांनी संप करावा हे योग्य नसेल, दुष्टपणाचे असेल, गुन्हेगारीचे असेल; पण समजण्यासारखे आहे.
 हे कसले नादान व्यवस्थापन ?
 माझी तक्रार संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल नाही, कामावर असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल आहे; बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख कार्यालयातील सर्वोच्च अधिकाऱ्यांबद्दल आहे.

 या सर्व अधिकाऱ्यांनी संपकाऱ्यांशी संगनमत केले आहे. अमुक एक तारखेला संप होणार असे कळल्यानंतर जनतेची गैरसोय कमीत कमी कशी होईल आणि बँकेचे व्यवहार जास्तीत जास्त सुरळीतपणे कसे चालतील याची व्यवस्था

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ४६