पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातला गोंधळही संपेल आणि भ्रष्टाचारही संपेल. जी जी खाती या ना त्या स्वरूपात जे परवाने देण्याचे काम करतात, ते सर्व परवानेच अनावश्यक ठरवून रद्द करून टाकावेत, म्हणजे खऱ्या अर्थाने खुली व्यवस्था यायला मदत होईल.
 लोकांनी 'खासगीकरण' करावे
 सर्वसामान्य लोकांनीही यावेळी बांडगुळांच्या दबावाला तोंड देण्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्यांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. आर्थिक हत्यार त्यापेक्षा जास्त प्रभावी असते. काय करता येईल? एक उदाहरण सांगतो : बँक कर्मचाऱ्यांनी खरोखरच संप केला तर मी राष्ट्रीयीकृत बँकांशी जे काही संबंध आहे ते सगळे तोडून सगळे व्यवहार खासगी बँकांत नेणार आहे. हे असे सगळ्या उद्योजकांनी केले जर राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांचा संप कितीही दिवस चालला, तरी चिंता करण्याची काही गरज राहणार नाही.
 आणखी एक सूचना : कोणत्याही संपात कोणत्याही पदावर काम करण्यासाठी सध्याच्या पगाराच्या निम्म्या दरात कुशल, स्वच्छ आणि पात्र पर्यायी कर्मचारी सुचवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.

(६ सप्टेंबर १९९३)

◆◆

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ४२