पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बँकांची व्यंकटी सांडो


 क संप अधिकाऱ्यांचा
 ५ मे रोजी राष्ट्रीयीकृत बँकांचा अधिकारीवर्ग एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेला. त्यांच्या मागण्या काय होत्या हे फारसे स्पष्ट झाले नाही. राष्ट्रीयीकृत बँकांमधील उधळमाधळ थांबवावी. तोटा कमी करावा, घाट्यातील शाखा बंद कराव्यात, असे आदेश शासनाकडून निघाले आहेत. याच धर्तीचे आणखी काही आदेश निघण्याची शक्यता आहे. बँकांना शेअर बाजारात ४९ टक्क्यांपर्यंत भांडवल गोळा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे संचालक मंडळावर व्यावसायिक दृष्टीचे लोक येतील आणि बँक कर्मचाऱ्यांना काम करायला सांगतील अशीही भीती कर्मचाऱ्यांना वाटत असावी. खासगी क्षेत्रात नवीन बँका उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे आणि काही परदेशी बँका हिंदुस्थानात प्रवेश करू लागल्या आहेत. त्यांच्या स्पर्धेचाही धोका बँक कर्मचाऱ्यांना वाटत असावा. राष्ट्रीयीकृत बँकांची मक्तेदारी तोडण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे हा संपाचा प्रमुख हेतू. त्याबरोबर तोंडी लावणे म्हणून काही पगारवाढीच्या वगैरे मागण्या असाव्यात.

 ५ तारखेला संप झाला. देशभरच्या सगळ्या बँकांचे कामकाज ठप्प झाले. संप यशस्वी होणार यात कोणाला काहीच शंका नव्हती. संप बँकअधिकाऱ्यांचा होता; पण अधिकाऱ्यांची सही घेतल्याखेरीज कर्जाचे व्यवहार तर सोडाच; पण खात्यात पैसे जमा करून घेण्याचे किंवा खात्यातून रक्कम काढण्याचे व्यवहार कसे काय होऊ शकणार? अधिकारी अधिकृतरीत्या संपावर राहिले आणि कर्मचारी कामावर आले. काम नसल्यामुळे चकाट्या पिटण्याला, चहा पिण्याला आणि इकडे तिकडे फिरण्याला एरवीपेक्षा जास्त वेळ मिळाला एवढेच.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ४३