पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतात. मात्र, अनेक व्यवस्थापकांचा कल अधिकार गाजविण्याकडं अधिक असतो. त्यामुळं सेवा देणं आणि सेवा घेणं यातील ताळमेळ व समतोल बिघडतो. याचा संस्थेवर विपरीत परिणाम होतो. व्यवस्थापकानं हे टाळलं पाहिजे. एकाधिकारशाहीविषयी असंच आहे.

संवाद कौशल्याचा अभाव : व्यवस्थापकाला आपल्यापेक्षा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोघांशीही सुसंवाद साधता येणं आवश्यक आहे. काही व्यवस्थापकाचं पेपरवर्क उत्तम असतं, पण ते संवाद साधण्याच्या कलेत मागे पडतात. त्यामुळं त्यांच्या व्यवस्थापकीय कामगिरीत त्रुटी राहते. कनिष्ठांकडून सेवा घेताना त्यांच्याशी सुसंवाद आणि वरिष्ठांना सेवा देताना त्यांच्याशी सुसंवाद अशी कसरत मधल्या पातळीवर काम करणाऱ्या व्यवस्थापकाला करावी लागते. संवादकौशल्य नसल्यास असं करणं अवघड होतं. या स्थितीत त्वरित बदल होणं शक्य नसतं. मात्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीनं निश्चित पावलं उचलणं आवश्यक असतं. कर्मचारी व व्यवस्थापकांना प्रशिक्षित करणं हा महत्त्वाचा उपाय आहे. शास्त्रशुध्द प्रशिक्षणामुळं पारंपरिक मानसिकतेत बदल घडू शकतो. सेवा उद्योग हा इतर उद्योगापेक्षा वेगळा आहे. इथं उत्पादन हे महत्त्वाचं नसून माणूस आणि त्याच्या गरजा हेच महत्त्वाचं आहे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी आणि संबंधितांशी व्यवहार करताना त्याचं समाधान हे व्यवस्थापकाचं आणि कर्मचाऱ्यांचं ध्येय असलं पाहिजे अशी मानसिक घडण बनविल्यास हा बदल घडू शकतो.

सांघिक कार्य :

 एकट्याने काम करण्यापेक्षा एखाद्या समूहाचा सदस्य म्हणून कार्य केल्याचे अनेक फायदे होत असतात. एकाच संस्थेत कार्य करणाऱ्यांमध्ये परस्पर हेवेदावे, व्यक्तिगत स्पर्धा, मत्सर आणि द्वेष शक्यतो न राहतील याची खबरदारी व्यवस्थापनाला घ्यावी लागते. एकमेकांना आपुलकीने वागविणारे व्यवस्थापक व कर्मचारीच ग्राहकांना आपुलकीने सेवा देऊ शकतात. म्हणनच समूह संस्कृती रुजविण्यासाठी संस्थेने खास प्रयत्न केले पाहिजे.

स्वयंव्यवस्थापन : डॉ. रेड्डीन या विख्यात व्यवस्थापन तज्ज्ञानं म्हटलं आहे, 'व्यवस्थापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मानव- व्यवस्थापन आहे आणि मानव - व्यवस्थापन म्हणजे आणखी काही नसून स्वयंव्यवस्थापन आहे.' थोडक्यात व्यवस्थापक या नात्यानं आपली संस्था आणि संस्थेचे ग्राहक यांना अव्वल दर्जाची सेवा प्रदान करावयाची असेल, तर व्यवस्थापकाने स्वतःचं व्यवस्थापन उत्कृष्ट केलं पाहिजे. स्वतःतील दोष मनोनिग्रहाने दूर केले पाहिजेत आणि स्वतःचे गुण प्रयत्नपूर्वक जोपासले पाहिजेत.

व्यवस्थापन आणि सेवाभाव / २०२