चतुःश्लोकी भागवत/सृष्टीची निर्मिती

विकिस्रोत कडून

अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें
श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण । रमासमवेत रमारमण । तेथें सृष्टीचे कार्यकारण । ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥
करावया सृष्टिसर्जन । ब्रह्मा पुढें देखे नारायण । सृष्टीचें कार्यकारण । आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥
चारी पांच आणि सोळा । ऐसा पंचविसांचा मेळा । आज्ञाधारक हरिजवळा । विधाता डोळां स्वयें देखे ॥५३॥
त्यांची शक्ति कोण कोण । कोण कार्य कोण कारण । कैसें कैसे त्यांचें लक्षण । नामाभिधान तें ऐका ॥५४॥
प्रकृति पुरुषमहदहंकार । हा चतुः शक्तींचा प्रकार । पंचशक्तींचाहि विचार । जाण साचार महाभूतें ॥५५॥
ज्ञानकर्मेद्रियांचें लक्षण । अकरावें गणिजे पैं मन । पंचतन्मात्रा विषय जाण । यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥
या पंचविसांच्या पोटी । ब्रह्मांडेसीं उठिजे सृष्टी । त्याहि माजी त्रिगुणत्रिपुटी । अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥
भगवंत हा षडगुणयुक्त असल्यानें त्याच्या भक्तांनाहि षड्गुणांची प्राप्ति होते
षड्गुणभाग्यें भाग्यवंत । यालागीं बोलिजे भगवंत । ज्ञानवैराग्य ऐश्वर्यवंत । यशश्रीमंत औदार्यैसी ॥५८॥
हे साही गुण भगवंती । सहज स्वाभाविक असती । योगानें करितां भगवदभक्ती । षड्गुणप्राप्ती तत्प्रसादें पैं ॥५९॥
सहज षड्गुण भगवंती । योगियां आगंतुक प्राप्ती । भक्तांतें भगवंत ह्नणती । जाण निश्चित्ती या हेतू ॥६०॥
पावोनी षड्गुणप्राप्ती । भक्तांतें भगवंत ह्नणती । ऐके तयांची नामकीती । संक्षिप्तस्थिती सांगेन तुज ॥६१॥
वसिष्ठ वामदेव नारद । व्यास वाल्मीक प्रल्हाद । शुक षड्गुणी प्रसिद्ध । इत्यादि अनुवाद भगवद्रूप पैं ॥६२॥
अगाध हरीचें उदारपण । दासां देऊनियां षड्गुण । भगवद्रूपीं परिपूर्ण । त्यांसी भिन्नपणें न देखे स्वयें ॥६३॥
देउनी षड्गुणसंपत्ती । भक्त भगवद्रूप होती । त्यांची उरोंनेदो भिन्न वृत्ती । चिदात्मस्थिती निजबोधें ॥६४॥
औदार्यसिंधु भगवंत
नवल सामर्थ्यांचे औदार्य । आपणासगटं दे षड्गुणैश्वर्य । अभिन्नज्ञानें तेजवीर्य । परात्परवर्य महामहिमा ॥६५॥
मर्दुंनी भक्तांचा जीवकण । भेद निरसुनी दे षड्गुण । स्वयें स्वरुपी रमारमण । स्वानंदमयपूर्ण परमात्मा ॥६६॥
अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न नारायणाच्या दर्शनानें ब्रह्मदेव आत्मानंदीं रममाण झाला
यापरी श्रीनारायण । आनंदविग्रही चिदघन । त्यातें देखोनि चतुरानन । विस्मयें पूर्णं जाहला असे ॥६७॥
घवकरी देखिला हषीकेशी । घवकरी सत्त्व दाटलें त्यासी । प्रेम नसांवरे ब्रह्मयासी । सुखोमींसी विव्हळ होत ॥६८॥
घवघवीत शामसुंदर । देखतां मनीं मना विसर । चढिला सुखाचा महापूर । त्यामाजीं संसार बुडों पाहे ॥६९॥
चित्त चिंतेसी विसरलें । अहंसोहं एक जाहले । बुद्धिबोधा खेंव पडिलें । भरितें दाटले सत्वाचे त्या ॥७०॥
निजात्मज्योती लखलखिली । तेणें हरिखें जीवदशा लाजिली । देहीं देहत्वाची स्फूर्ति गेली । विषयाची झाली पाहांट तेथे ॥७१॥
मोडिलें त्रिपुटीचें विंदान । मावळोंलागे विकारभगण । जीवाशिवा होऊं पाहे लग्न । मधुपर्क विधान शुद्धसत्वें केलें ॥७२॥
गुरुकृपा अरुणोदय होत । अज्ञानअंधावर जाय तेथ ॥ इंद्रियें विषयीं नियुक्त । ती उठूं पाहत निजबोधें ॥७३॥
कंठी अतिबाष्प दाटला । तेणें शब्दव्यवहार खुंटला । गदगदोनीरोमांचीत जाहला । सर्वांगीं चालिला स्वेद कंप ॥७४॥
अंतरीं हर्ष कोंदाटोनी । आनंदाश्रु लोटले नयनीं । स्फुदें सुखोर्मीच्या स्फुंदनी । हर्षे विव्हळोनी विधाता पै ॥७५॥
ते सत्त्वावस्था आवरोन । अंगींचा स्वेद परिमार्जूंन । ब्रह्मा सावधान होऊन । वंदी श्रीचरण नारायणाचें ॥७६॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.