चतुःश्लोकी भागवत/नारायणाला नमन

विकिस्रोत कडून

अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन
जी परहंसप्रांजळे । योगवैराग्यज्ञानबळें । पाविजेती हरीचीं पादयुगुळें । तीं चरणकमळें वंदिली भावें ॥७७॥
जे वेदविवेकव्युत्पत्ती । जाणोनी सदभावें भक्ति करिती । ते भगवच्चरण पावती । ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥
हरिचरणद्वंद्वयुगुळें । वंदितांची भावबळें । निर्द्वंद्व करिती तात्काळें । ती चरणकमळें वंदिलीं ॥७९॥
हरिचरणपदद्वंद्व । वंदितां करी निर्द्वंद्व । यालागीं स्रष्टा स्वानंद । भगवत्पद स्वयें वंदी ॥८०॥
भावें वंदिता हरिचरण । जगाचा स्रष्टा झाला आपण । नकरवे ह्नणे सृष्टिसर्जंन । त्या जगाचें दर्शन विधाता देखे ॥८१॥
न रचितां भूतभौतिककोटी । स्रष्टा देखे सकळ सृष्टी । यालागीं विश्वदृकदृष्टी । ब्रह्मयाची नामाटी सत्यत्वा आली ॥८२॥
करितां हरिचरणीं नमन । विश्वद्रष्टा झाला आपण । विश्वदृक नामाभिधान । ब्रह्मयासी जाण याहेतू ॥८३॥
ब्रह्मा सद्भावें आपण । साष्टांग घाली लोटांगण । तो भाव देखोनी नारायण । स्वानंदें पूर्णं संतुष्टला ॥८४॥
ब्रह्मदेवाची पूर्णावस्था पाहून नारायणाचें त्याला आश्वासन
येऊनी ब्रह्मयाजवळी । कृपें अवलोकी वनमाळी । संतुष्ट होउनी त्याकाळीं । ह्नणें याची झाली परिपक्वदशा ॥८५॥
एवं करावया सृष्टिसर्जन । स्रष्टयासी स्वाधिकारीं पूर्णं । स्थापावया श्रीनारायण । आइका निजाश्वासन बोले तें ॥८६॥
भगवंताची वाणी म्हणजे दिव्यामृतधाराच ती !
ब्रह्मयाच्या प्रीती पावला । प्रियवंतापरिस प्रिय मानला । प्रीतीकरुनि करी धरिला । प्रियकर झाला परमेष्ठी ॥८७॥
जो शब्द बोलिला निःशद्वाचा । वाचिक विश्वतोमुखाचा । ज्याचेनी प्रकाशती चारी वाचा । तो वेदवाचा बोलता झाला ॥८८॥
तो शब्दांचें निजजीवन । ज्याचेनी वाचा दैदीप्यमान । तो स्वयें होऊनि भगवान । हास्यवदन करुनि बोलत ॥८९॥
श्रीभगवानुवाच
लहरी लोटली चित्सागरा । आनंदाचा सुटला झरा । सुख मेध गर्जे गंभीरगिरा । ऐशिया वरा रमाधव बोले ॥२९०॥
परमानंदाची आली भरणी । निजसुखाची उघडली खाणी । तेवीं मृदुमंजुळमधुरवाणी । सारंगपाणी बोलतसे ॥९१॥
तो स्वमुखें ह्नणे ब्रह्मयासी । सृष्टिसर्जनसामर्थ्यासी । तप केलें माझे आज्ञेसीं । तेणें मी संतोषी बहुत झालों ॥९२॥
जेवीं कां निजबाळ तान्हें । नाचोंलागे मातेच्यानी वचनें । तें देखोनियां पां नाचणें । सुखावें मनें माउली जैशी ॥९३॥
तेंवी ‘ तप ’ माझें वचन । ऐकोनी केलें अनुष्ठान । तेणें अनुष्ठानें मी आपण । जाणिजे संपूर्ण संतोषलों ॥९४॥
जो मी तुझेनी तर्पें संतोषलों । प्रत्यक्ष तुजसी भेटलों । तो मी हदयस्थ दूर केलों । दुः प्राप्य जाहलों कूटयोगियां ॥९५॥
माझी प्राप्ति कोणाला होत नाही ?
जें विषय कल्पूनि चित्तीं । नाना तपें आचरती । त्यांसी नव्हे माझी प्राप्ती । जाण निश्चिती कूटयोगी ते ॥९६॥
ज्यां कनककांता आवडे चित्तीं । ज्यांसी लोकेषणेची आसक्ती । त्यांसी नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चिती कूटयोगी ॥९७॥
जो जग मानी अज्ञान । तेथें मी एकचि सज्ञान । तो कूट योगी संपूर्ण । कल्पांताही जाण नपवे मातें ॥९८॥
कूटऐसें देहातें ह्नणती । त्या देहाची ज्या आसक्ती । त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९९॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.