चतुःश्लोकी भागवत/पार्षदगण

विकिस्रोत कडून

वैकुंठींचे मुख्य पार्षदगण
वैकुंठी हरिभक्त पूर्ण । ब्रह्मा देखताहे आपण । त्यांची नांवें सांगूंशके कोण । मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥
नंद सुनंद मुख्यत्वें पूर्ण । बल आणि प्रबलार्हण । धाता विधाता निकटधन जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥
चंड प्रचंड सुशीळ । भद्र सुभद्र पुण्यशीळ । कुमुद कुमुदाक्ष सकळ । हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥३५॥
इहीं पार्षदगणांसमवेत । ब्रह्मा देखे श्रीभगवंत । त्याते भजतां निजभक्त । स्वानंदयुक्त सर्वदा तो ॥३६॥
सप्रेम सभ्दावी सात्विक । त्यांसी सदा हरी सन्मुख । तुष्टला होय प्राङ्मुख । निजानंदे सुख सर्वदा देत ॥३७॥
हरिदर्शनाचा महिमा
ज्याचे दर्शन स्वयें गोड । विसरवी अमृताची चाड । पहातयाचें पुरे कोड । दृष्टि होय गोड देखणेपणें ॥३८॥
त्या निजभक्तांचे ठायी । नाममात्र स्मरतां देही । मृत्यु रिघों नशके कांहीं । अमृतरुप पाही यापरी भक्त ॥३९॥
ज्याचें नाम निवारी जन्ममरण । त्याचे भाग्यें झालिया दर्शन । भक्तांसी तो सुप्रसन्न । प्रसन्नवदन गोविंद पैं ॥४०॥
आकर्णविशाळनयन । दोहीं प्रांतीं आरक्त पूर्ण । यालागीं तो अरुणलोचन । स्वयें चतुरानन हरि देखे ॥४१॥
ब्रह्मदेवाला भगवंत कसा दिसला ?
मागुतेनी तो कैसा भगवंत । निजभाग्यें विधाता देखत । माथां मुकुट रत्नखंचित । सुमनीं संयुक्त कबरीबंध पैं ॥४२॥
चतुर्भुज घनसांवळा । मकरकुंडलें कौस्तुभ गळां । वैजयंती वक्षः स्थळा । आपाद वनमाळा रुळत ॥४३॥
विजू शरण आली हरीसी । अस्ता जाणें खुंटलें तीसी । तैसा पीतांबर कासेसी । दिव्यतेजेंसी तळपतसे ॥४४॥
नाभीं आवर्तला आनंद । परमानंदें वाढलें दोंद । सर्वांगें सच्चिदानंद । स्वानंदकंद शोभतसे ॥४५॥
पाहतां हरीची करतळें । संध्याराग लाजिन्नला पळे । अधर आरक्तपोवळें । सुकुमार रातोत्पळें तैसे चरण ॥४६॥
चरणी तोडर गर्जती देखा । ध्वजवज्रामकुशऊर्ध्वरेखा । पाहतां पायींच्या सामुद्निका । सनकादिकां आनंद बहु ॥४७॥
पडतां पायींच्या पायवण्यासी । शंकर वोढवी मस्तकासी । तेणें शिवत्व आलें त्यासी । अद्यापि शिरीं वाहतसे ॥४८॥
त्याचिये वक्षः स्थळी वामा । वामांगी बैसलीसे रमा । तिच्या भाग्याची थोर सीमा । नवर्णवे महिमा श्रुतिशास्त्रां ॥४९॥
रमा बैसतांचि अर्धांगीं । तिच्या निजशक्ति अनेगी । उभ्या तिष्ठती निजविभागीं । आज्ञाविनियोगीं अधिकार त्या ॥५०॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.