Jump to content

चतुःश्लोकी भागवत/श्रीविष्णूची स्तुति

विकिस्रोत कडून

नमो आदिपुरुषा अव्यक्ता । सच्चिदानंदा गुणातीता । विश्वात्मका सदोदिता । नमो अच्युता अव्यया तुज ॥१५॥
तूं योगीजनां अगोचर । वेदशास्त्रां नकळे पार । भक्तजनासी प्रियकर । दिधला चरणादर निजसेवे त्वां ॥१६॥
हरिचरणसेवेपरता । ठाव नाही परमार्था । मिथ्या मोक्षसायुज्यता । ह्नणती लाता हरिभक्त पैं ॥१७॥
हाती जोडल्या हरिचरण । भक्तां नाही जन्ममरण । यापरता परमार्थ कोण । अभाग्य जन नमानिती हें ॥१८॥
थिजलें विघरलें तूप देख । तैसें सगुणनिर्गुंण दोन्ही एक । हे स्वयें जाणती हरिसेवक । नेणती नास्तिक वेदबाह्य जे ॥१९॥
सर्वांभूतीं वासुदेव । स्वतः सिद्ध असतां स्वयमेवः हा भेदवाद्यां नुपजे भाव । हदयस्थ देव दुणाविला स्वयें ॥२०॥
भेदवादी अभेदवादी । वंदी अथवा जो कां निंदी । तो भगवद्रूपचि त्रिशुद्धी । हें सवेंचि विधी अनन्यभक्तां ॥२१॥
भावें हरिभक्ति करितां । भेदी प्रकटे अभेदता । भक्तांसी नित्यमुक्तता । भावें भजतां हरिचरणीं ॥२२॥
ज्ञानाभ्यासी विषय त्यागिती । त्यागिती ते अतिदुःख पावती । भक्त विषय भगवंतीं अर्पिती । तेव्हांचि ते होती नित्यमुक्त ॥२३॥
ऐसें उल्हासें रमा बोले पूर्ण । माझा सदगुरु स्वये नारायण त्याचे सेवितां सदभावें चरण । स्वयें ब्रह्मज्ञान पायां लागे ॥२४॥
यापरी रमा आपण । आनंदें गाय हरीचे गुण । हेंही करावया गुणवर्णन । तो रमारमण वाचा वदवी ॥२५॥
सांडूनिया अहंमती । रमा करी साकारस्तुती । देव संतोषला निजात्मस्थिती । यालागीं श्रीपती बोलिजे त्यातें ॥२६॥
श्रियेची जे निजस्थिती । तिसी चाळविता निजात्मशक्ती । यालागीं त्यातें श्रीपती । वेदशास्त्रार्थी बोलिजे ॥२७॥
न भागतां भक्तांची आर्ती । निवारी निजांगें कृपामूर्ती । यालागी त्यातें सात्वतपती । सज्ञान बोलती सदभावें पां ॥२८॥
याज्ञिक यागहोम करितां । कल्पनेसारिखें फळदाता । यालागीं यज्ञपति तत्त्वतां । होय बोलता श्रीव्यास ॥२९॥
जग सृजुनी प्रतिपाळिता । शेखीं उदरीं सामाविता । एवढी सत्ता श्रीभगवंता । यालागीं तत्त्वतां जगत्पती होय ॥३०॥
ऐसा भक्तपती श्रीपती । यज्ञपति आणि जगत्पती । भक्तांसमान वैकुंठपती । देखे प्रजापती टवकारला ॥३१॥
मागें बोलिले भगवदभक्त । जे भजनभावें नित्यमुक्त । ते हरिलागीं प्रिय सात्वत । ब्रह्मा देखत पार्षदगण ॥३२॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.